Monday, 21 April 2025

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली विविध विभागाची आढावा बैठक

 


 

नागपूर, दि. 21 : केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज सामाजिक न्याय विभागाच्या योजनांसह केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांच्या अंमलबजावणीबाबत नागपूर विभाग व जिल्ह्याचा आढावा घेतला.

 येथील रविभवनात राज्यमंत्री श्री. आठवले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या आढावा बैठकीस अपर आयुक्त आदिवासी विभाग नागपूर आयुषी सिंह, अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, विभागीय आयुक्त कार्यालयाचे विकास उपायुक्त कमलकिशोर फुटाणे,  पुरवठा उपायुक्त अनिल बन्सो, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाबासाहेब देशमुख, समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.     

 या बैठकीत केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता विभाग आणि दिव्यांग कल्याण विभागाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या योजनांची नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये व नागपूर जिल्ह्यातील अंमलबजावणीबाबतची माहिती श्री. आठवले यांनी जाणून घेतली. समाज कल्याण विभागाच्यावतीने अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना देण्यात येणारी शिष्यवृत्ती, वसतीगृहे, ॲट्रॉसिटीच्या प्रकरणांची स्थिती, व्यसनमुक्ती केंद्र, वृद्धाश्रम आदींसह दिव्यांग कल्याण विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहितीही त्यांनी  जाणून घेतली. आदिवासी विकास विभागाच्यावतीने विभागात सुरु असलेली वसतीगृहे, एकलव्य पब्लिक स्कुल, नामांकित शाळा, सैनिकी शाळा आदींची माहिती त्यांनी घेतली. यासोबतच केंद्र शासनाच्या जनधन, मुद्रा, प्रधानमंत्री आवास, आयुष्यमान भारत या महत्वाकांक्षी योजनांच्या अंमलबजावणीची स्थितीही त्यांनी जाणून घेतली.

 

                                                      ००००००

 


जनतेच्या अर्जांवरील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री सचिवालयात लवकरच पीजीआरएस प्रणाली मुख्यमंत्र्यांसमोर झाले सादरीकरण

 


        नागपूर, दि 20 : विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊस मध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज व निवेदनांवर सकारात्मक कार्यवाही होवून या अर्जाची सद्यास्थिती अर्जदाराला एसएमएसद्वारे कळण्यासाठी पब्लिक ग्रिव्हेन्सेस रिडर्रसल सिस्टिम (पीजीआरएस) ही ऑनलाईन प्रणाली लवकरच कार्यान्वित होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुख्यमंत्री सचिवालयात या संदर्भात बैठक झाली.

                 शासकीय कामकाजामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून जनतेला तात्काळ दिलासा देण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे. यास अनुसरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दौऱ्यावेळी व येथील मुख्यमंत्री सचिवालयात विविध विभागांशी व विषयांशी संबंधित निवेदने, अर्ज व तक्रारी संबंधित विभागाकडे पाठवून त्यावर उचित कार्यवाही होण्याच्या दृष्टीने पीजीआरएस ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सचिवालयाच्या विशेष कार्यधिकारी आशा पठाण यांनी या ऑनलाईन प्रणाली विषयी सविस्तर सादरीकरण केले.

                                                                                   

                या ऑनलाईन प्रणालीद्वारे प्राप्त निवेदने व अर्जांचे विभागनिहाय व तक्रारनिहाय वर्गीकरण करण्यात येईल. हे अर्ज व निवेदने स्कॅन करून संबंधित विभागाला आवश्यक कार्यवाहीसाठी पाठविण्यात येईल व त्याची माहिती एसएमएसद्वारे अर्जदाराला कळेल. संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्यात येवून अर्जदाराचा अर्ज निकाली काढल्याबाबत अर्जदारास एसएमएसद्वारे माहिती मिळेल.  मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी या ऑनलाईन प्रणालीबाबत समाधान व्यक्त केले. लवकरच ही सुविधा जनेतेचा सेवेत रूजू होणार आहे.


