Monday 23 December 2019

वैविध्यपूर्ण संस्कृती हेच भारताचे वैशिष्ट्य - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी


मुंबई, दि 23 - भारत हा वैविध्यपूर्ण संस्कृतीने नटलेला आहे. विविध राज्य आणि दुर्गम भागातील नागरिक देशाच्या कोणत्याही प्रदेशात वास्तव करीत असले तरी ते स्वत:च्या संस्कृतीसोबत त्या - त्या प्रदेशाची संस्कृती जपून विकासात योगदान देतात. भारताचे हेच वैशिष्ट्य आहे. विविधतेत एकता जपणाऱ्या देशाचे नागरिक असणे ही सौभाग्यशाली बाब असल्याचे गौरवोद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काढले.
बोरिवली येथील प्रमोद महाजन स्पोर्टस क्लब येथे मुंबई -उत्तराखंड महोत्सवाचे गढवाल भातृ मंडळाने आयोजन केले होते. याप्रसंगी राज्यपाल श्री. कोश्यारी बोलत होते.
राज्यपाल म्हणाले, देशात कुठेही वास्तव्यास असणाऱ्या व्यक्तीने आपली मातृभाषा जगवली पाहिजे. जगात भारताची ओळख ही विविधतेत एकता असलेला देश म्हणून आहे. पूर्वी ग्रामीण भागात प्रवासासाठी वाहन अथवा रस्ते नसायचे मात्र आज देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात शासनाच्या सक्रिय सहभागाने दळणवळणासाठी रस्ते उपलब्ध झाले आहेत. गावांना शहरासाठी जोडून देश एकसंध करण्यात शासनाने यशस्वी प्रयत्न केला असून, जगात भारत देश उत्तरोत्तर प्रगती करीत राहिल, असे मत राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार सुनील राणे, गढवाल भातृ मंडळाचे अध्यक्ष भगतसिंह बिश आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्यांना गढवाल रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
0000

No comments:

Post a Comment