Wednesday, 21 May 2025

विभागीय आयुक्त कार्यालयात ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन’ साजरा

 



नागपूर दि. 21 : विभागीय आयुक्त कार्यालयात आज 'दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन’ साजरा करण्यात आला.

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन साजरा करण्यात येतो. आयुक्तालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सामान्य प्रशासन विभागाचे अपर आयुक्त तेजूसिंह पवार यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचा-यांना ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी शपथ’ दिली. पुनर्वसन सह आयुक्त प्रदीप कुलकर्णी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

००००००


आय.आय.एच.टी. बरगढ व वेंकटगिरी येथे प्रथम सत्राकरिता प्रवेश सुरू - १० जून अर्ज करण्याची अंतिम मुदत

 


नागपूर, दि 20: केंद्र शासनाच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेतील (आय.आय.एच.टी.) सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राकरिता प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. आय.आय.एच.टी. बरगढ (ओडिशा) येथील संस्थेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी १४ आणि वेंकटगिरी (आंध्र प्रदेश) येथील संस्थेसाठी २ जागा  भरण्यात येणार आहेत. या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांकडून नागपूरसह सोलापूर, मुंबई आणि छत्रपती संभाजी नगर प्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग कार्यालय येथे १० जून २०२५ पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.  

विदर्भाच्या ११ जिल्ह्यांतील पात्र उमेदवारांना प्रवेश अर्जाचा नमुना व इतर माहिती प्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग, नागपूर कार्यालय, प्रशासकीय इमारत क्र. २, ८ वा माळा, "बी" विंग, सिव्हिल लाईन्स, नागपूर ४४०००१ येथे उपलब्ध होणार आहे. कार्यालयाच्या ०७१२-२५३७९२७ या दूरध्वनी क्रमांकावरही संपर्क साधता येणार असून अर्जाचा नमुना आणि आवश्यक पात्रता कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात आले आहे. 

प्रवेश अर्जाचा नमुना आणि इतर आवश्यक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या https://www.dirtexmah.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच, अर्जाचा नमुना नागपूरसह सोलापूर, मुंबई आणि छत्रपती संभाजी नगर या प्रादेशिक वस्त्रोद्योग उपआयुक्त कार्यालयातही उपलब्ध आहे. इच्छूक व पात्र उमेदवारांना १० जून २०२५ पर्यंत सर्व संबंधित प्रादेशिक उपायुक्त कार्यालयात अर्ज सादर करण्याचे आवाहन, राज्याचे वस्त्रोद्योग आयुक्त, संजय दैने यांनी केले आहे.

 

 00000

 


नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज रहावे - विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी

 


मान्सूनपूर्व आढावा बैठकीत दिल्या सूचना

         नागपूर, दि. 19 : मान्सूनच्या पार्श्वभूमीवर विभागातील धरणे आणि तलावांतील पाण्याची पातळी कमी करा, शहरातील होर्डिंग्ज व बॅनरची  स्थिती तपासून घ्या, जनतेला वेळेत माहिती पुरविण्याकरिता डीडीएमए चॅटबॉटचा वापर करा, जलाशय व धरणाच्या ठिकाणी पर्यटकांचे अपघात होणार नाही यासाठी उचित काळजी घ्या आणि  साथीचे रोग पसरणार नाही याची काळजी घेवून उचित आरोग्य सुविधा पुरविण्याच्या सूचना आज विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या. 

श्रीमती बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात नागपूर विभागाची मान्सून पूर्व तयारीचा आढावा घेण्यात आला. नागपूर मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, प्रादेशिक हवामान विभागाचे शास्त्रज्ञ आर. बालसुब्रमण्यम, आयुक्तालयातील महसूल विभागाचे अपर आयुक्त प्रदीप कुलकर्णी, विकास उपायुक्त कमलकिशोर फुटाणे, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, जलसंपदा, पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह दूरदृष्यप्रणालीद्वारे वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक उपस्थित होते. 


यावर्षी हवामान विभागाने विदर्भात वेळेपूर्वी मान्सूनचा अंदाज वर्तविला असून काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यताही वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित यंत्रणांनी चोख भूमिका बजावत मनुष्य व प्राणीहानी होणार नाही व वेळेत नागरिकांना मदत पोचविण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी असे निर्देश श्रीमती बिदरी यांनी यावेळी दिले.

 गोसेखुर्द, अपर वर्धा, ईसापूर आदी धरणांसह राज्याच्या सीमेलगत संजय सरोवर आणि मेडिकट्टा धरणातील पाणी पातळी कमी करण्यात यावी अश्या सूचना यावेळी देण्यात आल्या. विभागात एकूण 16 मोठे धरण, 42 मध्यम तर 320 लघु असे एकूण 378 धरण असून पुर नियंत्रणाच्यादृष्टीने त्यांची पाणी पातळी कमी करण्याचे निर्देश देण्यात आले.  शहरातील धोकादायक होर्डिंग्ज व बॅनर ची तपासणी करून ते वेळीच काढण्याच्या सूचना देण्यात आल्या. पुर परिस्थिती व अतीवृष्टी झाल्यास त्याची माहिती वेळीच नागरिकांना देण्याच्या दृष्टीने भंडारा जिल्ह्याने तयार केलेले  डीडीएमए चॅटबॉट, साथीदार ॲप अन्य जिल्ह्यांनीही तयार करावे व त्याचा वापर करावा तसेच केंद्रिय जल आयोगाचे फ्लडवॉच ॲप या अधिकृत ॲप प्रमाणे अन्य शासकीय ॲपचा वापर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. 


गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्यातील अतीदुर्गम भागातील गर्भवती महिलांना आधीच सुरक्षित ठिकाणी पाठविण्यात यावे, गेल्या पाच ते दहा वर्षात जलाशय व धरणांच्या ठिकाणी पर्यटकांचा अपघात असेल अश्या ठिकाणी आवश्यक ती सुरक्षेची काळजी घेण्यात यावी, मान्सूनमधील साथीच्या रोगांवर वेळीच नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने आरोग्य यंत्रणांनी सुसज्जता बाळगावी अशा सूचनाही श्रीमती बिदरी यांनी यंत्रणांना दिल्या. 

प्रादेशिक हवामान विभाग, नागपूर मनपा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नागपूर, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, जलसंपदा विभाग, हवाई दल, सशस्त्र दल, केंद्रिय जल आयोग, आरोग्य विभाग यांच्यासह विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी मान्सून मधील अतिवृष्टीचा सामना करण्याकरिता केलेल्या तयारीबाबत सादरीकरण केले.

 

00000


सर्व सामन्यांच्या कामांना तात्काळ प्राधान्य द्या पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

 


▪️जनसंवाद कार्यक्रमात नागरिकांची गर्दी 

नागपूर, दि. 18:- ज्या संवेदनेने शासन तळागाळातील सर्वसामान्यांपासून समाजातील सर्व घटकासाठी योजना आखते, शासन निर्णय काढते, लोककल्याणकारी राज्याच्या भूमिकेतून मदतीसाठी तत्पर राहते ती तत्परता प्रशासनाच्या माध्यमातून प्रत्ययास आली पाहिजे. लोकांचे प्रश्न त्या त्या स्थानिक पातळीवर, संबंधित कार्यालयाद्वारे त्वरीत मार्गी लागली तर जनसंवादाला लोकांना यायची वेळ पडणार नाही या शब्दात महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या उद्वीग्न भावना व्यक्त केल्या.                                                                                शासन स्तरावरील नागरिकांच्या समस्या आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावावेत या उद्देशाने नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या जनसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. 

लोकांची कामे तात्काळ व्हावी ही अपेक्षा चुकीची नाही. प्रत्येक नागरिकांचे शासनाशी सदैव काम पडते असेही नाही. अनेक शेतकरी नैसर्गिक आव्हानाशी तोंड देत झालेले नुकसान त्याला सोसता यावे. यात काही मदत मिळावी म्हणून शासनाकडे येतात. तहसील कार्यालयाशी संपर्क साधतात. नियमात असणारी कामे तात्काळ मार्गी लागलीच पाहिजेत. यात दिरंगाई होता काम नये असे त्यांनी सांगितले. जनसंवादात आलेली निवेदने ज्या अधिकारी व कार्यालयांना निर्देशित केली आहेत त्याबाबत संबंधितांनी पुन्हा विचारणा केल्यास कठोर कार्यवाही करू असे ते म्हणाले. 

या जनसंवाद कार्यक्रमात नागरिकांनी पांदन रस्ते, शेतजमिनीवरील अतिक्रमण, घरकुल योजना, पाणी समस्या, आरोग्य ,समस्या, क्रीडा, सांस्कृतिक, धार्मिक, आध्यात्मिक व महसूल संबंधित अशा अनेक विषयांवर निवेदने देवून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संवाद साधला.

00000


सिकलसेल व थॅलीसीमिया रुग्णांसाठी अत्याधुनिक उपचार सुविधांची निर्मिती - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 


 शासकीय वैद्यकीय रुग्णालयात विविध प्रकल्पांचे लोकार्पण

नागपूर दि 18 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला सिकलसेल व थॅलीसीमियामुक्त करण्यासाठी पावले उचलली आहेत. या दुर्धर आजाराच्या विळख्यातून रुग्णांना मुक्त करण्यासाठी येथील शासकीय महाविद्यालयात दर्जेदार उपचार सुविधांच्या निर्मितीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, अशी हमी देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली. 

शासकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे आज जवळपास 70 कोटी खर्चून निर्माण करण्यात आलेल्या विविध सुविधा व विकास कामांचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, खासदार शामकुमार बर्वे, आमदार कृष्णा खोपडे, प्रवीण दटके, संदीप जोशी, कृपाल तुमाने, अभिजीत वंजारी, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे आयुक्त राजीव निवतकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये, संचालक डॉ.अजय चंदनवाले, सहसंचालक विवेक पाकमोडे, मुख्य अभियंता दिनेश नंदनवार आदी उपस्थित होते. 

श्री फडणवीस म्हणाले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ह्या मध्य भारतातील मोठ्या स्वरूपाच्या वैद्यकीय संस्था आहेत. सर्व स्तरातील रुग्ण येथे उपचारासाठी येतात. मात्र आधुनिक काळाशी अनुरूप अशा अद्ययावत सुविधा उपलब्ध करण्याची गरज भासू लागल्याने येथे आधुनिक संसाधनांची उभारणी करण्यावर भर देण्यात येत आहे. विविध पायाभूत सुविधांमुळे या संस्थांच्या गुणात्मकतेत वाढ होणार आहे. या दोन्ही संस्थांमध्ये दर्जेदार सुविधांच्या निर्मितीसाठी व अद्ययावत उपचारासाठी जवळपास हजार कोटी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या प्रयत्नातून ह्या संस्था आधुनिक भारतातील 'स्टेट ऑफ आर्ट' वैद्यकीय संस्था म्हणून नावारूपाला याव्यात, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. 

रुग्णालयांना समाजातील आशेचे केंद्र  म्हणून बघितल्या जाते. वैद्यकीय उपचार व शिक्षण क्षेत्रात या दोन्ही संस्था अग्रेसर राहाव्यात तसेच खाजगी संस्थांच्या तुलनेत येथील शिक्षण, सुविधा व उपचार अधिक दर्जेदार असावे असे सांगून श्री फडणवीस यांनी बाह्यरुग्ण तपासणी कक्ष, शस्त्रक्रिया विभाग, वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सर्व सोयीसुविधांच्या निर्मितीवर प्राधान्याने भर द्यावा अशी सूचना केली. यातूनच नजीकच्या काळात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा कायापालट झालेला आपल्या दृष्टीस पडेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी प्रास्ताविकात महाविद्यालयात प्रारंभ होत असलेल्या विविध सुविधांची माहिती दिली. 

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण व उद्घाटन करण्यात आलेली कामे 

येथे कार्यरत 250 निवासी डॉक्टरांसाठी वसतिगृह, रुग्णांना ने-आण करण्यासाठी ट्रॉमा इमारत ते बाह्य रुग्ण विभाग यांना जोडणारा स्काय वॉक (4.93 कोटी), ऑडिटोरियम (5.25 कोटी), गंभीर आजारांचे निदान करणारी यंत्रणा न्यूक्लिअर स्कॅन (8. 29कोटी), हृदयविकार असलेल्या रुग्णांचे निदान करण्यासाठी कार्डियाक कॅथ लॅब (6.87 कोटी), अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शस्त्रक्रिया करण्यासाठी रोबोटिक सर्जरी सिस्टीम (20.82 कोटी), कॅन्सरसारख्या व इतर दुर्धर आजारांवर अत्याधुनिक उपचाराकरिता मध्य भारतातील शासकीय रुग्णालयातील पहिली न्यूक्लियर मेडिसिन सिस्टीम (8.29 कोटी), स्मार्ट क्लास रूम (1.5 कोटी), रुग्णालयाशी संबंधित इतर सुविधा (11 कोटी)                                                                                   

'आयजीएमसी'त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (आयजीएमसी) येथे मेगा डायलिसिस सेंटर व रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी त्यांनी रुग्णालयातील प्रलंबित कामांचा आढावा घेतला. 

येथील विद्यार्थ्यांसाठी 3 व्हर्चुअल स्मार्ट वर्ग खोल्या तयार झाल्या असून उर्वरित चार वर्ग खोल्यांना मान्यता देण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शविली व त्याबाबतचे प्रस्ताव शासनास तातडीने सादर करण्याचे आदेश दिले. रुग्णालय व महाविद्यालयाला आवश्यक त्या विविध यंत्रसामग्रीच्या उभारणीबाबत शासनास सादर केलेल्या प्रस्तावांचा पाठपुरावा करण्याच्या सूचना केल्या. रुग्णालयातील काही कामांना मान्यता मिळाली परंतु निधी प्राप्त करण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया तातडीने करण्याचे आदेश त्यांनी संबंधितांना दिले. अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण यांनी रुग्णालयात कार्यान्वित विविध कक्षांची माहिती देणारे सादरीकरण केले. 

लोकार्पण करण्यात आलेली कामे 

येथील पाचशे खाटांच्या इमारत निर्मितीची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना केल्या. येथील विविध प्रकारच्या सोयी सुविधांच्या निर्मितीची कामे प्रगतीपथावर असून समन्वयाने व गतीने कामे पूर्णत्वास नेण्याच्या सूचना केल्या. 

मेगा डायलिसिस सेंटरसाठी 80 लक्ष सीएसआर निधीतून 10 मशीन लावण्यात आल्या. हे केंद्र औषध वैद्यक शास्त्र विभागाच्या अधिपत्याखाली येत असून डायलिसिस मशीन चालवण्यासाठी येथे तंत्रज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

संस्थेला रुग्णसेवेसाठी रक्तपेढी विभागासाठी रक्त संक्रमण व्हॅन तसेच र 1 कोटी 70 लक्ष किमतीच्या चार ॲम्बुलन्स उपलब्ध झाल्या आहेत. रुग्णांचे तात्काळ रोगनिदान करण्यासाठी नमुन्यांची तपासणी इथेच करता यावी यासाठी मॉलिक्युलर लॅब स्थापित करण्यात आली असून 13 कोटी 50 लक्ष एवढा निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केला असून ही लॅब कार्यान्वित झाली आहे

 

0000


‘रेरा’ कायद्यामुळे महाराष्ट्रातील रियल ईस्टेट क्षेत्राला विश्वासार्हता - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 


विकास प्रक्रियेत रियल ईस्टेट क्षेत्राचा सहभाग महत्वाचा

नागपूर, दि. 18 :- सर्वसामान्यांच्या मनात एखादी प्रॉपर्टी, घर, फ्लॅट घेतांना अनेक प्रकाराच्या शंका असतात. या शंकांचे तेवढ्याच पारदर्शिपणे समाधान होणे आवश्यक असते. रियल ईस्टेट क्षेत्राला शासन पातळीवर पारदर्शिपणे सहकार्य व्हावे यादृष्टीने आपण अनेक बदल केले. ‘रेरा’ सारखा कायदा देशात आपण सर्वात अगोदर सुरू केला. सुमारे 50 हजार प्रकल्प रेरा अंतर्गत नोंदणी झाले हे आपल्या राज्याचे सर्वात मोठ यश आहे. संपूर्ण देशात नोंदणी झालेल्या प्रकल्पाएवढी ही संख्या आहे. यातून निर्माण झालेली विश्वासार्हता रियल ईस्टेट क्षेत्राला अत्यंत सहायभूत ठरली असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

हॉटेल सेंटर पाँइट येथे नरडेकोच्या नूतन कार्यकारणीच्या पदग्रहण समारंभात ते बोलत होते. यावेळी अर्थ राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल, विधानपरिषद सदस्य संदिप जोशी, ॲड अभिजित वंजारी, आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रविण दटके, माजी खासदार कृपाल तुमाणे, नरडेको विदर्भचे नुतन अध्यक्ष डॉ. कुणाल पटोले, चेयरमन घनश्‍याम ढोमणे व इतर मान्यवर उपस्थित होते.

 

नरडेको विदर्भ ही संस्था विकासकांच्या हितासमवेत ग्राहकांच्या हिताला अधिक जपणारी आहे. यात सर्वसामान्यांचे हित अधिक जपल्या जाते. शासनाच्या विविध धोरणांची नरडेको प्रामाणिकपणे अंमलबजावणी करते ही समाधानाची बाब असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. देशाच्या विकासाला रियल ईस्टेटने लावलेला हातभार अधिक महत्वाचा आहे. 65 टक्के जीडीपी शहरातून आहे हे लक्षात घेवून आम्हीही या क्षेत्रात अधिक पारदर्शकता यावी यादृष्टीने उपाययोजना केल्या आहेत. आता कोणत्याही रियल ईस्टेट उद्योजकाने आपले प्रपोजल एखाद्या कार्यालयात दाखल केले तर त्याला मंजूरीच्या प्रक्रियेत कोणत्या टेबलवर किती वेळ लागतो याची माहिती ऑनलाईन उपलब्ध होईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

00000

 


विविध योजना व उपक्रमांसाठी महाराष्ट्राला केंद्राचे संपूर्ण सहकार्य - केंद्रीय कृषि मंत्री शिवराज सिंह चौहान

 


Ø  हवामानास अनुकूल पीक वाण विकसित करा

Ø  कृषी योजनांच्या लाभासाठी फार्मर आयडी मोहीमेला गती देण्याचे निर्देश

Ø  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे केले कौतुक

नागपूर, दि. 18 :- प्रगत बियाणे, सेंद्रिय खत, हवामान अनुकूल पद्धती, आधुनिक तंत्रज्ञान, स्मार्ट सिंचन आणि बाजारपेठेतील दुवे यांचा योग्य समन्वय शेतक-यांनी राखण्याची गरज आहे. कृषी विभागानेही देशातील अनेक भागात त्या त्या हवामानास अनुकूल पीक वाण विकसित करण्याचे निर्देश केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कृषी विभागाला दिले. तसेच प्रत्येक शेतक-यांना फार्मर आयडी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याचे व आयडीशिवाय कृषी योजनाचा लाभ न देण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. येत्या काळात विविध योजना व उपक्रमांसाठी महाराष्ट्राला केंद्राचे संपूर्ण सहकार्य असेल, असेही केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यावेळी म्हणाले. 

अमरावती रोडवरील केंद्रीय कृषी संशोधन परिषदेच्या सभागृहात आज केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बैठकीदरम्यान केंद्रीय मंत्री श्री. चौहान बोलत होते. यावेळी कृषि मंत्री माणिकराव कोकाटे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, वित्त राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल, कृषी विभागाचे प्रधान विकास रस्तोगी, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांच्यासह संबंधित विभागाचे केंद्र व राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्रातील हवामान, पर्जन्यमान, कृषी क्षेत्रातील आव्हाने, खरीप हंगाम २०२५, खते आणि बि बियाण्यांची उपलब्धता, विकसित कृषी संकल्प अभियान, ॲग्रीस्टॅक अभियान, पुढील वर्षाचे नियोजन याविषयीची माहिती सादरीकरणाद्वारे कृषी विभागाचे प्रधान सचिव विकास रस्तोगी यांनी दिली. यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री श्री. चौहान म्हणाले की, हवामान बदलानुसार तसेच पर्जन्यमानुसार पिकांचे विशेषतः राज्यातील कापसाचे वाण अधिकाधिक विकसित करण्याची गरज आहे. कमी पर्जन्याच्या प्रदेशातही अधिकाधिक पीक देणारे वाण विकसित होण्याची गरज आहे. राज्याचे 'बेस्ट क्रॅापिंग मॅाडेल' विकसित करण्याचे निर्देशही यावेळी मंत्री श्री. चौहान यांनी दिले.

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक

राज्यातील कृषी तसेच ग्राम विकास विभागात सुरू असलेल्या विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांबद्दल केंद्रीय मंत्री श्री. चौहान यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बैठकीदरम्यान कौतुक केले. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, सँड बँक या उपक्रमांसाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले.

 महाराष्ट्रातील 'सक्सेस स्टोरीज' देशभर पोहोचवा

सादरीकरणादरम्यान राज्यातील विविध भागातील शेतक-यांनी राबविलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांची माहिती देण्यात आली. यावेळी संभाजीनगर जिल्ह्यातील टापरगाव येथील शेतकरी रावसाहेब मोहिते, बीड जिल्ह्यातील  रूई (धानोरा) येथील रेशमाची शेती करणारे शेतकरी एकनाथ टाळेकर, यवतमाळ जिल्ह्यातील जवळा येथील आर्चिडची शेती करणा-या शेतकरी वंदना राठोड यांच्या यशकथा देशभरात विविध माध्यमातून पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

                                                केंद्र पुरस्कृत योजनाचा घेतला आढावा

केंद्रपुरस्कृत ग्रामविकास विभागाच्या विविध योजनांचा आढावा केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. यात प्रधानमंत्री आवास योजना, पीएम जनमन योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, सेल्फ हेल्प ग्रूपअंतर्गत सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती यावेळी ग्रामविकास व पंचायतराज विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी दिली.  मनरेगाचा आढावाही यावेळी घेण्यात आला. यात मनरेगाच्या उद्दिष्टपूर्तीचे केंद्रीय मंत्री श्री. चौहान यांनी कौतुक केले.

 एक कोटी लखपती दीदींचे उद्दिष्ट 

      -          मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या 1500 रुपयांचा महिलांना आधार मिळाला आहे. महिलांनी या रकमेतून विविध व्यवसाय सुरु केले आहेत. महिलांना आवश्यक खर्च भागवण्यास देखील या पैशांची मदत होत आहे. यासोबतच महिलांना आर्थिक स्वावलंबी करण्यासाठी लखपती दीदी ही योजना राबविण्यात येते. येत्या काळात एक कोटी लखपती दिदी बनविण्याचे राज्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बैठकीदरम्यान दिली.

0000000


शेती व शेतकऱ्यांच्या भाग्योदयासाठी एक राष्ट्र - एक कृषी व एक टीम - केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांची घोषणा ▪ मुख्यमंत्री फडणवीस यांनी जलयुक्त शिवार क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा कृषीमंत्र्यांनी केला गौरव

 


 


 

2026 अखेरपर्यंत शेतकऱ्यांना दिवसाचे 12 तास मिळेल स्वच्छ वीज

                                                   – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

नागपूर, दि.18 :  आमचे शेतकरी हे मेहनती आहेत. निसर्गाच्या प्रत्येक आव्हानाला ते धैर्याने तोंड देतात. आपल्या शेतातील उत्पादनासाठी घाम गाळतात. त्यांच्या घामाला, कष्टाला न्याय देण्यासाठी भारतातील कृषी क्षेत्रासाठी काम करणारे सर्व संशोधक, केंद्र सरकार, राज्य सरकार व सर्व संस्था एकत्र येऊन मिशन मोडवर काम करण्याची गरज आहे. व्यवस्थेतील ही त्रृटी दूर करण्यासाठी एक राष्ट्र - एक कृषी व एक टीम म्हणून कृषी विभाग आता काम करेल, अशी घोषणा केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली.

                       

महाराष्ट्र शासन कृषी विभाग, भारतीय कृषी अनुसंधान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित  विकसित कृषी संकल्प अभियानअंतर्गत किसान संमेलनात ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, खासदार श्याम बर्वे, आमदार आशिष देशमुख, आमदार चरणसिंग ठाकूर, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, कुलगुरु नितीन पाटील, कृषी आयुक्त सुरज मांडरे, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे डॉ.एम.एल.जाट, डॉ.एस.के.सिंग, डॉ.अमरेश कुमार नायर, डॉ.डी.के. यादव, डॉ. राजवीर सिंह व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

 

शेती व शेतकऱ्यांसाठी भारतीय कृषी अनुसंशाधन परिषदेअंतर्गत देशात 16 हजार वैज्ञानिक आहेत. त्यांचे विविध पिकांवर सतत संशोधन सुरु असते. याचबरोबर परिषदेअंतर्गत 113 संशोधन केंद्र आहेत. यातील 11 केंद्र महाराष्ट्रात आहेत. याचा जोडीला जिल्हा कृषी केंद्र, प्रगतशील शेतकरी, राज्य सरकारचे कृषी कार्यालये आहेत. या सर्व यंत्रणेमध्ये एकसुत्रतेचा अभाव लक्षात घेऊन एक राष्ट्र - एक कृषी व एक टीम या संकल्पनेची नितांत गरज होती असे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले.

 

कृषी हा भारतीय व्यवस्थेचा कणा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपण गौरवशाली भारत, समृद्ध भारत पाठोपाठ शक्तीशाली भारत निर्माण केला आहे. भारत आता वैभवशाली राष्ट्र म्हणून पुढे आले आहे. याला अधिक भक्कम जर करायचे असेल तर विकसित शेती व विकसित शेतकरी हे तत्व आपण जपले पाहिजे. विकसित खेती व समृद्ध किसान पाठोपाठ विकसित व गरिबीमुक्त गाव हे शासनाचे लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले.

 

मुख्यमंत्री फडणवीस यांनी जलयुक्त शिवार क्षेत्रात

दिलेल्या योगदानाचा कृषीमंत्र्यांनी केला गौरव

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी महाराष्ट्रात जलसंधारणाची जी कामे केली त्याला तोड नाही. जलयुक्त शिवार महाराष्ट्राला वरदान ठरले. संयम, धैर्य व निश्चयी वृत्तीने त्यांची कार्यशैली कोणत्याही आवाहानात डगमगली नाही या शब्दात केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याचा गौरव केला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने येथे उपस्थित असलेले भारतीय कृषी अनुसंशाधन परिषदेचे सर्व संशोधक व वरिष्ठ अधिकारी महाराष्ट्राच्या कृषी विकासाचा रोडमॅप तयार करतील असे त्यांनी सांगितले.

