Friday, 1 June 2018

शेतकऱ्यांच्या कैवाऱ्याला महाराष्ट्र मुकला - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·        भाऊसाहेबांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
·        मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाऊसाहेबांना आदरांजली
बुलडाणा, दि. 1 :  राज्याचे कृषी मंत्री  भाऊसाहेब फुंडकर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी, त्यांना न्याय देण्याकरीता सतत कार्य केले. शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी भाऊसाहेबांनी संसद, विधान परिषद, विधान सभा आणि रस्त्यावर आंदोलनांच्या माध्यमातून  रान पेटविले. त्यांच्या संपूर्ण आयुष्यात शेती आणि शेतकरी हाच घटक केंद्रस्थानी राहीला. अशा शेतकऱ्यांच्या कैवारी असलेल्या नेतृत्वाला आज महाराष्ट्र मुकला आहे, अशा भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केल्या.
   राज्याचे कृषि, फलोत्पादन तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग उपाख्य भाऊसाहेब फुंडकर यांचे काल 31 मे रोजी मुंबई येथे दु:खद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज खामगांव येथील सिद्धीविनायक टेक्निकल कॅम्पसच्या परिसरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून  आदरांजली वाहीली. याप्रसंगी आपल्या शोकसंवेदना व्यक्त करताना मुख्यमंत्री बोलत होते.

    अंत्यविधीवेळी अंतिम दर्शनासाठी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे,  शिक्षण मंत्री विनोद तावडे, सहकार मंत्री सुभाष देशमुख, विधान परिषद विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रविण पोटे, गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, जि.प अध्यक्षा उमाताई तायडे, माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार सर्वश्री रावसाहेब दानवे,  प्रतापराव जाधव,  श्रीमती रक्षाताई खडसे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
  कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सातत्याने संघर्ष करणारे भाऊसाहेब यांच्या निधनाची वार्ता धक्कादायक असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले, भाऊसाहेब एक संवेदनशील व्यक्तिमत्व होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अत्यंत आक्रमकपणे ते मुद्दा रेटून धरायचे. मात्र मुद्दे रेटून धरताना त्यांनी कधी संबंधामध्ये कटूता येवू दिली नाही. ते एक हाडाचे शेतकरी होते. शेतकऱ्यांना काय हवे आहे, हे त्यांनी माहिती असायचे. त्यांनी कृषी विद्यापीठातील कृषी संशोधन, विस्तार कार्याला चालना दिली. विद्यापीठांपर्यंत जाणारे ते कृषीमंत्री होते. कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी भाऊसाहेबांनी खामगांव ते आमगाव पदयात्रा काढली. त्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांचे शेतकरी नेतृत्व पुढे आले आणि त्यांनी नंतर कधी मागे पाहिले नाही.  कृषी मंत्री म्हणून भाऊसाहेबांनी राज्यतील शेतकऱ्यांकरीता विविध योजना राबवून भरीव कार्य केले.
  ते पुढे म्हणाले, अजातशत्रू असे भाऊसाहेबांचे व्यक्तिमत्व होते. ज्या ज्या पदाला त्यांनी काम केले. त्या त्या पदाला न्याय देण्याचे काम त्यांनी केले. भाऊसाहेब हे एका मोठ्या संघर्षातून उभे राहीलेले नेतृत्व होते. माझ्या सारखा एक सामान्य कार्यकर्ता आज राज्याचा मुख्यमंत्री झाला. यामागे भाऊसाहेबांच्याय पिढीने घेतलेले कष्ट आहेत. भाऊसाहेबांनी ज्याप्रकारे देशामध्ये पुढकार घेतला,  त्यामुळे एक राज्यव्यापी शेतकरी नेतृत्व आपणाला मिळाले. याप्रसंगी विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, खासदार रावसाहेब दानवे, आमदार हर्षवर्धन सपकाळ, अशोक सोनोने, खासदार प्रतापराव जाधव, वारकरी संप्रदायाचे संजय महाराज यांनीही आपल्या शोकसंवेदना प्रकट केल्या.
   सकाळी 8 वाजता भाऊसाहेबांच्या पार्थिवाची शोभायात्रा त्यांच्या वसुंधरा निवासस्थानापासून निघाली. मुख्य रस्त्यावरून बस स्थनकमार्गे शेगांव रस्त्याने शोभायात्रा सिद्धीविनायक टेक्निकल कॅम्पस येथे पोहोचली. असंख्य चाहत्यांनी आपल्या लाडक्या नेत्याला साश्रूनयनांनी शोभायात्रेत निरोप दिला. त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शनासाठी कॅम्पस परिसरात असंख्य चाहत्यांनी गर्दी केली होती. त्यांच्या पार्थिवाला मुलगा सागर फुंडकर, आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी मुखाग्नी दिला.  यावेळी आमदार सर्वश्री चैनसुख संचेती, संजय कुटे, संजय रायमूलकर, हर्षवर्धन सपकाळ आदींसह कृषी आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह, विभागीय आयुक्त पियुष सिंग, जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, पीकेव्हीचे कुलगुरू श्री. भाले, एमएसआरडीसीचे सहसंचालक चंद्रकांत पुलकुंडवार उपस्थित होते.   
                                                                        ............................

No comments:

Post a Comment