Monday, 11 February 2019

सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांना 196.61 कोटीचे कर्ज प्रकरणे मंजूर






* सुलभ कर्ज पुरवठा योजनेला 100 दिवस पूर्ण

* नागपूर जिल्ह्यांनी केली उद्दिष्टपूर्ती
* नागपूर जिल्ह्यात योजनेला उदंड प्रतिसाद
नागपूर, दि. 11 :  सूक्ष्म, लघु आणि मध्यम नवउद्योजकांना सुलभ कर्ज पुरवठा वितरीत करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनातून 59 मिनिटांत कर्ज पुरवठा या योजनेतून जिल्ह्यातील बँकांनी 736 प्रकरणांमध्ये 196.61 करोड रुपयाचे स्वीकृतीपत्र ग्राहकांना प्रदान करण्यातआले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन येथे आज 59 मिनिटात कर्ज पुरवठा या योजनेला 100 दिवस पूर्ण होऊन योजनेच्या समारोपप्रसंगी बँक ऑफ इंडियाच्यावतीने मेगा कर्ज वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी बँक ऑफ इंडियाचे विलास पराते, सहाय्यक महाप्रबंधक प्रमोद अग्रवाल, बँक ऑफ बडोदाचे उपमहाप्रबंधक राकेश कुमार, बँक ऑफ महाराष्ट्रचे उपमहाप्रबंधक विजय कांबळे, भारतीय रिजर्व बँकेचे सहाय्यक महाप्रबंधक कॅप्टन शुभव्रत अग्रवाल, जिल्हा उद्योग केंद्राचे महाप्रबंधक गजेंद्र भारती, डिक्कीचे निश्चय शेळके, अग्रणी जिल्हा प्रबंधक शरद बारापात्रे आदि उपस्थित होते.
उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी म्हणाले, केंद्र शासनाच्या 59 मिनिटात कर्जपुरवठा या योजनेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी विविध बँकांनी उत्तम कामगिरी बजावली. या 100 दिवसात वेगवेगळ्या शासकीय विभागाने देखील नागरिकांच्या प्रश्नांचे निराकरण केले. भविष्यात देखील विविध शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी बँकांनी मदत करावे, असे आवाहन त्यांनी केले.
 सूक्ष्म, लघु आणि मध्यम नवउद्योजकांना सुलभ कर्ज पुरवठा योजनेला 100 दिवस पूर्ण झाल्यानिमित्त या योजनेच्या समारोपप्रसंगी आज 50 लाभार्थ्यांना 4.50 करोड रुपयाचे कर्ज वितरीत करण्यात आले. आतापर्यंत 100 दिवस कार्यक्रमाअंतर्गत विविध बँकांनी तसेच शासकीय विभागाद्वारे 32 कर्ज कॅम्प जिल्ह्यातील विविध भागात आयोजित करण्यात आले होते. या अंतर्गत एमएसएमई जनजागृती तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग सहकार्य आणि संपर्क याविषयी लाभार्थ्यांना माहिती दिली गेली. त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले. बँक ऑफ इंडियाच्यावतीने 123 प्रकरणांमध्ये 21.33 करोड रुपयांचा कर्ज मंजूर करण्यात आले आहे.
डिक्कीचे निश्चय शेळके म्हणाले, 2 नोव्हेंबर 2018 रोजी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग सहकार्य आणि संपर्क या योजनेअंतर्गत संपूर्ण देशातून 80 जिल्ह्याची निवड करण्यात आली. याअंतर्गत नागपूर जिल्ह्याची कामगिरी अत्यंत उत्कृष्ट राहिली आहे. नवउद्योजकांना सबसिडी देणे, शासकीय योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविणे यासाठी या योजनेची मदत होत आहे. सर्व विभागांनी एकत्र येऊन काम केल्याचे हे उत्तम उदाहरण आहे. बँकांच्यावतीने स्वत: लाभार्थ्यांच्या दारी येऊन त्यांना उद्योगांसाठी आर्थिक पाठबळ पुरविल्यामुळे देशामध्ये एमएसएमईद्वारे रोजगार निर्माण होत आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्देश पूर्ण झाल्याचे ते यावेळी म्हणाले.
बँक ऑफ इंडियाच्यावतीने यावेळी मान्यवरांना स्मृती चिन्ह प्रदान करण्यात आले. तसेच लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात मंजुरी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन डॉ.रवि गिरे यांनी केले.
                                                ******

No comments:

Post a Comment