 

देशात कृषी संशोधन करणाऱ्या लॅबची कमतरता नाही. संशोधकाची कमतरता नाही. शासकीय कृषी विभागाचीही कमतरता नाही. कमतरता आहे लॅबला अर्थात संशोधनाला शेताच्या बांधावर पोहोचविण्याची. ही कमतरता भरुन काढण्यासाठी वर्षातील एक महिना कृषी संशोधक, अधिकारी हे शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांसोबत काम करतील असे केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्ट केले. शेतीतील उत्पादन खर्च कमी करण्यासाठी नविन तंत्रज्ञानाला जवळ करण्याशिवाय पर्याय नाही. याच बरोबर विविध खतांसाठी कंपन्यांना शासन जी सबसिडी देते ती सबसिडी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात देण्याचा आम्ही निर्णय घेत असल्याचे सुतोवाच त्यांनी केले.

 

2026 अखेरपर्यंत शेतकऱ्यांना दिवसाचे 12 तास मिळेल स्वच्छ वीज

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

           

राज्यात शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विजेच्या प्रश्नाला मार्गी लावण्यासाठी आम्ही धोरणात्मक निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. शेतकऱ्यांना दिवसाही विजेचा पुरवठा व्हावा यासाठी केंद्र सरकारच्या कुसुम योजनेला आम्ही मुख्यमंत्री सौर कृषी योजनेची जोड दिली आहे. यातून 16 हजार मेगावॅट वीज निर्मितीचे काम आम्ही सुरु केले असून आजच्या घडीला यातील 4 हजार मॅगावॅटची निर्मिती पूर्णत्वास आली असल्याचे ते म्हणाले. 2026 च्या अखेरपर्यंत आम्ही दिवसाचे 12 तासही वीज देण्यासह राज्यात 12 महिने विजेची उपलब्धता करु असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

 

विदर्भ आणि मराठवाड्यातील पाणीप्रश्न मार्गी लागावा, दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना सावरता यावे यादृष्टीने देशातील सर्वात मोठा नदीजोड प्रकल्प म्हणून ज्याकडे पाहिले जात आहे त्या नळगंगा-वैनगंगा या प्रकल्पाचे काम यावर्षी सुरु करत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. याचबरोबर तापी मेगा रिचार्ज हा जगातील आश्चर्य असणाऱ्या प्रकल्पाचे काम आपण हाती घेतले आहे. समुद्राला वाहून जाणारे सुमारे 35 टिएमसी पाणी या प्रकल्पातून आपण आणणार आहोत. बुलडाणा, अकोला, अमरावती या जिल्ह्यातील खारपान पट्टा क्षेत्राला याचा लाभ होणार आहे. येथील लाखो शेतकऱ्यांचे जिवनमान या प्रकल्पातून उंचावले जाईल असे ते म्हणाले.

 

राज्यातील कृषी क्षेत्राला सावरण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवन योजना आपण जागतिक बँकेशी चर्चा करुन सुरु केली. सुरुवातीला आपण 5 हजार गावे यासाठी निवडले.  या गावानी साध्य केलेला बदल पाहून जागतिक बँक पुन्हा सहकार्यासाठी तयार झाली. आता त्यांच्या सहयोगातून राज्यातील सुमारे 7 हजार 500 गावात एकात्मिक पद्धतीने काम करुन कृषी क्षेत्रात परिवर्तन घडवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

 

शेतीसाठी शेतमजूरांचा प्रश्न सर्वत्रच भेडसावत आहे. यावर मार्ग काढण्यासाठी यांत्रिकीकरणाचा पर्याय अधिक भक्कम करुन तो शेतकऱ्यांपर्यंत आपल्याला पोहोचवावा लागेल, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले. शेतकऱ्यांना यांत्रिकीकरण परवडण्याच्यादृष्टीने केंद्र सरकार विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.

 

ग्राम विकास आणि कृषी विकास याचे आदर्श मॉडेल केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मध्यप्रदेशमध्ये विकसित करुन दाखविले आहे. शेतीपुढे अनेक आव्हाने आहेत. मातीपासून प्रदूषित पाण्यापर्यंतची आव्हाने असून संशोधक यातून मार्ग देत आहेत. महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग शेतकऱ्यांना सावरण्यासाठी कटीबद्ध असल्याचे राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी सांगितले.

 

या कार्यक्रमात राष्ट्रीय मृद स्पेक्ट्रल व कापसावरील गुलाबी बोंड अळीला प्राथमिक अवस्थेत नियंत्रणासाठी उपयोगी पडणाऱ्या एआय फेरोमन ट्रॅकचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

 

******

आत्मनिर्भर भारताच्या ताकदीची ऑपरेशन सिंदूरच्या यशातून प्रचीती - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 


      

 खापरखेड्यात तिरंगा यात्रेचे आयोजन

 

नागपूर, दि. 18: ऑपरेशन सिंदूर यशस्वी करताना भारतीय सैन्याने पाकिस्तानचा एकही हल्ला सफल होऊ दिला नाही. देशातच निर्माण केलेली शस्त्रे वापरून जिंकलेल्या या युद्धाने भारताची ताकद व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 'आत्मनिर्भर भारता'ची झलक संपूर्ण जगाला दिसली आहे. ही आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.