                 बैठकीस विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल, मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मिना, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्यासह सार्वजनिक बांधकाम, भूमि अभिलेख, समाज कल्याण आदी विभागांचे प्रमुख उपस्थित होते.


0000

 


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाणून घेतल्या - जनतेच्या समस्या मुख्यमंत्र्यांच्या जनता दरबारात 626 अर्ज

 


नागपूर, दि.20 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांच्या निराकरणासाठी विविध विभागाकडे उचित कार्यवाहीसाठी अग्रेषित केल्या. त्यांनी या जनता दरबारात एकूण 626 निवेदने स्वीकारली.

 महिला व बाल विकास विभागाच्या पिंक ई-रिक्षा वितरण कार्यक्रमाला उपस्थिती लावल्यानंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना भेटण्यासाठी व आपल्या समस्या मांडण्यासाठी नागपूरच्या विविध भागातील नागरिकांनी येथील सिव्हिल लाईन्स परिसरातील हैदराबाद हाऊस या मुख्यमंत्री सचिवालयात एकच गर्दी केली होती. श्री फडणवीस यांची दिव्यांग, महिला, विविध सामाजिक संस्था, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या समस्या सांगून निवेदन दिले. म्हणणे ऐकून घेत मुख्यमंत्री यांनी जनतेच्या समस्या सोडवण्याबाबत आश्वस्थ केले. दुपारी 12 ते 3 दरम्यान या जनता दरबारात जवळपास 2 हजार नागरीक सहभागी झाले होते तर 626 निवेदन प्राप्त झाली आहेत.

 विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल, मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मिना, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्यासह ऊर्जा विभाग, सार्वजनिक बांधकाम, भूमि अभिलेख, समाज कल्याण आदी विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

 

00000


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर महापालिकेच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या बोधचिन्हाचे अनावरण

 


नागपूर, दि. 20 : नागपूर महापालिकेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त तयार करण्यात आलेल्या बोधचिन्हाचे (लोगो) अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज हैदराबाद हाऊस येथील मुख्यमंत्री सचिवालयात करण्यात आले.

     यावेळी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त डॉ.रविंद्र सिंगल, महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मीना, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत, अतिरिक्त पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ व बोधचिन्हाचे रचनाकार विवेक रानडे यावेळी उपस्थित होते.

 नागपूर शहरातील नागरिकांच्या सेवेत 'पौर जन हिताय' हे ब्रिदवाक्य घेऊन अहोरात्र काम करणाऱ्या नागपूर महापालिकेची स्थापना 2 मार्च 1951 रोजी झाली. महापालिकेच्या अमृत महोत्सव वर्षाला 2 मार्च 2025 पासून सुरुवात झाली आहे. या औचित्याने मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या हस्ते, बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले असून महापालिकेच्या सर्व पत्रव्यवहार व मनपाच्या ईतर प्रशासकीय कामकाजामध्ये याचा रितसरपणे उपयोग करण्यात येणार आहे.                                                                                                                              

अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने महापालिकेने विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन केले आहे. शहराच्या विकासात योगदान देणाऱ्या महापुरुषांच्या आठवणींनाही यादरम्यान उजाळा देण्यात येणार आहे.

        शासनाने 1951 मध्ये नागपूर मनपाचे प्रशासक म्हणून जी.जी. देसाई यांची नियुक्ती केली. त्यांच्या मार्गदर्शनात जून 1952 मध्ये महापालिकेची निवडणूक झाली आणि बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांना प्रथम महापौर होण्याचा मान मिळाला.

         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर नगरीचे दोनदा महापौर  पद भूषविले आहे. तसेच विद्यमान आमदार कृष्णा खोपडे, प्रवीण दटके, विकास ठाकरे, संदीप जोशी हे सुद्धा नागपूर महापालिकेचे महापौर आणि उपमहापौर राहिलेले आहेत.

