Monday, 31 March 2025

आदिवासी आश्रमशाळांचा दर्जा सुधारण्यासाठी नियंत्रण समिती - डॉ. अशोक उईके

 


Ø  आदिवासी विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहात अत्याधुनिक सुविधा

Ø  शिक्षण क्षेत्रातील विविध संस्थाचे मार्गदर्शन

Ø  नविन शिक्षण धोरणानूसार उपक्रमांची आखणी

Ø  रविंद्र ठाकरे यांनी सुरू केलेले उपक्रम कायम राहणार

नागपूर, दि. 31 :   अतिदुर्गम भागात राहणारा आदिवासी समाज आपल्या संस्कृतीचे संवर्धन करत असला तरी शिक्षणापासून वंचित राहणार नाही. यासाठी शिक्षणाच्या सर्व सुविधा आश्रमशाळांच्या माध्यमातून त्यांच्या पर्यंत पोहचविणे आवश्यक आहे. आश्रमशाळा तसेच वस्तीगृहामध्ये उपलब्ध असलेल्या सुविधांमध्ये वाढ करतांनाच आश्रमशाळांचा दर्जा वाढविण्यासाठी नियंत्रण समिती तयार करण्यात येणार असल्याची घोषणा आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईक यांनी केली.

वनामती येथील सभागृहात आदिवासी विकास विभागातर्फे नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचे सादरीकरण तसेच यासाठी सहाय्य करणाऱ्या संस्थांचा गौरव समारंभ आदिवासी विकास मंत्री यांच्या प्रमुख उपस्थित आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री शंकरबाबा पापळकर होते. यावेळी अतिरिक्त आदिवासी उपायुक्त रविंद्र ठाकरे, उपायुक्त दिगंबर चव्हाण, प्रकल्प अधिकारी रंजित यादव (गडचिरोली), कुशल जैन (अहेरी), दिपक हेडाऊ (वर्धा), विकास राचेलवार (चंद्रपूर), प्रविण लाटकर (चिमूर), निरज मोरे (भंडारा), उमेश काशीद (देवरी), उपसंचालक डॉ. पुरूषोत्तम मडावी, शिवराम भलावी, दिनेश शेराम, डॉ. गोडवते, अधिक्षक अभियंता उज्वल डाबे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. पद्मश्री मिळाल्यानंतर शंकरबाबा पापळकर व रविंद्र ठाकरे यांचा सेवानिवृत्तीनिमीत्त गौरव करण्यात आला.

आदिवासींच्या जिवनात आर्थिक व सामाजिक परिवर्तना सोबतच संपूर्ण समाज शैक्षणिकदृष्ट्या प्रगत होईल यादृष्टीने काम करण्याची आवश्यकता असून आदिवासी विभागाची अपर आयुक्त रविंद्र ठाकरे यांनी मागिल चार वर्षात विविध उपक्रमांच्या माध्यमातून या समाजाच्या सर्वांगिन विकासाला प्रोत्साहन दिले आहे. आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवावी यासाठी बोलका वर्ग, ब्रायटर माईंड आदी शैक्षणिक उपक्रम राबविले. याउपक्रमामुळेच अनेक विद्यार्थी गुणवत्त यादीत येवू शकले. त्यांनी सुरू केलेले सर्व उपक्रम यापुढेही कायम सुरू राहतील असा विश्वास आदिवासी विकास मंत्री डॉ. उईके यांनी व्यक्त केला.

आदिवासी विभागाच्या अंतर्गत असलेल्या सर्व आश्रमशाळा व वस्तीगृहामध्ये विद्यार्थ्यांसाठीच्या सुविधांमध्ये आमुलाग्र बदल करण्याची आवश्यकता आहे. नविन अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांना अत्याधुनिक पद्धतीचे शैक्षणिक साहित्य पुरविणे आवश्यक आहे. वस्तीगृहामध्ये असलेल्या सोयी व सुविधा कशा वाढविता येईल यासाठी प्रत्येक आश्रमशाळेसाठी नियंत्रण समिती तयार करण्यात यावी व ही समिती नियमीत विद्यार्थ्यांसोबत संवाद साधेल तरच प्रत्येक आदिवासी मुलाला शैक्षणिक सुविधा उपलब्ध होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. आदिवासी आश्रमशाळांच्या शैक्षणिक उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या विविध संस्था व व्यक्तींचा प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला.

पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांनी आदिवासी समाज हा प्रमाणिक व मेहनती असल्यामूळे जंगलांच्या संवर्धनासाठी महत्वाची भुमिका बजावत आहे. आदिवासी भागात शिक्षणाच्या सुविधा निर्माण करून दर्जेदार शिक्षण मिळेल यासाठी विभागाने पुढाकार घेण्याची आवश्यकता व्यक्त केली. आदिवासी भागातील प्रत्येक मुलगा शाळेत येईल. यासाठी  उपाययोजना कराव्यात असे आवाहन यावेळी करण्यात आले.  

00000


नागपूर येथे वैदिक गणिताचे गुणवत्ता केंद्र सुरू व्हावे; शासन सर्वतोपरी मदत करेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 


Ø  वैदिक गणिताच्या खंडांचे प्रकाशन

        नागपूर, दि. 31 : भारतात विकसित झालेल्या विविध शास्त्रांचा पाया गणितावर आधारित आहे. वैदिक गणिताच्या खंडाद्वारे हे ज्ञान नव्याने समाजासमोर येणार आहे. या वैदिक गणिताची महती व उपयोग येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. त्याकरिता भारती कृष्ण विद्या विहार येथे वैदिक गणिताचे गुणवत्ता केंद्र उभारले जावे, अशा अपेक्षा व्यक्त करत यास शासनातर्फे संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

            विश्व पुनर्निर्माण संघ संचालित भारती कृष्ण विद्या विहार शाळेमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत जगदगुरू शंकराचार्य कृष्ण तीर्थ महाराज प्रणित  'वैदिक मॅथेमॅटिक्स बेसिक टु ॲडवान्स' आणि 'वैदिक गणित सूत्र अरिथमॅटिक' या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. वैदिक गणिताच्या दोन खंडांचे प्रकाशन झाले. त्यावेळी मुख्यमंत्री श्री फडणवीस बोलत होते. विश्व पुनर्निर्माण संघाचे अध्यक्ष प्रफुल्लकुमार काळे, सरचिटणीस शैलेश जोगळेकर, संचालक मंडळाचे सदस्य यावेळी उपस्थित होते.



            मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, प्राचीन भारतीय संस्कृतीत अनेक महत्वाची शास्त्र विकसित झाली आहे. मात्र, प्राप्त परिस्थिती व परकीय आक्रमण आदींमुळे या शास्त्रांतील ज्ञान सर्वांपर्यंत पोहचू शकले नाही.  आद्य शंकराचार्य कृष्ण तीर्थ महाराज यांनी वेद ऋचांचा अभ्यास करून सोप्या पद्धतीने संपूर्ण गणिताची मांडणी वैदिक गणित खंडांमध्ये केली आहे. केंद्रीय माध्यमिक मंडळाच्या इयत्ता पाचवी ते सातवी च्या अभ्यासक्रमात या पुस्तकाचा समावेश करण्यात आला आहे. या खंडांच्या माध्यमातून वेदांमधील ज्ञानाचा साठा शंकराचार्यांनी शोधला आहे. वैदिक गणित ही भारताची महत्वाची मोठी ज्ञान संपदा आहे. त्याचे संशोधन व संवर्धन होण्याच्या दृष्टीने भारती कृष्ण विद्या विहारामध्ये गुणवत्ता केंद्र उभारले जावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच राज्याच्या शिक्षण विभागाद्वारे वैदिक गणित विषय विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी सकारात्मक विचार करू असेही त्यांनी सांगितले.  

            सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले, मानवी जीवनात अनेक प्रसंगांमध्ये गणना, आकडेवारीचे अनन्य साधारण महत्व आहे. सांख्यदर्शन, वक्ररचना निर्देशांक यांच्यासह नल-दमयंती आख्यान, महाभारत आदींमधील उदाहरणे देवून त्यांनी गणिताचे महत्व विषद केले. प्राचीन भारतीय परंपरेतून आलेल्या वैदिक गणिताचा विचार हा विश्व कल्याणासाठी आहे. जगात अध्यात्मावर आधारित  घडत असलेल्या विविध परिवर्तन आणि पुनर्रचनेमध्ये वैदिक गणितही महत्वाची भूमिका निभावू शकते आणि जगाला सुखी व समृद्ध बनविण्यातही मोलाचे योगदान देवू शकते असे त्यांनी सांगतिले.

