नागपूर, दि. 11: प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे. पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलींद शेंडे यांनी केले.
प्रधानमंत्री पिक विमा योजना ही आदेशान्वये अधिसुचित केलेल्या क्षेत्रातील केवळ अधिसुचित पिकांसाठी असेल. त्याचप्रमाणे अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पीकांसाठी खातेदारांचे व्यतीरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पीकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान, पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आपत्ती जसे आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग इत्यादी बाबींमुळे पिकांच्या उत्पन्नात येणारी घट, स्थायिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान, पिकांचे काढणीपश्चात होणारे नुकसानांच्या घटकांचा समावेश राहील.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेत पीक पेरणी पासून कापणीपर्यंत पिकांच्या उत्पादनात होणारी घट या करिता योजनाचा लाभ शेतकऱ्यांना मिळू शकतो. या योजनेत गहू, हरभरा, ज्वारी या पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. या करिता शेतकऱ्यांना गहू पिकाकरिता 525रुपये, रब्बी ज्वारी 390रुपये आणि हरभरा पिकाकरिता 360 रुपये भरावे लागतील. या योजनेचा लाभ घेण्याची अंतिम मुदत दि. 31 डिसेंबर 2019 आहे. या योजनेकरिता नागपूर जिल्ह्यातील भारती एक्सा जनरल इन्शुरन्स कं. लि., काम करीत आहे. शेतकऱ्यांनी या योजनेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलींद शेंडे यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment