Tuesday 30 April 2024

नागपूर शहरातील वाहतूक सुधारणांसोबतच पार्कीगचा प्रश्न प्राधान्याने सोडवा - विजयलक्ष्मी बिदरी

 नागपूर शहरातील वाहतूक सुधारणांसोबतच



पार्कीगचा प्रश्न प्राधान्याने सोडवा

-         विजयलक्ष्मी बिदरी

Ø शहर वाहतूक व्यवस्थेचा आढावा

Ø सिग्नल व्यवस्था आधुनिकीकरणासाठी  197.63 कोटी

Ø पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा

Ø समन्वयातून अपघातमुक्त शहरासाठी आराखडा

 

        नागपूर,दि.३० : नागपूर शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासोबतच सिग्नल व्यवस्था  एकाचवेळी कार्यान्वीत होण्यासाठी (सिंक्रोनाईस) १९७ कोटी ६३ लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असून येत्या जून अखेरपर्यंत वाहतूक सुरळीत करण्याची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिल्या.

 

          विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात नागपूर शहर व सभोवतालच्या परिसरातील वाहतूक व्यवस्था तसेच पार्कीगचा प्रश्न सोडविण्यासाठी  श्रीमती बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत त्यांनी सूचना केल्या.

 

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मिणा, महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, महसूल उपायुक्त प्रदीप कुलकर्णी, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त शशीकांत सातव, नगररचना विभागाचे सहसंचालक श्रीमती सु.प्र.थुल, उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भुयार आदी उपस्थित होते.

          नागपूर शहर  सभोवतालच्या परिसरात वाहतुकीसंदर्भात उपाययोजना सुचविण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे.

          नागपूर शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये आमुलाग्र बदल करुन नागरिकांना  उत्तम वाहतूक सुविधा निर्माण करण्याला प्राधान्य देण्यात आले असून त्याअंतर्गत रस्ते सुरक्षेसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. याअंतर्गत ट्रॉफिक सिग्नलच्या सिंक्रोनायझेशनचा १९७ कोटी ६३ लक्ष रुपयाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून येत्या जून पासून कामाला सुरुवात होत आहे. शहरातील वाहतूक शाखेचे आधुनिकीकरण व वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्यावश्यक अत्याधुनिक साधने उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. यामध्ये दहा टोइंग व्हॅन, पाच अतिरिक्त इंटरसेफ्टर वाहनांचा समावेश आहे.

२३ अपघात प्रवण स्थळांची विशेष दुरुस्ती

          नागपूर शहर व परिसरात २३ अपघात प्रवण स्थळ निश्चित करण्यात आले असून भविष्यात अपघात होणार नाही यादृष्टिने आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. महानगरपालिकेतर्फे १५ अपघात प्रवण स्थळांवर गतीरोधक, झेब्रा क्रॉसिंग, सूचना फलक, सिग्नल व्यवस्था, अतिक्रमण निर्मुलन तसेच डिव्हायडर दुरुस्तीची कामे करण्यात आली आहेत. अपघात प्रवण स्थळांवर होणारे अपघात टाळण्यासाठी  या ठिकाणांवर यापूर्वी झालेले अपघात, जीवीत हानी तसेच अपघात टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना बाबतचे सचित्र माहितीफलक तात्काळ लावण्याचे निर्देश श्रीमती बिदरी यांनी यावेळी दिले.

          रस्त्यावर पार्कीगमुळे होणारा वाहतूक अडथळा दूर करण्यासाठी शहरात ७५ रस्त्यांची निवडकरुन ऑन स्ट्रीट पार्कीगची सुविधा निर्माण करण्यात येत आहे. त्यापैकी पोलीस विभागाच्या समन्वयाने १५ रस्त्यांवर पार्कीग सुविधा येत्या १५ दिवसांत पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी सूचना फलक व पार्कींगची जागा निश्चित करण्याची कार्यवाही सुरु आहे.

          शहरात दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या  पार्कींगसाठी विविध भागात जागा निश्चित करण्यात आली आहे. त्यासोबतच बळकस चौक, नेताजी मार्केट, महात्मा फुले भाजी बाजार आदी ठिकाणी पार्कींगची सुविधा तसेच वाहन तळासाठी राखीव असलेल्या जागेचा शोध घेण्याची सूचना यावेळी करण्यात आल्या.

 पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्तीला प्राधान्य

          पावसाळ्यामध्ये रस्त्यावर पाणी साचणार नाही यादृष्टिने नागपूर महानगरपालिकेतर्फे खड्डे भरण्याच्या कामाला प्राधान्य देण्यात आले आहे. डिसेंबर २०२३ अखेर पर्यंत ४२ हजार ६८ चौ.मिटर क्षेत्रावरील ६३४ खड्डे भरण्यात आली आहेत.यासोबतच रस्त्यांवरील झाडांच्या आवश्यकतेपेक्षा वाढलेल्या फांद्यांची कापणी करणे, विद्युत वाहिन्यांना अडथळा निर्माण होणार नाही यादृष्टिने उपाययोजना करण्यात याव्यात. यादिशेने तात्काळ कार्यवाही सुरु करण्यात आली असून यासाठी कंत्राटदाराची नियुक्त करण्यात आल्याची माहिती प्रभारी आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी दिली.

          महसूल विभागाचे उपायुक्त प्रदीप कुलकर्णी यांनी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार करण्यात आलेल्या विविध उपायोजनांची यावेळी माहिती दिली.

0000


हज यात्रेकरुंना प्राधान्याने सोई-सुविधा पुरवा -विभागीय आयुक्त बिदरी Ø 'हज यात्रा’ सुविधा संबंधी आढावा

 




        नागपूर,दि.३० : हज यात्रेसाठी नागपूर येथून प्रस्थान करणाऱ्या यात्रेकरुंना प्राधान्याने आवश्यक सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी विविध विभाग प्रमुखांना सोपविलेली जबाबदारी  वेळेत व चोखपणे पूर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी  बिदरी यांनी आज दिले.

 

         विभागीय आयुक्त कार्यालयात श्रीमती बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली ‘हज यात्रा २०२४’ सुविधा संबंधी आढावा बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त प्रदीप कुलकर्णी, महाराष्ट्र राज्य हज समितीचे कार्यकारी अधिकारी  इम्तीयाज काजी, पोलीस प्रशासन, महानगरपालिका, विमानतळ प्रशासन, वाहतूक शाखा, सार्वजनिक बांधकाम विभाग, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, एअर इंडिया आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

 

          नागपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाहून हज यात्रेसाठी  दिनांक २६ मे ते ९ जून २०२४ दरम्यान महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्यप्रदेशातील हज यात्रेकरु प्रस्थान करणार आहेत. तर दिनांक १ ते २१ जुलै २०२४ दरम्यान यात्रेकरु हज यात्रेवरुन परतणार आहेत. या दरम्यान यात्रेकरुंची शहरातील 'हज हाऊस' येथे निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे.

 

       हज हाऊस येथे यात्रेकरुंसाठी उभारण्यात येणारे विविध मदत कक्ष, विमानतळावर पुरविण्यात येणाऱ्या आवश्यक सुविधा तसेच विमानतळावरील मदत कक्षांच्या तयारीबाबत यावेळी आढावा घेण्यात आला. यात्रेकरुंचा ‘हज हाऊस’ येथील वास्तव्य तसेच विमानतळ परिसरातील व्यवस्था याबाबत संबं‍धित शासकीय यंत्रणांनी पुरवावयाच्या सुविधा व  व्यवस्थेबाबत गतीने कार्य करावे व उत्तमोत्तम सोईसुविधा उपलब्ध करुन द्याव्या, अशा सूचना यावेळी श्रीमती बिदरी यांनी दिल्या.

 

00000

 

 

Monday 29 April 2024

मनरेगांतर्गत बांबू लागवडीला प्राधान्य द्या -मिशन महासंचालक नंदकुमार Ø नागपूर विभागाची आढावा बैठक



 

मनरेगांतर्गत बांबू लागवडीला प्राधान्य द्या

                                                                                 -मिशन महासंचालक नंदकुमार

 