              विश्व पुनर्निर्माण संघाचे अध्यक्ष प्रफुल्लकुमार काळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर  सरचिटणीस शैलेश जोगळेकर यांनी आभार मानले.


000000

नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमतेसाठी जिल्हा सहकारी बँकेचे पुनरुज्जीवन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 


जिल्हा सहकारी बँकेला आता शक्तीशाली जोड

-  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Ø                                                                महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडे जिल्हा सहकारी बँकेच्या संस्थात्मक प्रशासकत्वाची जबाबदारी

नागपूर,दि. 30 : ज्या जिल्ह्यात जिल्हा सहकारी बँकांचे जाळे सक्षमपणे कार्यरत आहे त्या जिल्ह्यातील शेतकरी अधिक सुखी असल्याचे आपण पाहतो. याचबरोबर अशा जिल्ह्यांमध्ये शेतीपुरक उद्योगाने चांगला आकार घेतल्याचे आपल्या निर्दशनास येते.  या दृष्टीने विचार करुन नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्टया बळकट करण्यासाठी जिल्हा सहकारी बँकेच्या संस्थापक प्रशासकत्वाची जबाबदारी आजपासून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडे सुपूर्द केल्याने शेतकऱ्यांच्या प्रगतीचा मार्ग अधिक व्यापक होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर दि. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला संस्थापक प्रशासक नियुक्ती सोहळ्यात ते बोलत होते. गुडीपाडव्याचे औचित्य साधून नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित या विशेष समारंभास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सहकार राज्यमंत्री पंकज भोयर, वित्त व नियोजन, कृषी व मदत पुनर्वसन राज्यमंत्री आशिष जैस्वाल, आमदार आशिष देशमुख, आमदार चरणसिंग ठाकूर, सहकार आयुक्त दिपक तावरे, प्रशासक विद्याधर अनास्कर आदी मान्यवर उपस्थित होते.

नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात देणारी हक्काची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा सहकारी बँकेत काही वर्षांपूर्वी आर्थिक घोटाळा झाला. 2015 ते 2019 या कालावधीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण बँकेला यातून सावरण्यासाठी खूप प्रयत्न केले. तेव्हा सरकारकडून तीनशे कोटी रुपये एवढा निधी दिला. परंतु बँक यातून सावरली नाही. आमदार आशिष देखमुख यांनी प्रशासक पदाबाबत केलेल्या विनंतीचा विचार करुन आपण हा पहिला प्रयोग करत आहोत. सहकार आयुक्तालयाने यात यथायोग्य भूमिका निभावून येत्या दीड वर्षात नागपुरची जिल्हा सहकारी बँक आर्थिक फायद्यात येईल याची खात्री दिली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

                                                     जिल्हा सहकारी बँकेला आता शक्तीशाली जोड

             केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुडीपाडव्याच्या औचित्याने नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलेली ही अपूर्व भेट आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या रुपाने नागपूर जिल्हा सहकारी बँकेला आता एक शक्तीशाली जोड मिळाली. येत्या दोन वर्षात ही बँक फायद्यात येण्यासह जिल्ह्यात सहकाराचे जाळे अधिक भक्कम होईल, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

आमदार आशिष देशमुख यांनी जिल्हा सहकारी बँकेत सर्वांनी मुदत ठेवी दाखल करुन आकर्षक योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी केले. शिखर बँका, जिल्हा बँका व विविध कार्यकारी संस्था या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. यावर्षी राज्य बँकेने 52 हजार कोटी रुपयांच्या आर्थिक उलाढालीचा टप्पा पार केला असून 650 कोटींपेक्षा अधिक नफा बँकेने प्राप्त केल्याचे अनास्कर यांनी सांगितले.

0000


Sunday, 30 March 2025

पंतप्रधानांच्या हस्ते सोलर एक्सप्लोसीव्ह टेस्टे रेंज व रनवे चे उद्घाटन

 



नागपूर, दि. 30 : नागपूर – अमरावती रोडवरील बाजारगाव स्थित सोलर एक्सप्लोसीव्ह टेस्ट रेंज आणि रनवे सुविधेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज संपन्न झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सोलर कंपनीचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल, कंपनीचे व्यवस्थापकीस संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनिष नुवाल, सोलर डिफेंस ॲन्ड एरोस्पेस लिमिटेडचे कार्यकारी संचालक वासुदेव आर्या उपस्थित होते.