ऑपरेशन सिंदूर मोहिमेच्या यशानिमित्त खापरखेडा (नागपूर) येथे आयोजित तिरंगा रॅलीप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार आशिष देशमुख, चरणसिंग ठाकूर यावेळी उपस्थित होते.

प्रत्येकाच्या हृदयात राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करण्यासाठी व आपल्या वीर जवानांप्रती कृतज्ञता प्रतीत व्हावी यासाठी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असणाऱ्या पाकिस्तानला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ऑपरेशन सिंदूर राबवून चोख उत्तर देण्यात आले आहे. देशावरील कोणताही हल्ला यापुढे सहन केला जाणार नाही. त्याला तात्काळ कडक उत्तर दिले जाईल, हा संदेश या निमित्ताने आपण दिला आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी शौर्य गाजवणाऱ्या आपल्या वीर जवानांप्रती तिरंगा यात्रेच्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त करूया, असे आवाहनही श्री. फडणवीस यांनी केले.

युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना मानवंदना देत व संपूर्ण देश त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, दहशतवाद्यांचे पाकिस्तानातील अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी भारताने अत्यंत आक्रमक कारवाई केल्याने या युद्धाची परिणीती पाकिस्तानने केलेल्या युद्धबंदीच्या मागणीने झाली. हा संपूर्ण देशाचा विजय आहे.

श्री बावनकुळे म्हणाले, या यात्रेच्या माध्यमातून सर्वधर्मसमभाव व देशाच्या एकतेचे दर्शन होत आहे. ही यात्रा आपल्या सैनिकांनी दाखवलेल्या कर्तृत्वाप्रती कृतज्ञता आणि अभिमान दर्शवत आहे. अण्णा मोड परिसर ते रेल्वे क्रॉसिंग मार्गावर निघालेल्या या तिरंगा यात्रेत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.


*****

Saturday, 17 May 2025

निसर्गाचे जतन आणि संवर्धनाच्या साक्षरतेसाठी बायोडेव्हर्सिटी पार्क आवश्यक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 



नागपूर दि. 17 : निसर्गाचे जतन आणि संवर्धन ही भावना समाजाच्या प्रत्येक घटकात रुजण्यासाठी निसर्गाच्या माध्यमातून लोकांना कृतिशील संदेश देणे आवश्यक आहे. यासाठी  गोरेवाडा परिसरातील प्रस्तावित बायोडेव्हर्सिटी पार्क एक उत्तम माध्यम ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. याच्या निर्मितीसाठी लागणार काही निधी शासनाकडून व काही निधी सीएसआरव्दारे उपलब्ध करुन देण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.

          नागपूर येथील गोरेवाडा परिसरात सुमारे 3 लाख स्केअर मीटर क्षेत्रावर हा पार्क साकारण्याबाबत आज प्राथमिक आढावा बैठक मुख्यमंत्री यांच्या रामगिरी या शासकीय निवासस्थानी संपन्न झाली. या बैठकीस विधानपरिषद सदस्य संदीप जोशी, मनपा आयुक्त डॉ अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त बी वैष्णवी, ग्रिन यात्राचे प्रदीप त्रिपाठी आदी मान्यवर उपस्थित होते.

                                                                  असा असेल बायोडायव्हर्सिटी पार्क

               निसर्गाशी जवळीकता साधत त्याच्या जपवणूकी विषयी सर्वच धर्माने भर दिला आहे. यातील तत्व लक्षात घेऊन हा जैवविविधता पार्क पर्यावरणाच्या संवर्धनासह शिक्षण आणि प्रत्यक्ष अनुभूती देणाऱ्या तीन तत्त्वांवर उभारला जाईल. यात विद्यार्थ्यांना विविध संशोधनाची, शिक्षणाची संधी मिळेल. कृषी, विज्ञान, वन, जैवविविधता या क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा विशेष लाभ होईल. पूर्वापार चालत आलेली व या मातीत एकरुप असलेली विविध प्रकारची झाडी इथे लावली जाईल. सुमारे दिडशेपेक्षा अधिक बांबूच्या जातींचे या ठिकाणी संवर्धन केले जाईल.

             आध्यात्मिक अनुभूतीसह या पार्कमध्ये उच्च तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संवर्धनावर भर राहील. देवराई वन, नक्षत्र वन, राशी वन, औषधी वनस्पती संशोधन व संवर्धन, फुलपाखरु व काजवे असलेले वन, विविध मातींचे वैविध्य जपणारे दालन, पर्जन्यमापन, दिशा शास्त्र, योगा झोन, पीस झोन, फॅमिली झोन, मानसशास्त्र, आरोग्य या प्रमुख घटकांशी अंर्तमुख करणारा हा पार्क राहील.

 

 

00000


सर्वांसाठी घरे योजनाबाबत शासन कटीबद्ध - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 


·         मुख्यमंत्र्यांनी स्विकारली तब्बल 1 हजार 51 नागरिकांकडून निवेदने

·         हैद्राबाद हाऊस येथे आयोजित जनता दरबारात प्रातिनिधीक स्वरूपात पट्टे वाटप

·         जनता दरबाराला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद

नागपूर, दि. 17 :  नागपूर महानगरामध्ये अनेक वर्षांपासून स्वत:च्या मालकी हक्काचे घर व्हावे अशी ईच्छा हजारो झोपडपट्टीधारकांची आहे. या पासून वंचित असलेल्या लोकांना पट्टे वाटपाच्या माध्यमातून हक्काचे घर मिळत आहेत. निकषाची पुर्तता करणारा एकही व्यक्ती हक्काच्या घरांपासून वंचित राहणार नाही. जे झोपडपट्टीधारक शासनाच्या निकषात मोडतात त्यांनी आपल्या हक्काच्या घरासाठी महानगरपालिका, नझूल विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.                

