मुंबई, दि. 1 : सध्या सोशल मीडियावरील व्हॉटसअप, टेलिग्राम,
इ चॅट आदी इन्संस्ट मेसेजिंग साधनामध्ये फेक न्यूज पसरविण्याची
जास्त क्षमता आहे. त्यामुळे ही साधने जास्त घातक आहेत. या माध्यमातून येणाऱ्या
माहितीचा स्त्रोत शोधणे अथवा ती तयार करणारे शोधणे कठिण आहे. त्यामुळे फेकन्यूज
संदर्भात लोकांमध्ये जास्तीत जास्त जागृती करणे आवश्यक असून खोट्या बातम्या अथवा
फेक न्यूजची सत्यता तपासून त्या लोकांसमोर आणण्याचे काम पत्रकारांनी करावे,
असे आवाहन महाराष्ट्र सायबरचे पोलीस अधीक्षक बालसिंग राजपूत यांनी केले.
माहिती व
जनसंपर्क महासंचालनालय आणि मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघ यांच्यावतीने
फेकन्यूज संदर्भात कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्री. राजपूत बोलत
होते. यावेळी मुंबई सायबर सेलचे उपायुक्त अकबर पठाण, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (वृत्त व जनसंपर्क) शिवाजी
मानकर, पत्र सूचना कार्यालयाचे अतिरिक्त महासंचालक (पश्चिम
विभाग) नितीन वाकणकर, वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे,
कार्यवाह प्रमोद डोईफोडे, उपाध्यक्ष दिलीप
जाधव आदी यावेळी उपस्थित होते.
श्री. राजपूत
म्हणाले, एखादी मूळ घटना अथवा माहितीची मोडतोड
करून वेगळा अर्थ काढून ती पसरविण्याचे काम फेक न्यूजच्या माध्यमातून होत असते.
ठरविलेल्या अजेंड्यानुसार प्रमोशन करणे, फक्त अफवा पसरविणे,
विकृती मनोवृत्ती, फक्त गॉसिपिंग करणे,
इनडायरेक्ट मार्केटिंग करणे/दुसऱ्याबद्दल वाईट गोष्टी पसरविणे,
बदनामी करणे आणि गुन्हे करणे आदी कारणांसाठी फेक न्यूजचा वापर
करण्यात येतो. देशात 1996-97 नंतर झालेल्या माहिती व इंटरनेटचे जाळे पसविण्यास
सुरूवात झाली. गेल्या आठ ते दहा वर्षात समाज माध्यमांचा प्रसार मोठ्या प्रमाणात
वाढला आहे. मात्र, त्याचा योग्य वापर करण्याचे तंत्र अद्याप
विकसित झाले नाही.
सध्या सोशल
मीडिया व व्हॉटसअप, टेलिग्राम, इ
चॅट आदी इन्संस्ट मेसेजिंग अथवा वन टू वन मेसेंजर असणाऱ्या घटकांमुळे फेक न्यूज
मोठ्या प्रमाणात पसरविण्यात येत आहे. फेक न्यूजची मूळ पोस्ट तयार करणारे
शोधण्यासाठी यंत्रणा उभारण्याचे काम सुरू आहे. परंतु या समाज माध्यमांचे मुख्यालय
किंवा कार्यालये ही परदेशात असल्यामुळे कायदेशीर कार्यवाही करण्यास अडचणी येतात.
तरीही समाज माध्यमांद्वारे अफवा पसरविणाऱ्याविरुद्ध पोलीस मोठ्या प्रमाणात कारवाई
करत आहेत. एखादी अफवा अथवा खोटी बातमी समाज माध्यमात आली असल्यास तातडीने
पोलीसांना ती माहिती द्यावी. फेक न्यूज आल्यास पत्रकारांनी त्याबद्दल जनजागृती
करावी, असेही श्री. राजपूत यांनी सांगितले.
फेक न्यूज
संदर्भात गुगल व फेसबुक पत्रकारांसाठी एक कार्यशाळा घेणार आहे. यामध्ये
पत्रकारांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
श्री. पठाण
म्हणाले, संगणक व इंटरनेटच्या माध्यमातून
माहितीचा वेग प्रचंड वाढला आहे. त्यातून गळाकापू स्पर्धा वाढत आहे. त्यामुळे
माहितीची खात्री, अचूकता पाहिली जात नाही. त्यामुळे
अप्रियघटना घडतात. अशा घटना घडू नये, यासाठी काळजी घेणे
आवश्यक आहे. सध्या सामान्य माणसाला व्ह़ॉटसअपवर येणारी माहिती खरीच वाटते.
त्यामुळे अशा गोष्टींबद्दल जागृती करणे आवश्यक आहे. नागरिकांनी एखाद्या पोस्टबद्दल
खरी माहिती जाणून घेऊनच पुढे पाठवाव्यात. माहितीची खातरजमा करण्याची यंत्रणा
उभारणे आवश्यक ठरले आहे.
वार्ताहर संघाचे अध्यक्ष श्री. सपाटे
यांनी प्रास्ताविक केले तर उपाध्यक्ष श्री. जाधव यांनी स्वागत करून आभार मानले.
०००
No comments:
Post a Comment