मराठी पत्रकारितेचा पाया भक्कमपणे उभारण्यासाठी ज्यांनी मोलाचे कार्य केले त्या दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांची आठवण म्हणून 6 जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो.
सुधारकांच्या पहिल्या पिढीने पाश्चात विद्या व शिक्षण आत्मसात करुन नवी जीवनमुल्ये वृत्तपत्र माध्यमाव्दारे रुजविली. त्या परंपरेचा पाया बाळशास्त्री जांभेकरांनी घातला.
बंगालमध्ये राजाराममोहन रॉय यांनी सुधारणांचे नवयुग आरंभिले तेच कार्य बाळशास्त्री जांभेकरांनी महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात नवविचारांची लाट निर्माण करण्यासाठी केले. प्रयत्नशिल व वैचारिक चळवळ सुरु करुन त्यांनी समाज सुधारणा व शिक्षणाची अभिवृध्दी हेच आपले जीवनकार्य मानले. त्या निमित्ताने हा विशेष लेख ......
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी अल्पावधीत महाराष्ट्राच्या जीवनावर विलक्षण छाप टाकली आणि राष्ट्रीय विकासासाठी पोषक अशा बहूविध क्षितिजाचा विकास केला. त्यामुळे त्यांना पश्चिम भारतातील प्रबोधनाचे प्रवर्तक म्हटले जाते. मराठी पत्रकारितेचा पाया भक्कमपणे उभारण्यासाठी त्यांनी बजावलेले कार्य हे आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदविण्यासारखे आहे.
मराठी पत्रकारितेचा पाया श्रेष्ठ दर्जाच्या संपादकाने घातला. त्यामुळे परंपरेचा सुवर्णप्रवाह विकसित झाला. प्रथम श्रेणीचे आद्य वृत्तपत्र म्हणून दर्पण पत्राची कामगिरी लक्षणीय अशी ठरली आहे. दर्पण हे वृत्तपत्र 1832 मध्ये काढून मराठी वृत्तपत्र व्यवसायाचा त्यांनी पाया घातला. त्यांनीच 1840 मध्ये दिग्दर्शन हे मराठीतील पहिले मासिक काढले. बाळशास्त्री जांभेकर यांचा लोकशिक्षण व ज्ञानप्रसार हाच हेतू, या उपक्रमांमागे होता.
सुधारकांच्या पहिल्या पिढीने पाश्चात विद्या व शिक्षण आत्मसात करुन नवी जीवनमुल्ये वृत्तपत्र माध्यमाव्दारे रुजविली. त्या परंपरेचा पाया बाळशास्त्री जांभेकरांनी घातला. बंगालामध्ये राजाराम मोहन रॉय यांनी सुधारणाचे नवयुग आरंभिले तेच कार्य बाळशास्त्री जांभेकरांनी महाराष्ट्रात केले.
विलक्षण जीवन कहाणी :-
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील पोंभुर्ले या गावी 1812 मध्ये बाळशास्त्रींचा जन्म एका पुराणिकाच्या घरी झाला. अज्ञान, दारिद्र्य आणि रुढीप्रिय समाजाच्या अध:कारातून बाहेर पडण्यासाठी सन 1825 मध्ये ते मुंबईत आहे. मुंबईत बापु छत्रे यांच्या निवासस्थानी राहून त्यांनी अध्ययन सुरु केले. आपल्या विलक्षण बुध्दीचातुर्याने व तल्लख स्मरण शक्तीने त्यांनी त्या वेळच्या मुंबईतील सार्वजनिक जीवनावर विलक्षण छाप टाकली. सन 1830 मध्ये त्यांनी ग्रंथ रचनेस प्रारंभ केला. त्यानंतर वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी 6 जानेवारी रोजी दर्पण या पत्राची मुहुर्तमेढ रोवली.
