* रामटेक महसूल मंडळात पाणीटंचाई सदृश्य आढावा बैठक
* कामात दिरंगाई करणा-या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश
नागपूर, दि. 29 : मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना, राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम, ग्रामीण पाणीपुरवठा योजनांच्या माध्यमातून रामटेक, पारशिवनी व कन्हान तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची तातडीने तातडीने अंमलबजावणी करून नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित यंत्रणांना आज दिले. स्व. घनश्यामराव किंमतकर सांस्कृतिक सभागृहात आयोजित रामटेक महसूल मंडळातील पाणीटंचाईसदृश्य आराखडा आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर खासदार कृपाल तुमाने, खनिकर्म विभागाचे अध्यक्ष अँड. आशिष जयस्वाल, आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी, रामटेकचे नगराध्यक्ष दिलीप देशमुख, पारशिवनीच्या नगराध्यक्षा श्रीमती प्रतिभा कुंभलकर, कन्हानचे नगराध्यक्ष शंकर चहांदे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शरद डोणेकर, पारशिवनीपंचायत समिती सभापती राजेश कडू, रामटेक पंचायत समिती सभापती किरण धुर्वे, माजी आमदार आनंदराव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
यंदा कमी पर्जन्यमानामुळे जिल्ह्यातील काही भागात पिण्याच्या पाण्याची टंचाईसदृश्य परिस्थिती असून, अधिका-यांनी वेळीच उपाययोजना कराव्यात. जिल्ह्यातील एकही नागरिक पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहू नये. नागरिकांना पाण्यासाठी त्रास होता कामा नये. ज्या पाणीपुरवठा योजनांची प्रशासकीय अथवा इतर मंजुरी मिळण्यात काही अडचणी असतील त्यांचे लेखी प्रस्ताव तात्काळ पाठवावेत. ते त्वरित मंजूर करुन घेतले जातील. मात्र, वेळेत कामे पूर्ण न करणा-या अधिका-यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देशही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम, राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम याअंतर्गंत कोणत्याही योजनांमधून नागरिकांना पाणीपुरवठा करा. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिका-यांनीही लक्ष घालण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले. संबंधित विभागाचे अधिकारी कामे करत नसतील तर उपविभागीय अधिकारी यांनी पिण्याच्या पाणीटंचाईसदृश्य गावांचे दौरे करावेत. कोणत्याही गावांची पाणीपुरवठा यंत्रणा ठप्प होता कामा नयेत. महावितरणने जिल्ह्यातील एकाही गावातील पाणीपुरवठा करणा-या वीजपंपांची जोडणी न तोडण्याचे निर्देश देत, वेळप्रसंगी थकीत वीजदेयकांवरील दंड व व्याजांची रक्कम माफ करून टप्प्याटप्प्याने देयके भरण्यासाठी वेळ द्यावा, असेही महावितरणच्या अधिका-यांना सांगितले.
मार्च 2019 पर्यंत पाणीटंचाईवरील उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यास सांगून पालकमंत्री बावनकुळे यांनी या कामांना प्राधान्य देत वेगाने कामे करा. त्यासाठी राज्य शासनाकडून सर्व सहकार्य करण्यात येईल. तसेच रामटेक पाणीपुरवठा जलवाहिनी सतत फुटत असल्याच्या तक्रारींवर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे ही पाणीपुरवठा योजना जिल्हा परिषदेकडे सोपवून तातडीने मार्गी लावावी. त्यामध्ये उपविभागीय अधिकारी यांनी सतत पाठपुरावा करून तत्काळ कामे पूर्णत्वास न्यावीत. त्याची महिनाभरात वेळोवेळी माहिती द्यावी, ग्रामीण पाणीपुरवठा योजनेत मंजूर निधी परत जाता कामा नये, याची खबरदारी घेण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले.
खनिज विकास निधी अंतर्गत करावयाची कामे, आरोग्य देखभाल दुरुस्ती, कालभैरव तीर्थक्षेत्र विकास निधी, स्थानिक आमदार विकास निधीतून कुंवारा भिवसेन, आदिवासी क्षेत्रातील अतिसंवेदनशील गावात दुहेरी पंप आधारित योजनेअंतर्गत तसेच ग्रामीण सामाजिक परिवर्तन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा करण्यासाठी वेगाने कामे करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. तसेच वन विभाग, जलसंधारण विभागासोबत यासंदर्भात लवकरच बैठकही घेण्यात येणार आहे.
यावेळी खासदार कृपाल तुमाने यांनी रामटेक महसूल मंडळातील विविध अपूर्ण पाणी पुरवठा योजनांच्या कामाला गती देण्यासाठी अधिकाऱ्यांनी अधिक लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. राज्य शासनाकडून सर्वोतोपर्यंत सहकार्य होत असतांना विभागातील नागरिकांना येणाऱ्या काळात पाणी टंचाईला सामोरे जाण्याची गरज पडू नये. त्यासाठी वेगाने कामे पार पाडण्याची गरज असल्याचे सांगितले.
यावेळी आमदार मल्लीकार्जून रेड्डी यांनी रामटेक विधानसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित पाणी पुरवठा योजना का पूर्ण होत नाहीत, या बाबत अधिकाऱ्यांना विचारणा केली.
No comments:
Post a Comment