Ø नागपूर विभागाची आढावा बैठक

नागपूर दि.२९ : बांबू लागवडीमुळे रोजगार निर्मिती,  पर्यावरण रक्षण, हरित आच्छादनात वाढ होते व सिंचन व्यवस्था बळकट होण्यास मदत होत असल्याने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) नागपूर विभागात  बांबू लागवडीची कामे प्राधान्याने हाती घेण्याचे निर्देश महाराष्ट्र मनरेगा मिशनचे महासंचालक नंदकुमार यांनी आज संबंधीत विभागांच्या यंत्रणांना दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात ‘समता मुलक शाश्वत पर्यावरणीय विकासातून समृध्दीसाठी मनरेगा मिशन मोडवर राबविणे’ विषयावर  श्री. नंदकुमार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

 विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, आदिवासी  विकास विभागाचे अपर आयुक्त रविंद्र ठाकरे, पर्यावरण व वातावरणीय बदलाचे संचालक अभिजीत घोरपडे, रोहयोच्या उपायुक्त राजलक्ष्मी शहा यांच्यासह नागपूर, चंदपूर, वर्धा, भंडारा,गोंदिया आणि गडचिरोली जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जलसंधारण, वने व पर्यावरण, पाटबंधारे, कृषी आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते. 

मनरेगांतर्गत चालू आर्थिक वर्षात राज्यात १ लक्ष हेक्टर क्षेत्रावर हरित आच्छादन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून गरिबी निर्मूलनात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागपूर विभागातील सहाही जिल्ह्यांमध्ये बांबू लागवडीला प्राधान्य द्यावे, अशा सूचना श्री.नंदकुमार यांनी दिल्या. बांबू लागवडीसाठी जलव्यवस्थापन आराखडा, कुरण विकास तसेच ‘जलतारा’संकल्पनेच्या अंमलबजावणीसंदर्भात  त्यांनी मार्गदर्शन केले.

मनरेगाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नियोजन, महसूल, वने व पर्यावरण, ग्रामीण विकास, कृषी, सार्वजनिक बांधकाम, मृद संधारण, सिंचन आदी विभागांनी उत्तम समन्वय राखून शेतकऱ्यांना शेती पूरक बांबू लागवडीच्या माध्यमातून आर्थिक्‍ स्त्रोत उपलब्ध करुन द्यावा. तसेच,या कार्यक्रमाच्या गुणवत्तापूर्ण अंमलबजावणीतून जनतेला गरिबीतून बाहेर काढणेही शक्य होईल. जिल्हयाच्या हवामानानुसार बांबूच्या जातिची निवड करण्याबाबतही तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विभागीय आयुक्त श्रीमती बिदरी यांनी नागपूर विभागात मनरेगा अंतर्गत बांबू लागवडीसंदर्भात राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. तसेच, बांबू लागवडीला प्राधान्य देण्याच्या सूचना केल्या. कोनबॅक बांबू संस्थेचे संजीव करपे यांनी बांबू लागवड, उत्पादन आणि विपनण आदी विषयांवर मार्गदर्शन केले. राज्यात बांबू लागवडीसाठी नेमण्यात आलेल्या टास्कफोर्स, स्टिअरिंग कमिटी आणि टेक्निकल कमिटी आदींविषयी अभिजीत घोरपडे यांनी  माहिती दिली. राजलक्ष्मी शहा यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले.

0000000

Sunday 28 April 2024

समाज व कृषी क्षेत्राच्या समन्वयाने ‘महाबिजोत्सव’ व्हावा - प्रगतीशिल शेतकरी सुभाष शर्मा ‘राष्ट्रीय बीज महोत्सवा’ला थाटात सुरुवात

 









समाज व कृषी क्षेत्राच्या समन्वयाने ‘महाबिजोत्सव’ व्हावा

- प्रगतीशिल शेतकरी सुभाष शर्मा

‘राष्ट्रीय बीज महोत्सवा’ला थाटात सुरुवात

      

नागपूर, दि. 27 :  मानवी जगण्याचा आधार असणारे पाणी, हवा आणि माती हे घटक शुद्ध व शाश्वत ठेवण्यासाठी समाज आणि कृषीक्षेत्राच्या परस्पर समन्वयातून महाबिजोत्सव व्हावा, अशा भावना प्रगतीशिल शेतकरी सुभाष शर्मा यांनी आज येथे व्यक्त केल्या.

