Friday, 28 February 2025

विशेष सहाय्य योजनांचे उद्दिष्ट मार्च अखेरपर्यंत पूर्ण करा - मंत्री नरहरी झिरवाळ

 


                                        नागपूर विभागाची आढावा बैठक

 नागपूर, दि.२८ :  राज्याच्या विशेष सहाय्य विभागांतर्गत नागपूर विभागात राबविण्यात येणाऱ्या राज्य व केंद्र पुरस्कृत योजनांचे उद्दिष्ट मार्च अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश, अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विभागातील सर्व जिल्ह्यांना दिले.

 मंत्री श्री. झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात राज्याच्या विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत नागपूर विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. प्रभारी विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, विभागीय आयुक्त कार्यालयातील सामान्य प्रशासन अपर आयुक्त प्रदीप कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे तर नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व वरिष्ठ अधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे या बैठकीस उपस्थित होते.

 


विभागात सर्वसाधारण, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती घटकासाठी राबविण्यात येत असलेल्या राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनांची माहिती देण्यात आली. या योजनांतर्गत विभागात ७ लाख ७३ हजार ८९९ पात्र लाभार्थी असून त्यांची थेट लाभ हंस्तातरण (डिबीटी) पोर्टलवर सर्व जिल्ह्यांद्वारे करण्यात आलेल्या नोंदीबाबत श्री. झिरवाळ यांनी समाधान व्यक्त केले तसेच आधारकार्ड प्रमाणिकरण, बँकेस संलग्नीकरण करण्याच्या कामाला गती देण्याच्या सूचना केल्या.

 नागपूर विभागात सर्वसाधारण, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती घटकासाठी राबविण्यात येत असलेल्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना आणि राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेच्या अंमलबजावणीबाबतही श्री. झिरवाळ यांनी माहिती घेतली. नागपूर विभागात या योजनांतर्गत २ लाख ६० हजार २० पात्र लाभार्थी असून त्यांची एनएसएपी पोर्टलवर नोंद झाली आहे. या योजनेच्या लाभासाठी मोबाईल अद्ययावतीकरण, आधारकार्ड प्रमाणिकरण व बँकेस संलग्नीकरण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

  


                                                

विशेष सहाय्य योजनांचे सामाजिक अंकेक्षणाचे काम राज्यात ३० मार्च २०२४ पासून सुरु आहे. या कार्यवाहीचा आढावाही श्री. झिरवाळ यांनी यावेळी घेतला. यासर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला देण्यात आलेले उद्दिष्ट मार्च २०२५ अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

 विभागातील अन्न व औषध प्रशासन विभागाचा आढावाही त्यांनी घेतला. औषध प्रशासन विभागाचे नागपूर सह आयुक्त विराज पवनीकर, सहायक आयुक्त मनिष चौधरी व निरज लोहकरे यावेळी उपस्थित होते. नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये करण्यात आलेल्या उत्पादकांच्या तपासण्या व कार्यवाहीबद्दल माहिती देण्यात आली. औषध विक्रेत्यांवर करावयाच्या कार्यवाहीतंर्गत विभागात झालेल्या तपासण्या  त्यानुसार विक्रेत्यांना पाठविण्यात आलेल्या कारणे दाखवा नोटीस,विक्रेत्यांचे परवाने निलंबन व रद्द करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. अन्न प्रशासन विभागाच्या आढावा बैठकीस सह आयुक्तांनी विभागात देण्यात आलेले परवाने, झालेली नोंद व करण्यात आलेल्या कार्यवाहीबद्दल सविस्तर माहिती दिली.

 

000000

 

 

 

 

 

  

 


Thursday, 27 February 2025

राज्यस्तरीय विज्ञान स्पर्धेच्या बक्षीसात वाढीचा निर्णय लवकरच - शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर

 



नागपूर, दि.२७ : विद्यार्थ्यांना पाठ्यक्रमासोबतच विज्ञान क्षेत्रात पुढे जाण्याकरिता प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन सकारात्मक आहे. लवकरच राज्यस्तरीय विज्ञान स्पर्धेचे बक्षिस वाढवून प्रथम क्रमांकाचे बक्षिस ५१ हजार रुपये करण्यात येणार असल्याची घोषणा आज शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी येथे केली.

 

राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या पूर्व संध्येला धरमपेठ येथील प्रो.राजेंद्रसिंह सायंस एक्सप्लोरेट्रीमध्ये आयोजित विशेष कार्यक्रमात राज्यमंत्री श्री. भोयर बोलत होते. प्रो.राजेंद्रसिंह सायंस एक्सप्लोरेट्रीमच्या संचालक डॉ. सीमा उबाळे,  उल्हास औरंगाबादकर, हेमंत चाफले, विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

 


            राज्यात शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडविण्याच्यादृष्टीने शिक्षण विभाग प्रयत्नशील असल्याचे सांगून श्री. भोयर म्हणाले, विद्यार्थी केंद्रबिंदू मानून आखण्यात आलेल्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीतून भारतात शिक्षण क्षेत्रात महत्वपूर्ण बदल घडणार आहेत. राज्यातही या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. क्रमीक पाठ्यक्रमासोबतच विद्यार्थ्यांच्या आवडीच्या विषयांमध्ये प्रोत्साहन देण्याचे कार्य शिक्षण विभाग करीत आहे.

 

विज्ञान क्षेत्रात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठीही शालेय शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे. राज्यस्तरीय विज्ञान स्पर्धेचे प्रथम बक्षीस ५ हजार रुपयांवरून ५१ हजार रुपये करण्याचा निर्णय विभागाच्या विचाराधीन असून लवकरच तो जाहीर होऊन त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

 

विद्यार्थ्यांना विज्ञान क्षेत्रात प्रोत्साहन देऊन त्यांच्यामधून भविष्यातील वैज्ञानिक घडविण्याच्यादृष्टीने आवश्यक ते प्रयत्न करण्यात येतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. तत्पूर्वी श्री भोयर यांनी या ठिकाणी आयोजित विज्ञान प्रदर्शनीतील मांडण्यात आलेल्या विविध प्रयोगांचे निरीक्षण केले.

 

मुंबई येथील डॉ. होमीभाभा विज्ञान केंद्राच्या बाल वैज्ञानिक स्पर्धेत सरस कामगिरी करणाऱ्या आफिया आफताब, कीर्ती येणुरकर आणि आदित्य रंजन या विद्यार्थ्यांचा राज्यमंत्री श्री. भोयर यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला. डॉ. सीमा उबाळे यांनी सूत्रसंचालन केले तर हेमंत चाफले यांनी आभार मानले.

००००००


Monday, 24 February 2025

‘नमो किसान सन्मान निधी योजनेंतर्गत’ 3 हजार रुपये वाढून देणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 



Ø  राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाकाठी आता 15 हजारांचा सन्मान निधी

Ø  ‘पीएम किसान सन्मान योजनेच्या’ 19 वा हप्ता वितरण राज्यस्तरीय कार्यक्रम

Ø  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील शेतकरी कुटुंबांच्या खात्यात ‘पीएम किसान सन्मान निधीचे’ 22 हजार कोटी वितरीत

Ø  राज्यातील शेतकरी कुटुंबांना ‘पीएम किसान सन्मान निधीचे’ 1 हजार 967 कोटी वितरीत

            नागपूर, दि. 24 : केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी समर्पित असून या दिशेने जोरकस प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा फायदा होत आहे. राज्य शासनही केंद्राप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना ‘नमो किसान सन्मान निधी योजनेंतर्गत’ 6 हजार रुपये देत असून लवकरच हे अर्थसहाय 3 हजार रुपयांनी वाढविण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली.

            पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भागलपूर, बिहार येथे 'प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्त्याचे वितरण' झाले. या वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वनामती येथील कै. वसंतराव नाईक स्मृती सभागृहात आयोजित करण्यात आला यावेळी ते बोलत होते. कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, प्रभारी विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे,  कृषी आयुक्त सुरज मांढरे,  वनामतीचे प्रभारी संचालक रविंद्र ठाकरे आदी उपस्थित होते.



मुख्यमंत्री श्री. फडणीस म्हणाले, पीएम किसान सन्मान निधी योजनेद्वारे देशातील शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात आर्थिक मदत मिळत आहे. या योजनेंतर्गत केंद्र शासन वर्षाला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट 6 हजार रुपये वितरीत करते. तर राज्य शासनाच्या वतीने ‘नमो किसान सन्मान निधी योजनेद्वारे’ शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते.  आता राज्य शासन या निधीत 3 हजार रुपयांनी वाढ करणार असून राज्याद्वारे 9 हजार आणि केंद्रशासनाचे 6 हजार असे शेतकऱ्यांना आता वर्षाला 15 हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळणार आहे.

राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी ‘जलयुक्त शिवार योजना’ आणली त्यातून मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे झाली. केंद्र शासनाकडून ‘बळीराजा जलसंजीवनी योजना’ मंजूर करून घेतली. या योजनेतून विदर्भातील 89 सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात आले. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या पहिल्या टप्प्याची अंमलबजावणी करण्यात आली असून दुसऱ्या टप्प्यात मराठवाडा व विदर्भातील उर्वरित भागात या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत कृषी औजार, शेततळी आदी अनुदान पद्धतीने लक्षांक न ठेवता गावातील सर्व शेतकऱ्यांना सर्व योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. 6 हजार कोटींच्या खर्चातून या योजनेंतर्गत आतापर्यंत कामे झाली असून येत्या काळात ही योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.        


                           

शेतकरी उत्पादक गटांना रोजगारक्षम कृषी प्रक्रिया उद्योग, ग्रेडींग व्यवस्था आदी समग्र सुविधा पुरवणारी ‘स्मार्ट योजना’ आणली असून  त्याचा बहुतांश शेतकरी लाभ घेवून विकास साधत आहेत. ॲग्रीस्टॅक ही महत्वाची योजना हाती घेण्यात आली आहे. याद्वारे संपूर्ण शेतीचे डिजीटायजेशन करून प्रत्येक शेतकऱ्याला आवश्यक लाभ देण्यात येणार आहे. मध्यस्थाशिवाय शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्याला लाभ मिळणार आहे. राज्यात आतापर्यंत ॲग्रीस्टॅक अंतर्गत 54 टक्के शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली असून लवकरच 100 टक्केचे उद्दीष्ट गाठण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

येत्या 5 वर्षात शेतकऱ्यांकडून वीज बिल न घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मागेल त्याला सौरपंप योजना सुरू असून मागील 1 वर्षात 1 लाख शेतकऱ्यांना याअंतर्गत सौरपंप देण्यात आले आहेत. सौरपंप घेणाऱ्या शेतकऱ्यांना पुढील 25 वर्षात वीज बिलाची चिंता नसणार असे त्यांनी सांगितले. गेल्या अडीच वर्षात 150 पेक्षा जास्त सिंचन योजनांना फेर प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.



विदर्भातील शेतीचे चित्र बदलणारा वैनगंगा-नळगंगा नदी जोड प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या माध्यमातून गोसेखुर्द धरणातील वाया जाणाऱ्या पाण्याचा उपयोग करून वैनगंगा नदीद्वारे 550 कि.मी. पर्यंत पाणी वाहून नेत बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा नदीपर्यंत घेवून जाण्यात येणार आहे. याद्वारे नागपूर, अमरावती, वर्धा, अकोला, बुलडाणा अशा एकूण 7 जिल्ह्यांमध्ये दुष्काळी भागाला याचा फायदा होणार आहे. या प्रकल्पाद्वारे 10 लाख हेक्टर जमीन ओलीताखाली येणार व याद्वारे मोठे परिवर्तन घडेल, असेही त्यांनी सांगितले. ड्रोन दीदी योजनेद्वारे महिलांना प्रशिक्षण देवून ड्रोनद्वारे शेतीत फवारणी करण्याचा अभिनव प्रकल्पही हाती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

कृषीराज्य मंत्री ॲड. आशिष जयस्वाल म्हणाले, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राज्य शासन प्रयत्नरत आहे. पीएम ‘किसान सन्मान निधी’ व ‘नमो किसान सन्मान’ निधीच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे. शेतकऱ्यांचे उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढीसाठी व शेतीच्या विकासासाठी कृत्रीम बुध्दीमत्तेचा वापर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.  



दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्त्याचे 22 हजार कोटी रूपये आज देशातील शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यात आले. राज्यातील 92.89 लाख शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात 1 हजार 967 कोटी रूपये थेट वितरीत झाले आहेत.  मागील सहा वर्षात पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत देशातील 3.7 लाख कोटी शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात वितरीत करण्यात आले. तर राज्यातील पात्र शेतकरी कुटुंबांना या योजनेंतर्गत आतापर्यंत एकूण 18 हप्त्यांमध्ये 33 हजार 565 कोटींचा लाभ जमा झाला आहे.

तत्पूर्वी, मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते वनामती परिसरातील कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन झाले. त्यांनी प्रदर्शनीला भेट देवून विविध स्टॉलची पाहणी केली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रगतीशील शेतकऱ्यांना गौरविण्यात आले.

00000

 

 

 


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या हप्त्याचे वितरण

 


वनामती येथे राज्यस्तरीय कार्यक्रमाद्वारे दूरदृश्य प्रणालीने सहभाग

 

नागपूर,दि. 23 : पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत डिसेंबर 2024 ते मार्च 2025  कालावधीतील 19वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवार दिनांक 24 रोजी दुपारी 1.30 वा. बिहार राज्यातील भागलपूर येथील समारंभाद्वारे वितरीत होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या समारोहास नागपूर येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होणार आहेत. हा राज्यस्तरीय समारोह नागपूर येथील वनामती सभागृहात आयोजित करण्यात आला असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

 

केंद्र शासनाने शेतक-यांना निश्चित उत्पन्न देण्याकरीता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजना फेब्रुवारी, 2019 पासून सुरु केली आहे. या योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील अपत्ये) 2 हजार रुपये प्रती हप्ता प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी 6 हजार रुपये त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येतात. पीएम किसान योजनेंतर्गत राज्यातील पात्र शेतकरी कुटुंबांच्या खात्यात यापुर्वी एकूण 18 हप्त्यांमध्ये सुमारे 33 हजार 565  कोटी रुपयांचा लाभ जमा झालेला आहे.

 

पीएम किसान योजनेच्या लाभासाठी केंद्र शासनाने लाभार्थीना भूमी अभिलेख नोंदणी अद्यावत करणे, बँकखाते आधार संलग्न करणे, ई-केवायसी प्रमाणिकरण करणे या बाबी आवश्यक केलेल्या आहेत.

 

राज्यातील सद्यस्थितीत या तीनही बाबीची पूर्तता केलेल्या एकूण 92.89 लाख शेतकरी कुटुंबांना दिनांक 24 फेब्रुवारी, 2025 रोजी सुमारे  रुपये 1967 कोटीहून अधिक रक्कमेचा लाभ शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट हस्तांतरणाद्वारे जमा होणार आहे. राज्य शासनामार्फत नमो किसान सन्मान योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दर तीमाहीस  2 हजार रुपये रक्कमेचेही वितरण करण्यात येते.

 

राज्यातील प्रत्येक कृषी विज्ञान केंद्र तसेच जिल्हा, तालुका व ग्राम पंचायत स्तरावर हा समारोह आयोजित करण्यात येत आहे. सदरहू समारंभाच्या वेळी प्रगतशील शेतकरी कृषी शास्त्रज्ञ, निमंत्रित मान्यवर, तसेच शेतकरी यांच्या उपस्थितीत चर्चासत्र, प्रदर्शने, विविध योजनांची माहिती व लाभ वितरण कार्यक्रमाचा समावेश करण्यात आला आहे.