        नागपूर महानगरपालिकेच्या इतिहासात आतापर्यंत 54 महापौर, 56 उपमहापौर आणि 50 आयुक्तांची सेवा नागपूर महानगरपालिकेला लाभली आहे. महाराष्ट्रात नागपूरला उपराजधानीचा दर्जा प्राप्त असून नागपूरसाठी आधी सी.एन.सी. ॲक्ट 1948 अंमलात होता. आता राज्य शासनाच्या आदेशान्वये संपूर्ण राज्यात एकच कायदा लागू करण्यात आला आहे. नागपूर महानगरपालिकेमध्ये आयुक्त म्हणून काम करणारे जे.एस. सहारिया आणि मनू कुमार श्रीवास्तव यांना राज्याचे मुख्य सचिव पदावर काम करण्याचा सन्मान प्राप्त झाला आहे. तसेच इतर आयुक्त म्हणून काम केलेले अधिकारी देखील राज्य शासनात वेगवेगळ्या पदावर काम करीत आहेत

                                                     0000


पिंक ई-रिक्षा हे महिला सक्षमीकरण आणि सुरक्षेच्या दिशेने महत्वाचे पाऊल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

Ø  मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पात्र महिलांना 50 पिंक ई-रिक्षांचे वितरण

Ø  मुख्यमंत्र्यांनी केला पिंक-ई- रिक्षातून प्रवास

नागपूर, दि. 20 : महाराष्ट्र शासनाने महिला सक्षमीकरणाच्या दिशेने विविध निर्णय घेतले असून त्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. महिला व बाल विकास विभागाच्या वतीने महिलांद्वारे महिलांसाठी संचालित पिंक ई-रिक्षा योजनेच्यामाध्यमातून महिला सक्षमीकरण आणि त्यांच्या सुरक्षेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडल्याचे प्रतिपादन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. लाभार्थी महिलेच्या पिंक ई-रिक्षातून प्रवास करत त्यांनी महिलांना कृतिशील विश्वासही दिला.

 राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने येथील नियोजन भवनात आयोजित कार्यक्रमात पिंक ई-रिक्षा योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील 50 पात्र महिला लाभार्थ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पिंक ई-रिक्षा वितरित करण्यात आल्या, त्यावेळी ते बोलत होते. महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे, राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, आमदार संदीप जोशी आणि डॉ. आशिष देशमुख, महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव, महिला व बाल विकास आयुक्त नयना गुंडे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर आदी यावेळी उपस्थित होते.

 मुख्यमंत्री म्हणाले, महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासन कटिबद्ध असून विविध योजनांच्या माध्यमातून हे कार्य प्रभावीपणे सुरू आहे. महिला व बालविकास विभागाने पिंक ई-रिक्षा या महत्वाकांक्षी योजनेच्या माध्यमातून गरजू महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. तसेच कामकाजी महिलांना या महिलांच्या ऑटो रिक्षामध्ये बसून सुरक्षित प्रवास करण्याची हमीही या योजनेने दिली आहे. नागपूर जिल्ह्यातील 50 पात्र लाभार्थी महिलांना ई-रिक्षा वितरित झाल्या असून जिल्ह्यात 2 हजार महिलांना या योजनेअंतर्गत ई -रिक्षा वितरीत होवून रोजगार उपलब्ध होणार आहे. 

 नागपूर शहरातील विविध मेट्रो स्टेशनवर प्रवाशांना फिडरसेवा उपलब्ध करून देण्यासाठी महिला व बाल विकास विभाग आणि महामेट्रो दरम्यान करार झाला आहे. यातून पिंक ई-रिक्षाधारक महिलांना हक्काचा रोजगार उपलब्ध होणार आहे. राज्याच्या पर्यटन विभागासह अन्य विभागासोबत भविष्यात असे करार करून या महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

 महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यावेळी म्हणाल्या, राज्य शासनाने महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महत्त्वाकांक्षी पिंक ई-रिक्षा ही योजना आणली आहे. राज्यातील आठ जिल्ह्यात ही योजना राबविण्यात येत असून पहिल्या टप्प्यात येत्या सहा महिन्यात पाच हजार रिक्षा वितरीत करण्याचे उद्दिष्ट आहे. नागपूर जिल्ह्यातील 50 पात्र महिला लाभार्थ्यांना ई -रिक्षा वितरित करून पहिल्या टप्प्यातील वितरणाची सुरुवात झाली आहे. या महिलांना किमान दहा दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. पाच वर्षांचा रिक्षाचा मेंटेनन्स आणि चार्जिंग ची व्यवस्था ही त्यांना करून देण्यात आली आहे. महामेट्रो सोबत करार करून फिडर सेवेअंतर्गत या महिलांच्या ई-रिक्षाची सेवा उपलब्ध होऊन त्यांना रोजगारही मिळणार आहे. येत्या काळात विमानतळ, पर्यटन स्थळ अशा ठिकाणीही पिंक ई-रिक्षा सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

     मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते यावेळी प्रतिनिधिक स्वरूपात 11 पात्र महिला लाभार्थ्यांना ई-रिक्षाच्या चाव्या वितरित करण्यात आल्या.

मुख्यमंत्र्यांनी केला पिंक- ई-रिक्षातून प्रवास

कार्यक्रम संपल्यानंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी नागपुरातील सन्याल नगर, टेका नाका नारीरोड  येथील पूजा नरेंद्र वानखेडे यांच्या पिंक ई रिक्षातून महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे  आणि राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्यासह प्रवास केला. या पिंक ई रिक्षाचे पहिले प्रवासी होण्याचा मान मिळवत त्यांनी महिलांना विश्वासही दिला.

           महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महिला व बाल विकास विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या महत्वाकांक्षी पिंक ई-रिक्षा योजनेअंतर्गत  नागपूर जिल्ह्यात 2000 पिंक ई-रिक्षा वितरित होणार आहेत. यासाठी 20 ते 50 वर्षे वयोगटातील इच्छुक महिलांचे 2040 अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी  जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीने 1032 लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली आहे. यापैकी 50 पात्र लाभार्थी  महिलांना पिंक ई-रिक्षा वितरित करण्यात आले.

थोडक्यात योजनेविषयी 

राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पिंक ई-रिक्षा ही महत्वाकांक्षी योजना राज्यातील आठ जिल्ह्यांकरीता राबविण्यात येणार आहे. यात नागपूर जिह्यामध्ये 2000 महिलांना पिंक ई-रिक्षा वाटप करण्याचे उद्दिष्ट दिलेले आहे. 

या योजनेंतर्गत पुणे, नाशिक, नागपूर, अहिल्यानगर, अमरावती, संभाजीनगर, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांत महाराष्ट्र शासनाकडून इच्छुक महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य व ई-रिक्षा चालवण्यासाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

           ००००००


Tuesday, 8 April 2025

कामगारांच्या नोंदणी व नुतनीकरण प्रक्रियेमध्ये सुधारणा करुन त्यांच्या पर्यंत लाभ पोहोचवा - राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

 

 

नागपूर, दि 05 :  जिल्ह्यातील महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत शासनाने कामगारांच्या विकासासाठी दूरदृष्टी ठेवून अनेक विकास योजना हाती घेतल्या आहे. या योजनेचा लाभ प्रत्येक पात्र कामगारांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने कामगारांच्या नोंदणीबाबत अनेक अडचणी असल्याच्या तक्रारी कामगारांकडून केलेल्या आहेत. या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन ज्या-ज्या कामगारांना नोंदणीबाबत अडचणी येत आहे त्याचे त्यांच्या गावपातळीवरच निराकरण झाले पाहिजे. यादृष्टीने कामगार विभागाने कालबद्ध कार्यक्रम हाती घेऊन नोंदणी प्रक्रियेत तात्काळ सुधारणा करण्याचे निर्देश कामगार राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी दिले.

 

रविभवन येथील सभागृहात आज आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस सहायक कामगार आयुक्त राजदीप धुर्वे, किशोर दहीफळकर व तालुका स्तरावरील अधिकारी उपस्थित होते. सर्वसामान्य कामगार मोठ्या आशेने अर्ज करतात. त्यांच्या हक्काचा असलेल्या योजना त्यांच्यापर्यंत प्रभावीपणे पोहचल्या पाहिजे. ज्या दूरदृष्टीने सामाजिक सुरक्षिततेसाठी नोंदणी प्रक्रिया शासनाने निश्चित केली आहे ती प्रत्येक कामगाराला पूर्ण करता आली पाहिजे. असे झाले तरच त्यांना शैक्षणिक सहाय्य योजना, आरोग्य योजना, आर्थिक सहाय्य योजना यांचा लाभ घेता येईल, असे राज्यमंत्री ॲड. जयस्वाल यांनी स्पष्ट करुन अधिकाऱ्यांना अधिक दक्षतेने काम करण्यास सांगितले.

 

0000

             

मोरभवन व गणेशपेठ येथे साकारणार पंचतारांकीत स्थानक नागपूर महानगरात 6 ठिकाणी होणार व्यापारी संकुल - पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 


 जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा

नागपूर दि.5 : विकासाच्या प्रतिक्षेत असलेले मोरभवन व गणेशपेठ येथील बसस्थानक आता प्रगत स्वरुपात प्रवाशांच्या भेटीला येणार असून हे दोन्ही स्थानके अद्ययावत सुविधांसह पंचतारांकित दर्जाप्रमाणे साकारावेत यासाठी शासनाने निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत या दोन्ही प्रकल्पासह नागपूर महानगरातील जिल्हा परिषद आणि महानगरपालिका यांच्या जागेवर सहा ठिकाणी विविध व्यावसायिकांना नव्या संधी देणारे व्यापक व्यापारी संकुल साकारणार असल्याचे राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. कोणत्याही परिस्थितीत विकासकामांच्या गुणवत्तेबाबत तडजोड न करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

 नियोजन भवन येथे आज आयोजित बैठकीत विविध विकास कामांचा आढावा त्यांनी घेतला.  या बैठकीस महापालिका आयुक्त अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर, श्रीमती वसुमना पंत, श्रीमती वैष्णवी बी., उपायुक्त मिलिंद मेश्राम, मुख्य अभियंता लीना उपाध्याय, नगररचना विभागाचे ऋतुराज जाधव, नागपूर मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक वैभव आगे व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

                              कोराडी नाका परिसरात साकारणार मध्यवर्ती कारागृह

 कोराडी नाका परिसरात साकारणाऱ्या मध्यवर्ती कारागृहाच्या निर्मितीबाबत या बैठकीत व्यापक आढावा घेण्यात आला. सदर कारागृह हे मा. न्यायालयाने वेळोवेळी दिलेले निर्देश व शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार परिपूर्ण झाले पाहिजे. बंदीजनांना कौशल्य प्रशिक्षणासह कारागृहातील सुविधा या निकषानुसार परिपूर्ण व्हाव्यात यादृष्टीने नामांकित वास्तुविद्या विशारदांकडून आराखडा तयार करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या. याबाबत संबंधित विभागांनी आपले प्रस्ताव, व इतर तांत्रिक बाबी नियमानुसार वेळेत पूर्ण कराव्यात, असे  त्यांनी स्पष्ट केले.

 सद्यास्थितीत नगर रचना विभाग, एनएमआरडीए, मध्यवर्ती कारागृह यांनी संयुक्तरित्या जागेची पाहणी करून तात्काळ त्याबाबत पुढील कार्यवाहीसाठी अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यासाठी जिल्हास्तरीय कारागृह समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीसमोर संबंधित आराखड्याबाबत सादरीकरण करण्यात येईल. या कारागृहाच्या निर्मितीसाठी एनएमआरडीएने कोराडी नाका मार्गावरील जागेचे अवलोकन केले असून  2000 कैद्यांची क्षमता असलेले कारागृह तेथे निर्माण करता येणे शक्य असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

                    लंडन स्ट्रीट येथे साकारणार परफॉर्मिंग आर्ट गॅलरी व कन्वेंशन सेंटर

ऑरेंज सिटी स्टेट प्रकल्पांतर्गत लंडन स्ट्रीटजवळील परफॉर्मिंग आर्ट गॅलरी व कन्वेंशन सेंटरच्या निर्मितीचा आराखडा तात्काळ तयार करण्यात यावा असे पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सादरीकरण केल्यानंतर हा आराखडा अंतिम करण्यात येईल. मोकळ्या जागेचा उपयोग योग्य  व अधिक कलात्मक पद्धतीने करण्यात यावा, असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगून निविदा प्रक्रियेला लागणारा कालावधी लक्षात घेता या कामाला गती द्यावी, असे सांगितले.