 



            पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोटेरिंग म्युनिशन टेस्ट सुविधेचे तसेच भारतातील पहिली अनमॅन एरियल सिस्टीम (युएसए), 1.27 कि.मी. चे रनवे, हँगर्स आणि रिपेअर लेनचे रिमोटद्वारे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी सोलर ग्रुप द्वारा निर्मित अत्याधुनिक सुरक्षा यंत्राचे अवलोकन केले. कार्यक्रमाला कंपनीचे उपमहाव्यवस्थापक श्याम मुंदडा व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

००००००


संघटन, समर्पण आणि सेवेची त्रिवेणी देशाला पुढे घेऊन जाणार – पंतप्रधान नरेंद्र मोदी

 



Ø  
माधव नेत्रालयाने जनतेच्या जीवनात प्रकाश आणण्याचे महत्तम कार्य केले

माधव नेत्रालय मध्य भारतातील आरोग्य क्षेत्रात महत्वाची नेत्र संस्था ठरेल

                                                                   – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Ø  माधव नेत्रालयाच्या प्रीमियम सेंटरचे भूमिपूजन

Ø  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती

नागपूर, दि. 30 : संघटन, समर्पण आणि सेवेची त्रिवेणी भारत देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी महत्वाचे सूत्र ठरणार असून विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी याचा अवलंब करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले. गोरगरिबांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी केंद्र शासन कसोशीने कार्य करीत आहे. माधव नेत्रालयानेही या कार्यात योगदान देत गेल्या तीन दशकांपासून लोकांच्या जीवनात प्रकाश आणण्याचे मोलाचे कार्य केल्याचे गौरवोद्गार, त्यांनी काढले.  

हिंगणा रोड वरील माधव नेत्रालयाच्या प्रीमियम सेंटरचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिजिटल पद्धतीने भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, स्वामी अवधेशानंद गिरी, स्वामी गोविंद देव गिरी, माधव नेत्रालय चॅरिटेबल ट्रस्टचे सरचिटणीस डॉ. अविनाशचंद्र अग्निहोत्री यावेळी उपस्थित होते.

 

पंतप्रधान श्री. मोदी म्हणाले, पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना आरोग्य  क्षेत्रातील सुधारणांमध्ये देशाला पुढे घेऊन जाण्याचा संकल्प जाहीर केला. गेल्या दशकात ग्रामीण भागात लाखो आयुष्मान भारत केंद्रे उभारण्यात आली. कोट्यवधी लोकांना आरोग्य सेवा पुरविण्यात आल्या. टेलिमेडिसिनद्वारे उपचार व आरोग्य सेवा सशक्त करण्यात आल्या. एम्ससारख्या संस्थांची संख्या तिपटीने वाढविण्यात आली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रथमच देशात वैद्यकीय शिक्षण मातृभाषेत उपलब्ध करून दिले. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा वाढविण्यात आल्या आहेत. योग आणि आयुर्वेदालाही जगात मानाचे स्थान मिळाले आहे. आरोग्य सेवेपासून कुणी वंचित राहू नये असे शासनाचे धोरण असून त्यानुसार सक्षमपणे कार्य सुरू आहे. 


 

 आरोग्य सेवांचे जाळे निर्माण करण्यात आले. आयुष्मान भारतसारख्या योजनांद्वारे गोरगरिबांपर्यंत आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहेत. आरोग्य क्षेत्रातील सुधारणांचा हाच वसा माधव नेत्रालय पुढे घेऊन जात आहे.  द्वितीय सरसंघचालक माधवराव गोळवलकर गुरुजी यांच्या आदर्शावर मार्गक्रमण करत नेत्रालयाने अंध:कार दूर करीत लोकांच्या जीवनात प्रकाश आणला आहे. प्रीमियम सेंटरमुळे या नेत्रालयाच्या कार्याचा विस्तार होऊन त्यास गती मिळेल. तसेच देशातील आरोग्य क्षेत्राच्या प्रगतीतही या संस्थेचे भरीव योगदान राहील.

