मुंबई, दि. 24 : मनरेगामधून राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये पांदण रस्ते निर्मितीची चांगली कामे झाली आहेत त्यांचा अभ्यास करण्यात यावा. याशिवाय मध्य प्रदेश सरकारने याकामी मनरेगासह विविध योजनांच्या एकत्रिकरणातून पांदण रस्त्यांची निर्मिती करण्याचा चांगला कार्यक्रम राबविला आहे. त्याचाही अभ्यास करुन राज्यासाठी आदर्श अशा पालकमंत्री पांदण रस्ते योजनेची आखणी करण्यात यावी, असे निर्देश वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल संबंधीत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना दिले.
सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे काल वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्या अध्यक्षतेखाली पालकमंत्री पांदण रस्ते योजनेसंदर्भात उच्चस्तरीय बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, रोहयो मंत्री जयकुमार रावल, ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता, रोहयो सचिव एकनाथ डवले यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, पांदण रस्त्यांच्या निर्मितीसाठी पालकमंत्री पांदण रस्ते योजना ही महत्वाकांक्षी योजना राज्य शासन आखत आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही महत्वाची योजना आहे. ही योजना कशा पद्धतीने राबविता येईल याचे दोन ते तीन मॉडेल तयार करुन त्याचे सादरीकरण करण्यात यावे. अमरावती, वर्धा या जिल्ह्यांमध्ये मनरेगा आणि इतर काही योजनांचे एकत्रीकरण करुन चांगल्या पांदण रस्त्यांची निर्मिती करण्यात आली आहे. मध्य प्रदेश राज्यातही अशाच पद्धतीने ही योजना राबविली जात आहे. त्याचा अभ्यास करुन योजनेची चांगल्या पद्धतीने आखणी करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
पाणंद रस्ते निर्मितीसाठी जेसीबीचा वापर करण्याबाबत कोणत्या विभागातून किंवा कोणत्या योजनेतून तरतूद करता येऊ शकेल याची माहिती घेण्याचे निर्देशही वित्तमंत्र्यांनी यावेळी दिले.
कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यावेळी म्हणाले, शेतकऱ्यांचा माल मुख्य रस्त्यापर्यंत आणण्याच्या दृष्टीने पांदणरस्ते अत्यंत महत्वाचे आहेत. मनरेगासह इतर योजनांचा निधी व शेतकऱ्यांचा सहभाग यातून आदर्श अशी पांधण रस्ते विकास योजना आखता येईल. शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही अत्यंत महत्वाची योजना ठरेल, असे त्यांनी सांगितले.
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, ही योजना राबविताना पांदण रस्त्याचे मातीकाम मनरेगामधून करण्यात यावे व त्यावरील खडीकरण किंवा डांबरीकरणाचे काम डीपीडीसी, खासदार किंवा आमदार निधी,नाविन्यपूर्ण योजनांचा निधी अशा इतर योजनांमधून करता येईल. अमरावती जिल्ह्यात विविध योजनांच्या एकत्रीकरणातून (convergence) पांदण रस्त्यांची योजना यशस्वीपणे राबविली आहे. त्याचा अभ्यास करुन आदर्श अशी पांदण रस्ते विकास योजना राज्यभरात लागू करता येईल, असे त्यांनी सांगितले.
रोहयो मंत्री जयकुमार रावल म्हणाले, मनरेगामधून पांदण रस्त्याचे अर्थवर्क तथा मातीकाम करण्याची तरतूद आहे. त्यातून राज्यात पांदण रस्त्यांचे मातीकाम करण्यात येत आहे. वरच्या पक्क्या कामासाठी इतर योजनांमधून निधी मिळणे आवश्यक आहे. पांदण रस्त्याच्या निर्मितीसाठी प्राथमिक टप्प्यात आवश्यक असलेल्या मातीकामासाठी मनरेगामधून भरीव निधी उपलब्ध करुन देऊ, असे त्यांनी सांगितले. मध्य प्रदेश राज्यात विविध योजनांच्या एकत्रिकरणातून पांदण रस्ते निर्मितीची योजना यशस्वीपणे राबविण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
००००
No comments:
Post a Comment