        येथील वसंतराव नाईक कृषी विस्तार व्यवस्थापन शिक्षण संस्थेच्या (वनामती) स्व.वसंतराव नाईक स्मृती सभागृहात आयोजित राष्ट्रीय बिजोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षीय भाषणात श्री. शर्मा यांनी हे विचार मांडले. वनामतीच्या संचालक मित्ताली सेठी, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या (आत्मा) प्रकल्प संचालक डॉ. अर्चना कडू ,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे, बिजोत्सव संकल्पनेचे जनक प्रगतिशील शेतकरी वसंत फुटाणे यावेळी मंचावर उपस्थित होते.

            वनामती, आत्मा आणि बिजोत्सव समुह यांच्या संयुक्त विद्यमाने वनामती परीसरात तीन दिवसीय राष्ट्रीय बीज महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. उद्घाटन प्रसंगी श्री. शर्मा यांनी शेतीसाठी बियाण्यांचे महत्त्व विषद करतांना शुद्ध बियाण्यांसोबतच पाणी, हवा आणि माती हे घटक शुध्द व चिरंतण ठेवण्याचे आवाहन सद्य:स्थितीत असल्याचे सांगितले. हे आवाहन पेलण्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीने स्वत:ची जबाबदारी समजून योगदान देण्याची व कृषी क्षेत्राचा उत्त्म समन्वय ठेवण्याची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले. या समन्वयातून देशात ठिकठिकाणी महाबिजोत्सवाचे आयोजन होवून सकारात्मक बदल घडेल, असा विश्वास त्यांनी श्री. शर्मा यांनी व्यक्त केला. त्यांनी कृषी क्षेत्रासमोरील विविध आव्हानांबाबत विस्तृत माहिती दिली.

            मित्ताली सेठी म्हणाल्या की, आपल्या आवतीभवती शेतीत वेग-वेगळे संशोधन, नव-नवे प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांनी वनामती संस्थेसमोर आपल्या संकल्पना मांडाव्यात त्या जास्तीत-जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी  संस्था पुढाकार घेईल. कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठी शेतीतील नवनवीन प्रयोग व संशोधनाला सर्वदूर पोहचविणे, संशोधन व्यवस्थापन, जीआयएस, कृषी उत्पादक शेतकरी आदी घटकांना एकत्र आणून यास चळवळीचे स्वरुप देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

            रविंद्र मनोहरे यांनी उपस्थितींना मार्गदर्शन केले. डॉ. अर्चना कडू यांनी प्रस्ताविक केले. बीजोत्सव समुहाच्या समन्वयक कीर्ती मंगरुळकर यांनी सूत्रसंचालन केले तर प्राची माहुरकर यांनी आभार मानले.

            शेतकरी, स्वयंसेवी संस्था, संशोधक, सरकारी तसेच शैक्षणिक संस्था यांच्यात समन्वय वाढवून येणाऱ्या पिढ्यांसाठी व पर्यावरणाला अनुकूल सुरक्षित पोषक अन्न उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने 27 ते 29 एप्रिल 2024 या कालावधीत राष्ट्रीय बीज महोत्सवाचे आयोजन  करण्यात आले आहे. यात परंपरागत बियाण्यांचे प्रदर्शन, सेंद्रिय व नैसर्गिक शेतमाल प्रदर्शन व विक्री, भरडधान्य पाककृती कार्यशाळा आणि पर्यावरण संतुलन विषयावर चित्रकला स्पर्धा आदी उपक्रम होत आहेत. मध्यप्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, पश्चिम बंगाल, आंध्रपदेश, तामिलनाडू आदी 18 राज्यातील बीज उत्पादक शेतकरी या महोत्सवात सहभागी झाले आहेत. या महोत्सवात सुरक्षित पोषक अन्न, शाश्वत शेतीचे तंत्र आणि देशी बियाणांच्या जातींचे जतन व प्रसार करण्यासाठी शेतकऱ्यांना मंच उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

शेतकऱ्यांसाठी विविध कार्यशाळा

महोत्सवात तीनही दिवशी शेतकऱ्यांसाठी विविध विषयांवर कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार 27 एप्रिल रोजी ‘बियाणे संवर्धन आणि व्यवस्थापनामधील आव्हाने व संधी’ या विषयावर संजय पाटील यांचे मार्गदर्शन झाले. तसेच, सुभाष शर्मा यांचे ‘हवामान बदलासह पीक पध्दती बदलणे’ विषयावर आणि ‘शेतकऱ्यांना खात्रीशिर उत्पन्न व ग्राहकांना सुरक्षित अन्न’ विषयावर रश्मी बक्षी यांनी मार्गदर्शन केले.