विदर्भातील थोर संत प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज हे जन्मतः अंध होते. मात्र अंधत्वावर मात करीत त्यांनी ज्ञानाची दृष्टी विकसित केली. दृष्टी बोधातून येते व विवेकातून प्रगट होते याचा आदर्श वस्तुपाठच त्यांनी घालून दिला आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ अशा देशातील संतांनी भारताला एकसंध ठेवत उत्तम शिकवण दिली. माधव नेत्रालयानेही त्यांच्या विचारांची कास धरत कार्य केले आहे. समाजसेवेचे हे कार्य अव्याहत पुढे जावे, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.

 

माधव नेत्रालय मध्य भारतातील आरोग्य क्षेत्रात महत्वाची नेत्र संस्था ठरेल

                                                            – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            दृष्टी ही ईश्वराने मानवाला दिलेला मौल्यवान ठेवा आहे.  ज्यांच्याकडे दुर्देवाने ही दृष्टी नाही त्यांच्या जीवनात प्रकाश आणण्याचे कार्य माधव नेत्रालय गत तीन दशकांपासून करीत आहे. देशात व राज्यात नेत्र आरोग्य क्षेत्रात भरीव सेवा देण्याची आवश्यकता आहे. माधव नेत्रालयासारख्या संस्था सातत्यपूर्ण सेवा कार्य करीत या क्षेत्रामध्ये भरीव योगदान देत आहेत. नेत्रालयाचे प्रीमियम सेंटर अस्तित्वात आल्याने मध्य भारतातील नेत्र आरोग्य क्षेत्रात सेवा देणारी माधव नेत्रालय ही महत्वाची संस्था ठरणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

                   लोककल्याणाच्या प्रेरणेतून माधव नेत्रालयाचे जीवनदृष्टी देण्याचे कार्य –

                                                                सरसंघ चालक डॉ मोहन भागवत

             नि:स्वार्थ भावनेतून लोककल्याणाच्या प्रेरणेने माधव नेत्रालय अव्याहतपणे कार्यरत असून दृष्टीबाधितांना जीवनदृष्टी देण्याचे महत्वपूर्ण कार्य करीत असल्याचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यावेळी म्हणाले. चैत्र प्रतिपदेचा दिवस आणि माधव नेत्रालयाच्या प्रीमियम सेंटरचे भूमीपूजन हा एक शुभ योग असल्याचे सांगत शुभ योगासाठी तप:श्चर्येची आवश्यकता असते.  तप:श्चर्येतून पुण्य लाभते व पुण्यातून फळ मिळते या मागची प्रेरणा लोककल्याण आहे. चांगल्या कर्मातून प्राप्त फळाचा उपयोग विश्व कल्याणासाठी करण्याची प्रत्येक माणसाची भूमिका असल्यास सर्वांचे जीवन निरामय होईल, असे ते म्हणाले.   

 

              ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ या माधव नेत्रालयाचा आतापर्यंतचा प्रवास दर्शविणाऱ्या स्मरणिकेचे पंतप्रधान श्री. मोदी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. माधव नेत्रालयाचे सचिव डॉ. अविनाशचंद्र अग्निहोत्री यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. शांतीमंत्राने कार्यक्रमांची सांगता झाली.

            महसूल व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विधी व न्याय राज्यमंत्री ॲड. आशिष शेलार, गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

                                

माधव नेत्रालयाविषयी...

 

द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिवराव गोळवलकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नागपुरात माधव नेत्रालयाची स्थापना १९९५  मध्ये झाली. वासुदेवनगर येथील माधव नेत्रालय सिटी सेंटर २०१८ पासून सेवेत आहे. या नेत्र चिकित्सालयातून आधुनिक तंत्रज्ञानाने गरीब रुग्णांवर कमी खर्चात उपचार होतात. 

 

अशी असेल नवीन वास्तू

 

माधव नेत्रालयाची नवीन वास्तू हिंगणा रोडजवळील वासुदेवनगर येथे ५.८३ एकर जागेत बांधण्यात येणार आहे. येथे आधुनिक उपकरणांनी सुसज्ज २५० खाटा, १४ बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) आणि १४ अत्याधुनिक शस्त्रक्रिया केंद्र, नेत्रपेढी, संशोधन केंद्र असेल. सर्वत्र हिरवळ, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौर ऊर्जा अशी व्यवस्था या परिसरात राहणार आहे.

