मुंबई, दि. 1 : मच्छीमारांनी समुद्रात घ्यावयाची काळजी तसेच सुरक्षेबाबत संदेश देण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाने (इंडियन कोस्ट गार्डस्) विविध विभागांचा सहभाग घेऊन मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले आहे. ही रॅली दि. 2 ते 10 जून 2018 या कालावधीत मुंबई - गोवा - मुंबई दरम्यान होणार आहे,अशी माहिती राज्याच्या मत्स्यव्यवसाय आयुक्तांनी दिली आहे.
या रॅलीमध्ये कोस्टगार्ड, ओएनजीसी, सीमाशुल्क विभाग, पोलीस, नौदल, हवाई दल, तसेच मत्स्यव्यवसाय विभागाचा समावेश असणार आहे. रॅलीचा शुभारंभ दि. 2 जून रोजी सकाळी 11 वाजता वरळी येथील भारतीय तटरक्षक दलाच्या मुख्यालयाकडून आहे. रॅली सागरी किनारपट्टीमधून गोव्यापर्यंत जाऊन पुन्हा सागरी किनारपट्टीमधूनच मुंबई येथे परत येऊन दि. 10 जून 2018 रोजी समाप्त होईल. प्रवासादरम्यान रॅलीच्या थांब्याच्या ठिकाणी स्थानिक मच्छीमारांना सागरी सुरक्षेबाबत प्रबोधन करण्यात येणार आहे.
2 जून रोजी रॅलीचा मुंबईहून शुभारंभ होणार असून सायंकाळी 5 वाजता मुरूड येथे पोहचणार आहे. 3 जून रोजी दुपारी 3 वा. श्रीवर्धन, सायं. 7 वाजता दापोली, दि. 4 जून रोजी सकाळी 10 वाजता दाभोळ, दुपारी 3 वाजता जयगड, सायं. 6 वाजता मिरकरवाडा, 5 जून रोजी दुपारी 12.30 वाजता देवगड, मालवण येथे सायं. 6 वाजता, दिनांक 6 जून रोजी सकाळी 11 वाजता वेंगुर्ला येथे थांबा घेऊन सायं. 6 वाजता गोवा येथे रॅली समाप्त होईल. दिनांक 7 जून रोजी रॅलीचा परतीचा प्रवास सुरू होऊन दुपारी 1.30 वाजता मालवण येथे पोहोचेल. 8 जून रोजी दुपारी 1 वाजता रत्नागिरी, दि. 9 जून रोजी दुपारी 2 वाजता मुरुड जंजीरा येथे थांबा घेऊन दिनांक 10 जून रोजी दुपारी 3 वाजता वरळी, मुंबई येथे रॅली समाप्त होईल.
रॅलीच्या थांब्याच्या ठिकाणी परिसरातील मच्छीमारांनी सुरक्षेबाबत माहितीचा लाभ घेण्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन मत्स्यव्यवसाय आयुक्त अरुण विधळे यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment