Thursday 24 September 2020

 ग्राम रोजगार सेवकाचे मानधन आता थेट ग्रामपंचायतीमार्फत

                         * राज्यातील 25 हजार 258 ग्रामरोजगार सेवकांना लाभ

                         * रोहयोमार्फत 48 कोटी 93 लाखाचे वितरण

                         * थेट मानधन वितरणाचा कामठी पॅटर्न यशस्वी

         नागपूर, दि. 24 :  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामस्तरावर कामांच्या सुसूत्रतेसाठी तसेच मजुरीसंदर्भात अभिलेखे व नोंदवह्या ठेवण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या ग्रामरोजगार  सेवकांना  यापुढे थेट ग्रामपंचायतीमार्फत मानधन वितरण करण्यात येणार आहे.  मानधन वितरणाच्या या नव्या प्रणालीमुळे राज्यातील सुमारे 25 हजार 258 ग्रामरोजगार सेवकांना वेळेवर मानधन मिळणार आहे.

             ग्रामपंचायतीमार्फत थेट मानधन वितरणाचा कामठी तालुक्यातील पायलट प्रकल्प यशस्वी झाल्यामुळे संपूर्ण राज्यात नविन प्रणालीनुसार मानधन वितरणाचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेचे आयुक्त ए. एस. आर. नायक यांनी आज दिली.

            रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्राम रोजगार सेवकांना दिल्या जाणाऱ्या मानधनाचा विलंब टाळण्यासाठी नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यात प्रायोजिक तत्वावर हा प्रयोग राबविण्यात आला. तालुक्यातील 37 ग्रामपंचायतीमध्ये ग्रामरोजगार सेवक नियुक्त करण्यात आले आहे. या सेवकांना 1 एप्रिल ते 30 जूनपर्यंत 26 हजार 869 मनुष्य दिवस निर्मिती झाली. त्यानुसार 3 लक्ष 67 हजार 974 रुपयांचे अनुदान थेट संबंधीत ग्रामपंचायतीमध्ये जमा करण्यात आले असून ग्रामपंचायतीमार्फत ग्रामरोजगार सेवकांना सुलभपणे मानधन वितरीत करण्यात आले. त्यामुळे संपूर्ण राज्यात हा प्रयोग राबविण्याचा निर्णय आयुक्त ए. एस. आर. नायक यांनी घेतला.

            ग्रामीण भागात रोजगार निर्मितीसाठी ग्रामरोजगार सेवकांची महत्वाची भूमिका असून रोहयोवरील मजुरांना त्यांनी केलेल्या कामाच्या नोंदी तसेच मिळणारी मजुरी यांचे हजेरी बुक तयार करून मजुरांच्या  खात्यात थेट मजुरी जमा करण्याची जबाबदारी आहे. राज्यात 25 हजार 258 ग्रामरोजगार सेवकांमध्ये नागपूर विभागात 3 हजार 409, अमरावती विभागात 4 हजार, औरंगाबाद विभागात 6 हजार 344, नाशिक विभागात 4 हजार 861, कोकण विभागत 2 हजार 645 तर पुणे विभागात 3 हजार 996 ग्रामरोजगार सेवक आहेत. त्यांना या नव्या मानधन वितरण प्रणालीमुळे  वेळेवर मानधन मिळण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.

 

            राज्यात 28 हजार 642 ग्रामपंचायातीमार्फत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. या योजनेच्या अंमलबजावणी ग्रामपंचायतस्तरावर अभिलेख व नोंदवह्यासाठी ग्रामपंचायतीच्या ठरावानुसार ग्रामरोजगार सेवकांची नियुक्ती केली जाते. राज्यात 25 हजार 258 ग्रामरोजगार सेवक मानधन तत्वावर नियुक्त करण्यात आले असून त्यांना मानधनापोटी 48 कोटी 93 लक्ष रुपयापेक्षा जास्त मानधन वितरीत केल्या जाते. ग्रामरोजगार सेवकांना मानधनापोटी 1 लक्ष 90 हजार 403 रुपये म्हणजेच सरासरी मासिक 15 हजार 867 रुपये मानधनाचे वितरण केल्या जाते हे मानधन एकूण वार्षिक मनुष्य दिवस व एकूण मजुरी प्रदानाच्या खर्चाच्या टक्केवारीवर देण्यात येते. पूर्वी मानधन खंडविकास अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येत होते. त्यानंतर संबंधित ग्रामपंचायतींना वितरीत झाल्यानंतर मानधन मिळत होते. या प्रक्रियेला होणारा विलंब कमी करून आयुक्तालयाने थेट मानधनाचा निर्णय घेतला आहे.

            महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामपातळीवर रोहयोची कामे प्रभावी व परिणामकारक राबविण्याकरिता ग्रामपंचायतीमार्फत ग्राम रोजगार सेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामसेवकांमार्फत रोजगार हमी योजनेचे अभिलेख व नोंदवह्या ठेवण्याची जबाबदारी ग्राम रोजगार सेवकांना देण्यात आली आहे. या ग्राम रोजगार सेवकांना मनुष्य दिवस निर्मिती तसेच एकूण मजुरी प्रदानाच्या सरासरी 6, 4 व 2.5 टक्केपर्यंत मानधन देण्यात असून मानधन वितरणामध्ये होणारा प्रचंड विलंब टाळण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे आयुक्त ए. एस. आर. नायक यांनी विहित पध्दतीचा अवलंब करून थेट ग्रामपंचायतीमार्फत अनुदान वाटपाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील ग्रामरोजगार सेवकांना वेळेवर व नियमित मानधन ग्रामपंचायतीमार्फत‍ देण्याची सुविधा निर्माण झाली आहे. यापूर्वी मानधन तालुकास्तरावर वितरीत झाल्यानंतर प्रत्यक्ष वितरणाला मोठ्या प्रमाणात विलंब होत होता.

           

             

****

No comments:

Post a Comment