मुंबई, दि. ७ : महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीच्या वतीने २०१७ च्या नर्मद पारितोषिक, जीवन गौरव पारितोषिक आणि वाङमय पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत. सन २०१७ चा कवी नर्मद गुजराती साहित्य पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक रतिलाल बोरीसागर यांना घोषित झाला असून साहित्य पुरस्कार साहित्यिक आबिद सुरती, कला पुरस्कार गौतम जोशी,पत्रकारिता पुरस्कार शिरीष मेहता व संस्था पुरस्कार भवन्स कल्चरल सेंटर, अंधेरी यांना घोषित झाला आहे.
१० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता गिरगाव चौपाटी येथील भारतीय विद्याभवन येथे हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या या सोहळ्यास उद्योग मंत्री सुभाष देसाई,डॉ.जे.जे.रावल, खासदार अरविंद सावंत, आमदार मंगलप्रभात लोढा आदी उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीच्या वतीने देण्यात येणा-या वाङमय पुरस्कारामध्ये चुनीलाल मडिया पुरस्कार (नवलकथा) प्रथम पुरस्कार श्रीमती वर्षा अडालजा आणि श्रीमती सोनल परीख यांना संयुक्तरित्या घोषित करण्यात आला आहे. तर व्दितीय पुरस्कार श्रीमती मालती कापडिया यांना जाहीर झाला आहे. नाटक विभागात देण्यात येणारा प्रबोध जोशी पुरस्कार उत्तम गडा यांना घोषित झाला आहे. तर निबंध विभागातील वाडिलाल डगली पुरस्कार दिपक मेहता आणि श्रीमती तारिणीबहेन देसाई यांना संयुक्तरित्या घोषित करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून याप्रसंगी अन्य सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत.
००००
No comments:
Post a Comment