                                            महानगरात सहा ठिकाणी साकारणार अद्ययावत मार्केट

 नागपूर महानगराचा वाढणारा विस्तार लक्षात घेता प्रत्येक भागात व्यावसायिकांना नविन संधी मिळाव्यात यादृष्टीने शासनाने मोकळ्या जागेचा विकास करताना त्याठिकाणी आदर्श व्यापारी संकुल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यादृष्टीने नागपूर येथील  संत्रा मार्केट, नेताजी मार्केट, दही बाजार, इतवारी मार्केट, फुल मार्केट, डीग डिस्पेंसरी धरमपेठ आदी ठिकाणी नूतनीकरणाचे काम येत्या तीन महिन्यात पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांनी आपसात समन्वय ठेवण्याच्या सूचना त्यांनी केल्या. नूतनीकरण करण्यात येणाऱ्या परिसरात नागरिकांसाठी परिपूर्ण सुविधांचा समावेश असावा, असे त्यांनी सांगितले.

                                              मौजा अजनी, झिंगाबाई टाकळी आणि बडकस चौक

       येथील जिल्हा परिषदेच्या जागेवर होणार विकास प्रकल्प

             जिल्हा परिषदेच्या अंतर्गत मौजा अजनी, झिंगाबाई टाकळी आणि बडकस चौक येथील जिल्हा परिषदेच्या जागेवर बचत गटातील महिलांसह इतर व्यावसायिकांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात व जिल्हा परिषदेला उत्पन्नाचे शाश्वत स्त्रोत निर्माण व्हावे यादृष्टीने या तिनही ठिकाणी विकास प्रकल्प राबविले जाणार आहे. मौजा अजनी येथे 9,749 चौ.मी., झिंगाबाई टाकळी येथे 24,432 चौ.मी. आणि बडकस चौक महाल येथे 612 चौ.मी. जागेवर हे विकास संकुल उभारण्यात येणार आहेत. याबाबतचे नियोजन व प्राथमिक बाबी तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा परिषदेला दिल्या.

           

00000


Tuesday, 1 April 2025

भोसला सैनिके शाळेमुळे सैन्यदलाला उत्कृष्ट अधिकारी, देशासाठी शिस्तप्रिय नागरिक घडविण्याचे कार्य - देवेंद्र फडणवीस

 


Ø  संस्थापक डॉ. बाळाकृष्ण मुंजे यांच्या पुतळ्याचे अनावरण

Ø  जनरल बिपीन रावत सभागृहाचे लोकार्पण

नागपूर, दि. 31 : भोसला सैनिकी शाळेच्या माध्यमातून देशाच्या सैन्यदलाला उत्कृष्ट अधिकारी तसेच देशासाठी आधुनिकतेला स्विकारणारी व शिस्तप्रिय नागरिक घडविण्याचे काम होत असल्याचे गौरोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  काढले.

भोसला सैनिकी शाळेच्या परिसरात संस्थेचे संस्थापक डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे व जनरल बिपीन रावत यांच्या स्मृति प्रित्यर्थ बांधण्यात आलेल्या अत्याधुनिक सभागृहाचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून सेवानिवृत्त सैन्यदलाचे प्रमुख जनरल मनोज पांडे, हवाई दलाचे सेवानिवृत्त एयर चिफ मार्शल शिरीष देव उपस्थित होते.  यावेळी व्यासपिठावर सेंट्रल हिंदू मिलिट्री एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुर्यरतन डागा, भोसला सैनिकी शाळेचे अध्यक्ष शैलेश जोगळेकर, संस्थेचे कुमार काळे, दिलीप चव्हाण, राहूल दिक्षीत, हेमंत देशपांडे, विवेक रानडे, संजय जोशी, अमरेंद्र हरदास आदी उपस्थित होते.

