युवा केंद्रांना सक्षम करा - रविंद्र ठाकरे
नेहरु युवा केंद्र जिल्हा सल्लागार समितीची बैठकनागपूर, दि. 04: गेल्या अनेक वर्षापासून नेहरू युवा केंद्र जिल्ह्यात पथ नाट्य व खेळांच्या माध्यमातून जनजागृती करत आहे. त्यासाठी केंद्रांना सक्षम करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिल्यात. जिल्ह्यात युवा केंद्रांना जिल्हा प्रशासनातर्फे सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
नेहरु युवा केंद्राच्या वतीने जिल्हा सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी नेहरु युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक उदयविर, श्री. वाळके, तसेच युवा केंद्राचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
युवा केंद्रांना सक्षम करुन ग्रामीण भागात शिबीरद्वारे जनजागृती करावी. युवा केंद्राचे केंद्रीकरण न करता विकेंद्रीकरणाद्वारे जिल्ह्यात ग्रामीण भागात जनजागृती
करुन कार्यक्षमता वाढविणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. आरसेटी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, कौशल्य विकास व समाज कल्याण विभागाशी चर्चा करुन योजना राबविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. समन्वयातून ग्रामीण भागातील लोकांपर्यत योजना पोहचल्या पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.
नेहरु युवा केंद्र 1972 पासून ग्रामीण युवा सक्षमीकरणासाठी कार्य करीत आहे. केंद्रीय युवा व खेळ मंत्रालयाद्वारे राबविण्यात येणाऱ्या या कार्यक्रमांतर्गत देशातील युवक व युवतींना शिक्षण, सक्षमता, नेतृत्व, व्यक्तीमत्व विकास आणि कला कौशल्य यांना चालना देण्यासाठी हा उपक्रम राबवित आहे.
नेहरु युवा केंद्राद्वारे ग्रामीण भारतातील खेळाडूंना खेळासाठी प्लॅटफार्म मिळावा, हे उद्दिष्ट समोर ठेवून प्रत्येक ब्लॉकमध्ये 2 युवा संघटक नेमण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यांना प्रशिक्षण देऊनच समाजामध्ये पाठविण्यात येणार आहे. तसेच बँकींग क्षेत्रात 50 बँक मित्र नियुक्त करण्यात येऊन ऑनलाईन बँकींग सेवेची जनतेमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच सोशल मीडियाची अधिकाधिक माहिती व्हावी, डिजिटल माध्यमांची जनजागृती व्हावी, या उद्देशाने हे युवा संघटक काम करणार आहेत. युथ ओरिएंटेशनबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
यावेळी नेहरु युवा केंद्रांतर्गत जिल्ह्यात युवक, युवतींकरिता राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत युवा संघटन आर्ट अँड कल्चर प्रोग्राम, कोविड-19 बाबत जनजागृती, स्वच्छ ग्राम-हिरवे ग्राम प्रशिक्षण, युवा जल जागरण अभियान, ई-पोस्टर्स, जिल्हास्तरीय स्पोर्टमिट, युथ फिट इंडिया मुव्हमेंट कार्यक्रमांतर्गत 15 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर पर्यंत राबविण्यात आल्याची माहिती देण्यात आली. तसेच वार्षिक कार्य योजना 2020-21 बाबत माहिती देण्यात आली.
*****
No comments:
Post a Comment