 

                                                  ०००००


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दीक्षाभूमीला भेट

 




नागपूर, दि. 30:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी दीक्षाभूमीला भेट देऊन अभिवादन केले.

 

 पंतप्रधान श्री. मोदी यांनी दीक्षाभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीकलशाला  अभिवादन केले. तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला अभिवादन करून बुद्धवंदना दिली.

 

दीक्षाभुमी स्मारक समितीचे अध्यक्ष भंते सुरई ससाई यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, स्मारक समितीचे सचिव राजेंद्र गवई उपस्थित होते.



 

अभिप्राय नोंदवहीत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पंचतीर्थांपैकी एक असलेल्या नागपूर स्थित दीक्षाभूमीला भेट देण्याचे सौभाग्य लाभल्याने  मी भारावून गेलो आहे. या पवित्र स्थळाच्या वातावरणात बाबासाहेबांच्या सामाजिक समता, समानता आणि न्यायाच्या तत्त्वांचा अनुभव येतो. दीक्षाभूमी आपल्याला गरीब, वंचित आणि गरजूंसाठी समान हक्क आणि न्यायाच्या व्यवस्थेसह पुढे जाण्याची ऊर्जा प्रदान करते. मला पूर्ण विश्वास आहे की या अमृत काळात आपण बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिकवणी आणि मूल्यांचा मार्ग अनुसरून देशाला प्रगतीच्या नवीन शिखरावर नेऊ. एक विकसित आणि सर्वसमावेशक भारत घडवणे हीच बाबासाहेबांना आपली खरी श्रद्धांजली ठरेल’, असा संदेश यावेळी पंतप्रधान श्री. मोदी यांनी यावेळी नोंदविला.

 

000000

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्मृती मंदिराला भेट हे स्थळ राष्ट्रसेवेसाठी पुढे जाण्याची प्रेरणा देते - पंतप्रधान नरेंद्र मोदी

 



  नागपूर, दि. 30:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती मंदिर परिसराला भेट देऊन आद्य सरसंघचालक पू. केशव बळीराम हेडगेवार यांचे समाधी स्थळ, तसेच द्वितीय सरसंघचालक पू. माधव सदाशिव गोळवलकर यांच्या यज्ञवेदीस्वरूप स्मृतिचिन्हाचे दर्शन घेतले.

 



‘हे स्मृती मंदिर भारतीय संस्कृती, राष्ट्रवाद आणि संघटनशक्ती या मूल्यांना समर्पित आहे. ते आपल्याला सतत राष्ट्रसेवेसाठी पुढे जाण्याची प्रेरणा देते. या दोन महापुरूषांची स्मृती जागविणारे हे स्थळ देशसेवेला समर्पित लाखो स्वयंसेवकांसाठी ऊर्जा केंद्र आहे’, असा संदेश यावेळी पंतप्रधान श्री. मोदी यांनी यावेळी अभ्यागतांच्या अभिप्राय नोंदवहीत नोंदविला.



 

  यावेळी त्यांनी महर्षी व्यास सभागृह, दत्तोपंत ठेंगडी सभागृह व परिसराची पाहणी केली, तसेच उपस्थितांशी संवाद साधला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते. माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी स्वागत केले.

00000

Saturday, 29 March 2025

सिकलसेल व जनुकीय आजारांवर अधिकाधिक संशोधन भर आवश्यक - राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

 



Ø  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती

Ø  एम्स नागपूरचा पहिला दीक्षांत समारंभ उत्साहात

 

नागपूर, दि. 29 - वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी जनुकीय आजार तसेच स्टेम सेल आणि वृद्धत्वाशी निगडीत आजारांवर अधिकाधिक संशोधन करण्याची गरज आहे. उपचार पद्धती त्या दिशेने आखल्या पाहिजेत, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज केले.

