Monday, 12 January 2026

हरभऱ्यावरील घाटेअळीच्या प्रतिबंधासाठी नियोजन आवश्यक

 



नागपूर, दि. 12 : हरभऱ्याचे पीक फुलोरा अवस्थेत असून त्यावर घाटेअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. घाटेअळी ही हरभऱ्याची प्रमुख कीड असल्याने फुले व घाट्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी किटकनाशकाची फवारणी करावी असे अवाहन विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाटगे यांनी केले आहे. 

हरभऱ्यावरील घाटेअळीची मादी पतंग पानांवर, कोवळ्या शेंड्यांवर, कळ्यांवर व फुलांवर एकेरी अंडी घालते. त्यामुळे पानावरील हरितद्रव्य खरडून खाते व पुढे अळ्या संपूर्ण पाने, देठे तसेच फुले व घाटे खातात. मोठ्या अळ्या घाट्यांना छिद्र पाडून आतील दाणे खाऊन पाटे पोखरतात. त्यामुळे अळी साधारणतः 30 ते 40 घाट्यांचे नुकसान करू शकते. नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी एकात्मिक कीड नियंत्रणाचा अवलंब करावा.

एकात्मिक व्यवस्थापनात विविध पद्धती पिकामधे फिरून घाटे अळया वेचून नियंत्रण करतात तसेच ज्या शेतामधे मका किंवा ज्वारीचा नैसर्गिक पक्षी थांबे म्हणुन उपयोग केला नसेल त्या शेतामधे बांबुचे त्रिकोणी पक्षी थांबे (प्रती हेक्टर 20 पक्षी थांबे ) तयार करून शेतामधे लावावे. त्यामुळे पक्षांचे अळया वेचण्याचे काम सोपे होते. घाटे अळीचे कामगंध सापळे (हेक्झाल्युर) एकरी दोन किंवा हेक्टरी पाच सापळे याप्रमाणे लावावेत. सापळ्यामधे सतत तीन दिवस आठ ते दहा पंतग आढळल्यास किड व्यवस्थापनाचे उपाय राबवावे. 

शेतीतील पिकाचे निरीक्षण करून किडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान संकेत पातळीच्यावर आढळून आल्यास किंवा पिक फुलोऱ्यावर आल्यानंतर घाटेअळीचे व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्क ची फवारणी तंज्ञांच्या मार्गदर्शनानुसार करावी.

हरभऱ्यांवरील पाटेअळीचे एकात्मिक व्यवस्थापनासाठी उपाययोजना करतांना किटकशास्त्र                       डॉ.डी.बी.उंदीरवाडे, यांनी सुचविलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन कृषी सहसंचालक उमेश घाटगे यांनी केले आहे.

00000


No comments:

Post a Comment