Saturday, 2 December 2017

विद्यार्थ्यांना तणावमुक्त परीक्षा देता यावी यासाठीच नवीन नियम – विनोद तावडे

मुंबई दि 2 : दहावी आणि बारावीची परीक्षा ही विद्यार्थ्यांसाठी महत्वाची असते. या परीक्षेचे गांर्भिर्य लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी 11 वाजताच्या पेपरसाठी अर्धा तास अगोदर परीक्षावर्गात येणे अपेक्षित आहे.  या अर्ध्या तासात परीक्षागृहात विदयार्थ्यांचे हॉलतिकीट तपासणे, प्रश्नपत्रिका देणे असे करणे शक्य होणार आहे. विद्यार्थ्यांवरील परीक्षेपूर्वी ताण कमी करुन अर्धा तास अगोदर वर्गात सोडून बरोबर 11 वाजता परीक्षा सुरु करण्याचा निर्णय परीक्षा मंडळाने घेतला असल्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले आहे.
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना 11 नंतर म्हणजेच साधारण 31 मिनिटांनी उशिरा आल्यावर परीक्षेला बसता येणार नाही. परीक्षागृहात प्रवेश करताना विद्यार्थ्यांचा गोंधळ होऊ नये आणि विद्यार्थ्यांना तणावमुक्त पध्दतीने परीक्षा देता यावी यासाठी परीक्षा मंडळाने हा निर्णय घेतला आहे. अपवादात्मक परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितालाच प्राधान्य देण्यात येईल असे श्री. तावडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने, दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. दहावीची परीक्षा 1 मार्च  ते 24 मार्च 2018 दरम्यान, तर बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च 2018 दरम्यान होणार आहे. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांना अर्धा तास अगोदरच वर्गात सोडले जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असेही श्री.तावडे यांनी यावेळी सांगितले.

००००

No comments:

Post a Comment