 मिहान परिसरात आयोजित अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या पहिल्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी,  खासदार डॉ. अजित गोपछडे, खासदार श्यामकुमार बर्वे, एम्स नागपूरचे अध्यक्ष डॉ. अनंत पांढरे, कार्यकारी संचालक डॉ . प्रशांत जोशी यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नातून पूर्वी केवळ दिल्लीत असलेले एम्स आता तामिळनाडू, झारखंड या राज्यात तसेच नागपूरसह अनेक शहरात स्थापन झाले आहे. दिल्लीच्या एम्समध्ये रुग्णांच्या नातेवाईकांना तसेच सहाय्यकांना निवासाची सोय मिळावी म्हणून शेल्टर हॉल सुद्धा निर्माण करण्यात आले आहेत. एम्स नागपूरच्या स्थापनेपासून सर्वात आधी पदवी घेऊन बाहेर पडलेली पहिली तुकडी म्हणून आपली या संस्थेच्या इतिहासात नोंद केली जाईल. वैद्यकीय विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण कधीच थांबवू नये. त्यांनी या क्षेत्रातील नियतकालिकांचा अभ्यास करून यातील नव नवे संशोधन समजून घेत आपले ज्ञान अद्ययावत करावे असे आवाहन त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले.



 केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर एम्समध्ये हृदय ,यकृत तसेच अवयव प्रत्यारोपणाबाबत आणि पूर्व विदर्भात प्रामुख्याने असणाऱ्या थॅलसेमिया, सिकलसेल या आजारावर अत्याधुनिक उपचार उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे सांगितले. बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन सारख्या शस्त्रक्रियांना देखील राज्य शासनाच्या योजनेतून एम्समध्ये सवलत मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

        दीक्षांत समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले. 2018 मध्ये एम्स नागपूरला मिहान येथे सुमारे 200 एकर जमीन महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिली.गेल्या 6 वर्षात एम्स नागपूरने आरोग्य क्षेत्रामध्ये एक महत्वाची भूमिका बजावली आहे. येत्या काळातही ही संस्था वैद्यकीय क्षेत्रात मोलाचे योगदान देईल, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले.                                                                                                                           

विद्यार्थ्यांना पदवीप्रदान

दीक्षांत समारंभात 2018 च्या तुकडीची विद्यार्थीनी  डॉ. जिज्ञासा जिंदाल यांना अंतिम व्यावसायिक परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल तसेच कम्युनिटी मेडिसिन आणि बालरोग शास्त्र विषयात सर्वात जास्त गुण मिळवल्याबद्दल डॉ. संजय पैठणकर सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. डॉ. अभिजित यांना द्वितीय तर  डॉ . हिमांशू गजभिये यांना तृतीय  क्रमांक प्राप्त केल्याप्रसंगी तसेच वेगवेगळ्या विषयात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सुवर्णपदक आणि  रोख पारितोषिक दिले गेले. यासोबतच 121 एमबीबीएस पदवीधारकांना आणि 24 पदव्युत्तर पदवीधारकांना पदवीप्रदान करण्यात आली. या कार्यक्रमाला एम्सचे शिक्षक, अधिकारी विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते .

 0000


मराठी भाषेची समृद्धी जपा - राजेश खवले

 



Ø  मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विविध कार्यक्रम

     नागपूर, दिनांक : 29, मराठी भाषेला वैभवशाली वारसा लाभला असून संस्कृतीची जोपासना आणि संवर्धनासाठी मराठी भाषेचे महत्त्व लक्षात घेता. भाषेच्या संवर्धनासाठी दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त व्हायला हवा, असे प्रतिपादन महसूल अपर आयुक्त राजेश खवले यांनी केले.

