Thursday, 7 March 2019

१० वी च्या विद्यार्थ्यांनी चिंता करु नये, अभ्यास नीट करुन परीक्षा द्यावी - शिक्षणमंत्री विनोद तावडे


अकरावी प्रवेशासाठी इन-हाऊस कोटा आता १० टक्के


मुंबई, दि. ७ : पुढील वर्षी अकरावी प्रवेशासाठी १६ टक्के आरक्षण एसईबीसी आणि १० टक्के आरक्षण खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मिळणार असल्यामुळे आरक्षणाची टक्केवारी १०३ टक्केपर्यंत जाईल आणि अकरावीच्या खुल्या गटातील विद्यार्थ्यांना जागाच मिळणार नाही असा अनावश्यक समज निर्माण केला जात आहे. परंतु, ज्या शाळांमध्ये, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये आतापर्यंत २० टक्के इन-हाऊस कोटा आहे तो इन-हाऊस कोटा यंदापासून १० टक्के राखीव इतका करण्यात आला आहे. त्यामुळे अकरावीच्या प्रवेशासाठी सर्व आरक्षणानंतरही ७ टक्के जागा या खुल्या गटासाठी शिल्लक रहाणार आहेत, असे शिक्षणमंत्री विनेाद तावडे यांनी आज मंत्रालयात पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. त्यामुळे दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी कुठल्याही प्रकारची चिंता करु नये, पॅनिक होऊ नये व आपला अभ्यास नीट करुन परिक्षा द्यावी आणि चांगले गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयात नक्कीच प्रवेश मिळेल, असे श्री. तावडे यांनी स्पष्ट केले.
अकरावीच्या प्रवेशासंदर्भात वस्तुस्थिती स्पष्ट करताना श्री. तावडे म्हणाले, १६ टक्के जागा एसईबीसीसाठी तरी १० टक्के जागा खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी राखीव असल्यामुळे आरक्षणाचे प्रमाण हे वाढणार आहे. मुंबईत १ हजार ८८७ विविध शाखांची कनिष्ठ महाविद्यालये आहेत त्यापैकी ६३९ कनिष्ठ महाविद्यालयात इन-हाऊस प्रवेश कोटा आहे. यापैकी ३०६ महाविद्यालये ही अल्पसंख्याक आहेत. तर ३३३ वरिष्ठ माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालये ही बिगर अल्पसंख्याक आहेत. तिथे इन-हाऊस कोटा लागू होतो. या ३३३ बिगर अल्पसंख्याक कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये आपण जर गेल्या वर्षीचे अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचे आरक्षणाचे नियम पाहिले तर १०३ टक्के आरक्षण नक्कीच होईल. परंतु, या कनिष्ठ महाविद्यालयांच्या व्यवस्थापनासमवेत आपण महिना भरापूर्वी या मुद्दयांच्या अनुषंगाने संबंधितांशी चर्चा केली. सध्या या महाविद्यालयांमध्ये प्रवेशाचा इन-हाऊस कोटा २० टक्के आरक्षित आहे. ही आरक्षणाची पध्दत कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये जुन्या काळापासून आहे. तथापि, या कनिष्ठ महाविद्यालयांशी झालेल्या चर्चेअंती हे २० टक्के आरक्षण यंदापासून १० टक्के करण्यात आले. त्यामुळे, स्वाभाविकपणे जरी एसईबीसी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि इन-हाऊस १० टक्के आरक्षण लागू झाले तरीही प्रवेश प्रक्रियेसाठी खुल्या प्रवर्गासाठी ७ टक्के जागा या रिक्त रहातात, असे श्री. तावडे यांनी स्पष्ट केले.
खुल्या प्रवर्गातील अनेक विद्यार्थी एसईबीसी (१६ टक्के) आणि खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्टया दुर्बल (१० टक्के) या राखीव गटांमध्ये ११वी मध्ये प्रवेशित होत असूनही ७ टक्के जागा खुल्या प्रवर्गासाठी शिल्लक रहातात. हे सर्व आरक्षण मिळून ३३ टक्क्यांपर्यंत जाते त्यामुळे एका अर्थाने खुल्या प्रवर्गासाठी या ३३ टक्के आरक्षणातून अकरावीसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो. असे स्पष्ट करताना श्री. तावडे म्हणाले, गेल्या वर्षी झालेल्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत इन-हाऊस कोट्यामध्ये ६३९ महाविद्यालयांमध्ये एकूण ४० हजार १५६ विद्यार्थ्यांपैकी १६ हजार ७९९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आणि इन हाऊस कोट्यामधील अन्य जागा या रिक्त राहिल्या होत्या. पुण्यामध्ये ८३६ विविध शाखांची कनिष्ठ महाविद्यालये आहेत. यापैकी २२३ महाविद्यालये ही इन हाऊस कोट्यातील आहेत. यापैकी ५२ महाविद्यालये अल्पसंख्याक असून १७१ बिगर अल्पसंख्याक आहेत. पुण्यामधील या २२३ महाविद्याल्यांमध्ये गेल्या वर्षी ११वी च्या प्रवेश प्रक्रियेत इनहाऊस कोट्यातील एकूण १४ हजार २७४ जागांपैकी ८ हजार ३६६ विद्यार्थ्यांनींच अकरावीत प्रवेश घेतला व अन्य इन-हाऊस कोट्यातील जागा रिक्त राहिल्या, ही वस्तुस्थिती श्री. तावडे यांनी यांप्रसगी निदर्शनास आणून दिली.
तरीही, पुढील वर्षाच्या ११वी प्रवेश प्रक्रियेमध्ये २० टक्के इन-हाऊस प्रवेश कोटा १० टक्क्यांपर्यंत केला आहे. तसेच, के. सी. कॉलेज, मिठीबाई कॉलेज, एन. एम. कॉलेज, झेविअर्स कॉलेज इथे जो विद्यार्थ्यांचा ओढा असतो ती अल्पसंख्याक असल्याने तिथे ५० टक्के आरक्षण व अल्पसंख्याक सोबत बाकी कुठलचे आरक्षण तिथे नाही आहे. त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी आहे, असेही श्री. तावडे यांनी स्पष्ट केले.
००००



No comments:

Post a Comment