मुंबई, दि. ३: भारत आणि इंडोनेशिया देशातील व्यापार व पर्यटनाला अधिक गती मिळण्यासाठी कॉन्स्यूलेट जनरल ऑफ द रिपब्लिकन इंडोनेशियाच्या वतीने एक्स्पो इंडोनेशिया 2017 चे आयोजन वर्ल्ड ट्रेंड सेंटर येथे 3 ते 5 नोव्हेंबर 2017 पर्यंत केले आहे. एक्स्पो इंडोनेशिया 2017 चे उद्घाटन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले.
3 दिवसांच्या प्रदर्शनात इंडोनेशियातील 47 इंडोनेशियन कंपन्या सहभागी होणार आहेत. या प्रदर्शनात विविध अन्नपदार्थ, आकर्षक फर्निचर, आरोग्य निगा उत्पादने, गृह उपयोगी वस्तू, हँडबॅग, पारंपरिक शोभेच्या वस्तू, हस्तकलेची उत्पादने ठेवण्यात आली आहेत.
एक्स्पो इंडोनेशिया प्रदर्शनाचे उदघाटन करण्याप्रसंगी पर्यटन मंत्री श्री. रावल म्हणाले, इंडोनेशिया आणि भारताचे आर्थिक तसेच सांस्कृतिक नाते आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी भारतात इंडोनेशियाने व्यापारात वृद्धी होण्यासाठी १७ बिलियन डॉलर्स गुंतवले आहे. दोन्ही देशात बिजनेस टू बिझनेस संवाद होत असल्याने महाराष्ट्रात पर्यटनाला चालना मिळेल. दोन्ही देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी, गुंतवणुकीसाठी अशा प्रदर्शनाचे आयोजन होणे गरजेचे आहे. इंडोनेशिया देशात पर्यटनाच्या बाबतीत झालेला विकास महाराष्ट्रातही होण्यासाठी दोन्ही देशाच्या सरकारने पुढाकार घेतला पाहिजे. भारतात पर्यटनाचा विकास होत असताना इंडोनेशियाने देखील आपल्याकडे अधिक आर्थिक गुंतवणूक करावी, असे पर्यटन मंत्री जयकुमार रावल म्हणाले.
एक्स्पो इंडोनेशिया २०१७ या प्रदर्शनात दोन देशातील व्यापार आणि गुंतवणूक संबंध अधिक बळकट होण्यासाठी दोन्ही कडील गुंतवणूकदारांनी सहभागी होणे गरजेचे आहे, असे कॉन्सिल जनरल ऑफ द रिपब्लिकन ऑफ इंडोनेशियाचे सौत सिरिंगोरिंगो म्हणाले. यावेळी हंगरीचे कॉन्सिल जनरल, ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीजचे अध्यक्ष विजय कळंत्री तसेच भारतीय व्यापार आणि पर्यटन समित्या इंडोनेशियन गुंतवणूकदार उपस्थित होते.


No comments:
Post a Comment