हैदराबाद हाऊस येथे आयोजित जनता दरबाराचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 7 वेगवेगळया झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या 21 झोपडपट्टी धारकांना प्राथमिक स्वरुपात पट्टे वाटप करून झाला. यानंतर त्यांनी जनतेची निवेदने स्विकारली. यावेळी विधान परिषद सदस्य संदिप जोशी, आमदार प्रवीण दटके, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मीणा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, प्रभारी जिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, महामेट्रोचे महाव्यवस्थापक अनिल कोकाटे, आदी यावेळी उपस्थित होते.

सर्वासाठी घरे योजना-2022 या धोरणाची प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने नागपुर शहरामधील नझुलच्या जागेवरील 33 झोपडपट्टीच्या प्रस्तावातील 3 हजार 714 झोपडपट्टी धारकांचे अतिक्रमण नियमानुकुल करण्यात आले आहे. आजवर मंजुर पट्टेपैकी 2157 पी.टी.एस झोपडपट्टी धारकांना चलान देण्यात आलेले आहेत. पंरतु सदर अकृषीक आकारणीची रक्कम चलानव्दारे भरणा केलेली नसल्याने वाटप करण्यास शिल्लक आहे. याबाबत शिबीर घेवून कार्यवाही केली जात आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय (महसुल विभाग) नागपूर कडुन 18 झोपडपट्टी पैकी  तुकडोजी नगर, कामगार कॉलनी, भांडेवाडी या 3 झोपडपट्टयामध्ये एकुण 160 झोपडपट्टी धारकांना  पट्टे वाटप करण्यात आले आहेत. 474 संबधित पट्टेधारकांनी चलानाची रक्कम शासन जमा केल्यानंतर पट्टा वाटप करण्यात येईल. याबाबत  दिनांक 20.5.2025 रोजी शिबीर आयोजीत करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.



उर्वरित चिंचभुवन, शामनगर, गिट्टीखदान, पन्नालाल देशराज नगर, आदिवासी नगर, पुनापुर, वाठोडा, भरतवाडा, हुडकेश्वर, कुराडपुरा, शोभाखेत, बिनाकी, कोष्टीपुरा, ठक्करग्राम व नारागाव या 15 झोपडपट्टीमध्ये 1121 पट्टे वाटप करणे शिल्लक आहे. त्यापैकी 2 झोपडपट्टी मध्ये पट्टे वाटपासाठी दिनांक 19 मे 2025 रोजी जिल्हास्तरीय समितीची बैठक आयोजीत करण्यात आलेली आहे.

  मुख्यमंत्र्यांनी स्विकारली तब्बल 1 हजार 51 नागरिकांकडून निवेदने

सर्वसामान्य नागरिकांना जनता दरबारातून आपले प्रश्न मार्गी लागतात असा लोकांचा विश्वास वाढीस लागला आहे. यासाठी जाणिवपूर्वक महिन्यातून एकदा जनता भेटीचा कार्यक्रम नागपूर मध्ये मुख्यमंत्री या नात्याने मी करतो. यात प्राप्त झालेल्या लोकांच्या निवेदनांवर गंभीरतेने विचार करून पात्र असलेल्या प्रत्येकाला न्याय मिळतो ही समाधानाची बाब असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

हैदराबाद हाऊस येथे आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबाराला नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. यात महिलांपासून वयोवृध्द नागरिकांपर्यंत, तरूणांपासून दिव्यांग व्यक्तिंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेवून त्यांना आपली निवेदने दिली. निवेदन देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचे उन्हापासून संरक्षण व्हावे यादृष्टीने भव्य मंडप व कुलर्सची व्यवस्था करण्यात आली होती. नागरिकांनी स्वयंशिस्तीचा प्रत्यय देत अप्रत्यक्षरित्या प्रशासन व शासकीय प्रणालीबाबतचा विश्वास दृढ केला.  राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी व कर्मचारी समायोजन कृती समितीच्या शिष्ट मंडळानी भेट घेवून आपल्या मागण्याचे निवेदन दिले.

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट

माजी खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट घेतली. यात संत श्री संताजी महाराज आर्थिक विकास महामंडळ तातडीने सुरू करणे व त्यावर समाजाचे प्रतिनिधी नेमणे, पारंपारिक तेल घाणी उद्योगाच्या पुर्नविकासासाठी मध्यप्रदेश, झारखंड, राजस्थान राज्याच्या धर्तीवर महामंडळ स्थापन करणे, तेलघाणीतील सुटे तेल विक्रीवर शासनाचे निर्बंध उठविणे आदी मागण्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्या.

या शिष्टमंडळात माजी खासदार रामदास तडस, डॉ. भुषण कर्डिले, गजानन शेलार, संजय विभुते, बळवंतराव मोरघडे, पुष्पाताई बोरसे, अतुल वांदिले, जगदिश वैद्य, कुणाल पडोळे, प्रविण बावनकुळे, नरेंद्र सुर्यवंशी, भगवान बोरसे हे पदाधिकारी सहभागी होते.

00000