मराठी पत्रकारितेच्या विचार विश्वात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांसारखी विलक्षण कामगिरी बजावणारे बाळशास्त्री जांभेकर हे त्यामुळे युगप्रवर्तक पत्रकार ठरले. सन 1834 मध्ये भारतातील पहिले प्राध्यापक ( प्रोफेसर ) होण्याचा बहूमान त्यांना मिळाला. एलफिस्टन निधीतून त्यांच्यासाठी स्वतंत्र अध्यासन निर्माण करण्यात आले. सन 1845 मध्ये राज्यातील शिक्षण विभागाचे संचालक होण्याचा बहूमान त्यांना मिळाला. प्राध्यापक या नात्याने अध्ययन, अध्यापन संशोधन व विस्तार ही कार्ये पार पाडण्यात त्यांनी धन्यता मानली. महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात नवविचारांची लाट निर्माण करण्यासाठी वैचारिक चळवळ सुरु केली. समाज सुधारणा व शिक्षणाची अभिवृध्दी तच त्यांनी आपले जीवनकार्य मानले.
अष्टपैलू व्यक्तिमत्व :-
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या समग्र जीवनाकडे पाहिले असता त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिीमत्वाचे विलोभनीय दर्शन घडते. त्यांना देशी व विदेशी 9 भाषा अवगत होत्या. मराठी, इंग्रजी, संस्कृत प्रमाणेच बंगाली, कन्नड इत्यादीप्रमाणे त्यांनी विदेशी भाषांचाही अभ्यास केला होता. त्यांच्या अभ्यास विषयात भाषाशास्त्रे, इतिहास व संस्कृती, गणित, पदार्थविज्ञान, भूगर्भशास्त्र, पुरातत्वविद्या इत्यादींचा समावेश होता. या सर्व विषयात त्यांनी मराठी भाषेत ग्रंथरचनाही केली.
त्यांच्या कार्याबद्दल तत्कालीन वृत्तपत्रांमध्ये प्रामुख्याने बॉम्बे टाईम्स, कुरियर, ज्ञानोदय, ओरियंटल स्पेक्टेटर इत्यादी पत्रांनी वारंवार प्रशंसा केलेली आढळते व त्यांच्या समाजकार्याची नोंदही घेतलेली दिसते. तत्कालीन शाळा खात्याने त्यांच्या कार्याचा गौरव केला होता. मुंबई न्यायालयाचे त्यावेळचे न्या. सर टी. ई. पैरी यांनी त्यांचा गौरव केला होता. रे. डॉ. विल्सन, न्या. चंदावरकर या तत्कालीन विव्दानांनी बाळशास्त्री जांभेकरांच्या लोकाभिमुख विदवत्तेचा गौरव केला होता.
भारतीय राष्ट्रवादाचे पितामह दादाभाई नौरोजी हे जांभेकरांचे विद्यार्थी होते. त्यांनी गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करतांना म्हटले आहे, ते पश्चिम भारत खंडातील अर्वाचीन विद्वान मुकुटमणी, प्रख्यात पं. अव्दितीय विद्वान होते. मुंबईना समाचार या गुजराथी पत्राने या शिक्षण महर्षीची स्मृती भारतीयांनी सतत जागृत ठेवावी असे आवाहन केले होते. 17 मे 1846 रोजी जांभेकरांचा आकस्मिक मृत्यु झाला. पण अल्पावधित त्यांनी बजावलेले कार्य महाराष्ट्र जीवनाचा कायापालट करणारे ठरले.
समाजसुधारक चळवळीचा आदर्श :-
प्राध्यापक या नात्याने केवळ अध्यापन व संशोधनात ते व्यग्र होते असे नाही तर त्यांनी राष्ट्रीय जीवनात अनेक प्रागतीक चळवळींना गती दिली. सामाजिक प्रबोधनासाठी वृत्तपत्रासारखे दुसरे साधन नाही हे ओळखून त्यांनी बंगाली वृत्तपत्रांपासून प्रेरणा घेतली.
राजाराममोहन रॉय यांचे कार्य आणि बंगाली पत्रांनी केलेला झंझावाती प्रचार यामुळे ते भारुन जाऊन जांभेकरांनी नव्या पत्राचा संकल्प केला व तो कृतीत आणला. ध्येयवादी बंगाली पत्राचा वस्तुपाठ जांभेकरांनी गिरविला व त्यातून नवीन लोकचळवळ महाराष्ट्रात सुरु झाली. गंगा-जमनी व्दैभाषिक पत्र ही परंपरा बंगालातून महाराष्ट्रात पुढे आली. अशा या थोर आद्य पत्रकारास आपले लाख, लाख प्रणाम.
जगन्नाथ पाटील,
सहाय्यक संचालक (माहिती)
नागपूर .
No comments:
Post a Comment