रविवार 28 एप्रिल रोजी ‘नैसर्गिक संसाधने’ विषयावर दादा शिंदे तर ‘दुषित आणि सेंद्रिय मातीचा अभ्यास आणि मानवी आरोग्यावर होणारा त्यांचा परिणाम’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार व डॉ. मीना शेलगावकर मार्गदर्शन करतील. ‘जैवविविधतेचे संरक्षण ग्रामसभा व एफआरए द्वारे सहभागी पध्दतीने बाजरीच्या पाककृती आणि त्यामागील विज्ञान’ विषयावर अंजली महाजन मार्गदर्शन करणार आहेत.

समारोपाला सोमवार, 29 एप्रिल रोजी ‘जैव संसाधन इनपुट केंद्राची स्थापना’ विषयावर एनसीएनएफ आणि शेतकऱ्यांद्वारे तर ‘महिला शेतकरी बीज संवर्धनाच्या कथा’ विषयावर सुवर्णा दामले मार्गदर्शन करणार आहेत.

महोत्सवात आज मुलांसाठी चित्रकला स्पर्धा

रविवार 28 एप्रिल रोजी वनामती येथे ‘भविष्यातील पर्यावरण संतुलन’ विषयावर 8 ते 12 वर्ष व 13 ते 16 वर्ष वयोगटातील मुलांसाठी सकाळी 9 वाजता चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. जास्तीत-जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आत्मातर्फे करण्यात आले आहे.

******

 

Monday 1 April 2024

माहिती संचालक गणेश रामदासी सेवानिवृत्त ; संचालक कार्यालयातर्फे निरोप

 



 

नागपूर दि. ३१ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर-अमरावती विभागाचे संचालक गणेश रामदासी हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले असून त्यांना कार्यालयाच्यावतीने निरोप देण्यात आला.

माहिती संचालक कार्यालयात आयोजित निरोपसमारंभास माध्यम समन्वय अधिकारी अनिल गडेकर, सहायक संचालक पल्लवी धारव, विभागीय माहिती केंद्राचे प्र.जिल्हा माहिती अधिकारी रितेश भुयार यांच्यासह संचालक कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय आणि विभागीय माहिती केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.

माहिती संचालक श्री. रामदासी हे वर्ष २००२ मध्ये माहिती व जनसंपर्क विभागाच्या दिल्ली स्थित महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक म्हणून रूजू झाले होते. यानंतर त्यांनी केंद्रीय वने व पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय कृषी राज्यमंत्री तारीक अन्वर यांचे अतिरीक्त स्वीय सहायक म्हणून जबाबदारी सांभाळली. मराठवाडा विभागाचे माहिती संचालक म्हणून वर्ष २०१८ मध्ये त्यांची पदोन्नती झाली. यानंतर  मुंबई येथे संचालक प्रशासन, संचालक वृत्त व जनसंपर्क पदाचा कार्यभार सांभाळला. श्री. रामदासी यांची नागपूर-अमरावती विभागाचे माहिती संचालक म्हणून नियुक्ती झाली होती. नियत वयोमानानुसार ते आज सेवानिवृत्त झाले आहेत.

गणेश रामदासी आणि त्यांच्या पत्नी गायत्री रामदासी यांचे स्वागत करून भेट वस्तू देत निरोप देण्यात आला. माहिती व जनसंपर्क विभागात विविध पदांवर काम करीत असतांना आलेले अनुभव तसेच प्रसिद्धी विषयक कामाचा अनुभव श्री.रामदासी यांनी यावेळी कथन केला व सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सकारात्मकदृष्टीकोण बाळगावा असेही त्यांनी सांगितले. श्री रामदासी यांच्या दिल्लीतील वैविद्यपूर्ण कारकिर्दीवर रितेश भुयार यांनी प्रकाश टाकला, श्री. गडेकर यांनी मनोगत व्यक्त केले. पल्लवी धारव यांनी सूत्रसंचालन केले.

                                                        00000