Saturday 10 July 2021

कोरोना‍ नियंत्रण आणि विकासकामांवर भर देणार - आर. विमला

जिल्हाधिकारी पदाचा स्विकारला पदभार नागपूर, दि. 10: कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळविणे आणि जिल्ह्यातील विविध विकासकामांना गती देणार असल्याचे नूतन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी आज सकाळी येथे पदभार स्विकारल्यानंतर सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात पदभार स्विकारल्यानंतर जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत त्यांनी आढावा बैठक घेतली. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची पोटनिवडणूक स्थगित झाली असल्यामुळे निवडणूकविषयक कामकाज आणि कोविड नियंत्रणाबाबत आढावा घेतला. अतिरिक्त जिल्हाधिकारी शिरिष पांडे, निवासी उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे, उपजिल्हाधिकारी जगदीश काटकर, आशिष बिजवल, ज्ञानेश भट, श्रीमती सुजाता गंधे, शितल देशमुख, विजया बनकर, हेमा बढे, मिनल कळसकर, जिल्हा नियोजन अधिकारी मिलिंद नारिंगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, जिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे, अन्नधान्य वितरण अधिकारी अनिल सवई, अधीक्षक निलेश काळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे, जिल्हा प्रशासन अधिकारी अतुल पंत उपस्थित होते. जिल्ह्यातील कोरोना नियंत्रण स्थितीची माहिती देताना टेस्टिंग, कॉन्टँक्ट ट्रेसिंग आणि ट्रिटमेंटवर भर दिल्यामुळे कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यात जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाला यश आल्याचे डॉ. पातूरकर यांनी सांगितले. मुबलक प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा करण्यासह म्युकरमायकोसिस नियंत्रणावर प्रशासनाने भर दिला आहे. तसेच केंद्र शासनाकडून दोन ऑक्सिजन प्लॉट उभारण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिका-यांना देण्यात आली. अल्पपरिचय श्रीमती आर. विमला या 2009 च्या तुकडीच्या आयएएस अधिकारी आहेत. यापूर्वी राज्य ग्रामीण आजीविका मिशन (एमएसआरएलएम) च्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्या कार्यरत होत्या. गेल्या 27 वर्षात श्रीमती विमला यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यात लघु उद्योग उद्योग विकास महामंडळाचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक, करमणूक शुल्क आणि प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन उपायुक्त आणि दादासाहेब फाळके फिल्म सिटीच्या सहव्यवस्थापक संचालक आदी पदांचा समावेश आहे. राज्यातील मनरेगाच्या अंमलबजावणीतही त्यांनी उपसचिव म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. महिला सशक्तीकरणाच्या कार्यात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. ग्रामीण महाराष्ट्रात महिला सबलीकरणासाठी त्यांनी 2016 पासून कार्य केले असून, एमएसआरएलएमच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून विमला यांनी स्वयं-सहायता गट (एसएचजी) आणि समुदाय-आधारित संस्थांच्या माध्यमातून महिलांच्या जीवनात बदल घडवून आणविले आहे. ******

No comments:

Post a Comment