भोसला सैनिकी शाळा सुरू करतांना समाजामध्ये सैनिकी मुल्यांचे रोपन व सैन्याचे भारतीयकरन व्हावे तसेच त्यांच्यामध्ये लढण्याची क्षमता निर्माण व्हावी यासाठी भोसला सैनिकी शाळेची सुरवात झाली असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले की, आधुनिकतेला स्विकारणारी पिढी निर्माण करण्याचे काम संस्‍थेच्या माध्यमातून होत आहे. अनुशासित भारत घडविण्याच्या कार्यासोबतच सैन्यदलाला आधुनिकतेकडे वाटचाल करणारे सैन्यदल प्रमुख मेजर जनरल बिपीन रावत यांच्या स्मृती कायम राहाव्यात व त्यांच्या कार्याची युवकांना प्रेरणा मिळावी तसेच  संपूर्ण भारतीयांना बिपीन रावत यांच्या कार्याची व आदर्शांची कायम आठवण रहावी, विद्यार्थ्यांमध्ये जिद्द निर्माण व्हावी यासाठी अत्याधुनिक सभागृहाची निर्मिती करण्यात आली आहे.

आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने देशाची वाटचाल सुरू असून जगातील सर्वात आधुनिक शस्त्र भारतात तयार होत आहे व आपण या शस्त्रांची निर्यात करत आहोत. भारताने नेहमी शांतीसाठी कार्य केले असल्यामूळे बलशाली भारतच जगाला शांतीचा संदेश देवू शकतो असा विश्वास मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.

एयर मार्शल शिरीष देव यांनी भोसला सैनिकी शाळा ही एनडीए च्या धर्तीवर विकसित होत असून त्यापेक्षाही चांगले सैनिकी शिक्षण येथून विद्यार्थ्यांना मिळत आहे. महाराष्ट्रात सैनिकी शाळांचा शिक्षणाचा दर्जा तसेच सैनिकी शिक्षणाबाबत प्रशासनाकडून विशेष लक्ष पुरविण्यात येत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

भुतपूर्व सैन्य दल प्रमुख मनोज पांडे यांनी जनरल बिपीन रावत हे देशासाठी अलौकीक कार्य करणारे व विकसीत
भारतामध्ये सशस्त्र दलाला आधुनिकतेकडे नेणारे दुरदर्शी नेतृत्व होते. तिन्ही दलाला एकत्र करून त्यांच्यामध्ये समन्वय ठेवण्यासोबतच युद्धासाठी कायम सज्जता असावी अशा प्रगतीशिल विचाराचे असल्यामूळे भारतीय सैन्य दलात त्यांच्यामूळे मोठ्या प्रमाणात सुधारणा झाला असल्याचा गौरोद्गार यावेळी त्यांनी व्यक्त केला.

भोसला सैनिकी शाळेचे अध्यक्ष शैलेश जोगळेकर यांनी स्वागत करून संस्थेमध्ये जनरल बिपीन रावत यांच्या स्मृतीत कायम राहाव्यात व त्यांच्या कार्याची विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी अत्याधुनिक अशा सभागृहाची निर्मिती करण्यात आली आहे. सैनिकी शिक्षणाचे सुरूवात करणारे संस्थेचे संस्थापक डॉ. बाळाकृष्ण मुंजे यांच्या पुतळ्याचे अनावरण ही संस्थेसाठी महत्वपूर्ण घटना असल्याचे त्यांनी सांगितले. प्रख्यात शिल्पकार प्रदिप शिंदे यांचा यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  कार्यक्रमाचे संचलन हर्षला राजगिरे यांनी केले. तर राहूल दिक्षीत यांनी आभार मानले.

महाराष्ट्र राज्य विद्यूत पारेषण कंपनीच्या सांगिक सामाजिक उत्तरदायित्व योजनेतून तयार करण्यात आलेल्या विकासकामांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

0000