मुंबई, दि. 4 : नागपूर हे देशाचे कनेक्टिंग हब आहे. येथे सर्व महत्त्वाच्या पायाभूत सुविधा आहेत. मिहान हा राज्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. येथे उद्योगांसाठी सर्व पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या असल्याने औषध उत्पादक कंपन्यांनी मिहान मध्ये नवीन प्रकल्प तसेच विस्तारीत प्रकल्प सुरु करावेत, असे आवाहन सामान्य प्रशासन, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार यांनी केले.
बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे मिहान येथे प्रकल्प सुरु करण्यास इच्छुक कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक अन्न व औषध प्रशासन आयुक्तालयात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
श्री. येरावार म्हणाले, नागपूर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या निर्मितीसाठी निविदा प्रकिया झाली आहे. मेट्रोची चाचणी झाली असून आरोग्य क्षेत्रातील नामांकित एम्ससाठीची प्रक्रिया सुरु आहे. त्याचप्रमाणे सर्व शैक्षणिक, पायाभूत, आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत. 701 किलोमीटरच्या समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून नागपूर ते जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट जोडण्यात येणार आहे. येथे मिहानच्या अंतर्गत 500 मेगावॅटचा कॅप्टीव्ह वीज प्रकल्प आहे. पाण्याची उपलब्धता करुन देण्यात आली आहे. वर्धा येथे ड्राय पोर्ट निर्मित करण्यात येत आहे.
‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’ च्या माध्यमातून एक खिडकी योजनेनुसार प्रकल्प सुरु करण्यासाठी सर्व परवानग्या एकाच ठिकाणी अर्ज केल्यावर मिळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व सुविधा पाहण्यासाठी औषध कंपन्यांनी नागपूर आणि मिहान ला भेट द्यावी, असे आवाहनही श्री. येरावार यांनी केले.
बैठकीस अन्न व औषध प्रशासन आयुक्त डॉ. पल्लवी दराडे, सह आयुक्त ए. टी. निखाडे, मिहान प्रकल्पाचे मुख्य नियोजनकार जितेंद्र ओझा, औषध कंपन्यांची असोशिएशन फार्मेक्झिल चे तुषार कोरडे, भावी मेहता, एडमा असोसिएशनच्या प्रतिनिधींसह औषध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
००००
No comments:
Post a Comment