मुंबई दि. 30 : राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मंडलनिहाय हेक्टरी उत्पादकता निश्चित करुन त्यातील कमाल उत्पादकता तालुका सरासरी म्हणून ग्राह्य धरावी आणि त्याप्रमाणे शेतकऱ्यांकडून सोयाबीन तसेच मूग आणि उडीदाची खरेदी करण्यात यावी, असे निर्देश कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज दिले.
किमान आधारभूत दराने शासकीय खरेदी केंद्रांवर खरेदी करण्यात येत असलेल्या सोयाबीन, उडीद व मूग आदीच्या कमाल खरेदी प्रमाणाबाबत बैठक श्री. खोत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज पार पडली. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. बैठकीस कृषी विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार, महाराष्ट्र राज्य को-ऑपरेटीव्ह मार्केटिंग फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक जे. पी. गुप्ता, कृषी विभागाचे संचालक डॉ. सु. ल. जाधव, पणन सहसंचालक ए. एल. घोलकर, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे वरिष्ठ व्यवस्थापक अविनाश पांडे, सुभाषचंद्र महन्ती आदी याप्रसंगी उपस्थित होते.
नाफेडकडून 10 लाख क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात येणार असून राज्य शासनाकडूनही अतिरिक्त 10 लाख क्विंटल सोयाबीन खरेदीच्या तयारीबाबत कार्यवाही करावी, असे निर्देश देऊन श्री. खोत म्हणाले की, राज्यात सोयाबीन खरेदी केंद्रे पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावेत. शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर सोयाबीन, उडीद आणि मूग खरेदीसाठी आणताना चांगल्या दर्जाचा कृषीमाल आणणे गरजेचे आहे. सोयाबीनची खरेदी करण्याची परवानगी शेतकरी उत्पादक कंपन्यांनाही देण्यात आली आहे. त्यामुळेही सोयाबीनची मोठ्या प्रमाणात खरेदी होईल. सध्या 121 सोयाबीन खरेदी केंद्रे, 86 मूग खरेदी केंद्रे तर 87 उडीद खरेदी केंद्रे सुरु आहेत. शेतकऱ्यांकडून हा कृषीमाल खरेदी करण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलता बाळगून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम करावे, असेही श्री. खोत यावेळी म्हणाले.
००००
No comments:
Post a Comment