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी भाषा संवर्धन, एकचिंतन तसेच काव्य वाचनाचा कार्यक्रम नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आला होता. मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना श्री. खवले यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अपर आयुक्त तेजोसिंग पवार, महानगर पालिकेच्या उपायुक्त विजया बनकर, उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, मराठी भाषा अधिकारी शिल्पा सोनाले, कवी व व्याख्याते प्रताप वाघमारे, गझलकार अझीझ खान पठाण, हास्य कवी गोपाल मापारी, सुप्रसिद्ध अभिनेता व गझलकार किशोर बळी, सहायक भाषा संचालक संतोष गोसावी, तहसिलदार संदिप माकोडे आदी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये मराठी भाषा विषयावरील निबंध स्पर्धेत चेतन नागपूरे यांना प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर कुंदा निशाने यांना द्वितीय क्रमांकाचा आणि मृणालिनी वंजारी यांना तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रश्न मंजूषा स्पर्धेत पंकज बोरकर व चेतन नागपूरे यांना प्रथक क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर सचिन चव्हाण यांना द्वितीय क्रमांकाचा आणि रितेश भूयार यांना तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शुद्धलेखन स्पर्धेत लिखिता आजगावकर, ममता ढोबळे, संध्या निमसडे व रुपाली उगे यांना प्रथक क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर विजया थेरे, सचिन चव्हाण यांना द्वितीय क्रमांकाचा आणि सविता फाले व मृणालिनी वंजारी यांना तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कविता वाचन स्पर्धेत रश्मी चिंतलवार यांना प्रथक क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर संचालक माहिती कार्यालयाच्या रुपाली उगे व रितेश भूयार यांना द्वितीय क्रमांकाचा आणि लिखिता आजगावकर यांना तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 मराठी भाषा संवर्धन व एकचिंतन या विषयावर प्रताप वाघमारे यांनी बोली भाषा ही भाषेचे मूळ असून बोली भाषेचे संवर्धन आवश्यक आहे. भारतातील विविध प्रांतात अस्तित्वात असलेल्या बोली भाषेमुळेच भाषेची समृद्धी आहे. भाषा ही उपक्रमशील, प्रवाही व विविधतेशी अंतरसंबंध असली पाहिजे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे भाषेला जागतिकस्तरावर मान्यता मिळेल.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी भाषा अधिकारी श्रीमती शिल्पा सोनले यांनी केले. मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमाचे आयोजन विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. मराठी भाषेचा प्रशासकीय तसेच दैनंदिन व्यवहारात वापर वाढावा यासाठी विविध उपक्रम आयोजित करण्यात येत आहे. विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे मातृभाषेचा गौरव म्हणून कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशावरी देशपांडे तर आभार प्रदर्शन तहसिलदार संदिप माकोडे यांनी मानले.

सांज शब्दांची बहारदार मेजवानी

मराठी भाषा दिनानिमित्त मराठी गझल, कविता आणि किस्स्यांची बहारदार मैफील तसेच मराठी भाषा संवर्धन-एकचिंतन हा सांज शब्दांची या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास मराठी रसिकांचा उत्सस्फुर्त प्रतिसाद लाभला. सुप्रसिद्ध गझलकार व अभिनेता किशोर बळी यांनी मराठी गझल व कविता सादर केल्या. तसेच गोपाल मापारी यांनी हास्य कविता, अझिझ खान पठाण यांच्या बहारदार गझलांसोबतच महसूल अधिकारी, कवि व व्याख्याते प्रताप वाघमारे यांनी विविध कविता सादर करतांना बोली भाषेचा प्रभाव तसेच व्यवहार, व्यवसाय व राज्य कारभारामध्ये मराठीचा वापर यासंदर्भात व्याख्यान सादर केले.

 

000000

 


Friday, 28 March 2025

मॅटच्या लोकअदालतीमध्ये 48 प्रकरणांचा निपटारा

 



नागपूर, दि. 28 :  महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) नागपूर खंडपीठाच्या 22 मार्च 2025 रोजी झालेल्या लोकअदालतीत एकूण 187 पैकी 48 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.

मॅटच्या नागपूर खंडपीठाचे उपाध्यक्ष न्या.एम.जी.गिरटकर, न्यायिक सदस्य न्या. विनय जोशी, प्रशासकीय सदस्य नितीन गद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली 22 मार्च रोजी सिव्हील लाईन्स परिसरातील, प्रशासकीय इमारत क्र.1 मध्ये मॅटच्या खंडपीठामध्ये लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.  

 


महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, नागपूर खंडपीठ (मॅट) आणि उच्च न्यायालयाच्या विधी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लोक अदालतीमध्ये मॅट चे दोन पॅनल तयार करण्यात आले होते.

 सेवानिवृत्त न्या. एम.एन.गिलानी व न्या. के.जे.रोही यांनी पॅनल प्रमुख म्हणून काम पाहिले. तर सेवानिवृत्त जिल्हा व सत्र न्या.एस.एस.दास व ए.पी.मते, ॲङ एन.डी.ठोंबरे, एस.एन.पांडे यांनी पॅनल मध्ये सदस्य म्हणून काम पाहिले असल्याचे महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे कळविले आहे.

 

000000