 

राज्यात वेगाने सुरु असलेल्या अग्रीस्टॅक योजनेंतर्गत शेतकरी माहिती संच तथा फार्मर आयडी बनविण्यासाठीची नोंदणी नागरी सुविधा केंद्रांवरुन करण्यात येत आहे. या ठिकाणांवरुनही या समारोहाचे थेट प्रक्षेपणामध्ये शेतकऱ्यांना सहभागी होता येईल.

 

या समारोहाचे थेट प्रक्षेपण केंद्र शासनाच्या https://pmindiawebcast.nic.in या लिंक वरून होणार आहे. लिंकचा वापर करून राज्यातील जास्तीत जास्त शेतकरी बंधु भगिनींनी या समारोहामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांनी केले आहे.

 

00000

मिस्टेक्स रॅबिट मेड’ पुस्तकात समाजाचे प्रतिबींब - विजयलक्ष्मी बिदरी

 


    नागपूर,दि. 23 : "ससा आणि कासव "या सर्व परिचित कथेचा आधार जरी असला तरी त्यातून मानवी व सामाजिक जीवनातील अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्द्यावर या पुस्तकात प्रकाश टाकला असून आजही या कथेची प्रासंगिकता पुस्तकाचे लेखकांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली. या पुस्तकातील शर्यतीपूर्वी घडणाऱ्या घटना अतिशय समर्पकपणे मांडल्या असून कासवापेक्षा अत्यंत वेगवान असलेला ससा ज्या कारणांमुळे हरतो तीच कारणे माणसाच्या देखील अधोगतीस कारणीभूत ठरतात त्यामुळे मानवाच्या प्रगतीकरिता हे पुस्तक एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज असल्याचे मत विभागीय आयुक्त  विजयलक्ष्मी बिदरी  यांनी व्यक्त केले.

नागपूर मधील क्रॉसवर्ड्स येथे  राजेश ढाबरे कस्टम्स कमिशनर चेन्नई लिखित मिस्टेक्स रॅबिट मेड या पुस्तकाचे विमोचन विभागीय महसूल आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अविनाश थेटे, किशोर मानकर व जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या उपस्थित होते.

 बोधकथेची मांडणी  अतिशय नाविन्यपूर्ण शैलीत केल्याबद्दल लेखकाचे विभागीय आयुकत बिदरी यांनी त्यांचे अभिनंदन केले तसेच सर्वांना हे पुस्तक वाचण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमात अभिनव कलानिकेतन व आंबेडकरी नाट्य साहित्य क्षेत्रातील दादाकांत  धनविजय, पुरण मेश्राम कुलसचिव नागपूर विद्यापीठ वनराईचे गिरीश गांधी, सामाजिक चळवळीतील वामन सोमकुवर आदी मान्यवर उपस्थित होते.

पाहुण्यांचे स्वागत डॉ. भावना ढाबरे, डॉ. माधवी ढाबरे यांनी केले. सूत्रसंचालन अश्विनी कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन अजय चालखूरे यांनी केले.                                              

00000


जिल्ह्यातील 19 हजार 85 लाभार्थ्यांना मंजूरीपत्राचे झाले वाटप * जिल्ह्यातील तब्बल 12 हजार 832 लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण * दूरदृष्य प्रणालीद्वारे प्रतिनिधीक लाभार्थी झाले सहभागी

 

नागपूर, दि. 22 –  देशातील कोणताही व्यक्ती आपल्या हक्काच्या घरापासून वंचित राहू नये या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण टप्पा-2 अंतर्गत आज जिल्ह्यातील सूमारे 19 हजार 85 लाभार्थ्यांना मंजूरीपत्र देण्यात आले. याचबरोबर तब्बल 12 हजार 832 लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात आले.

देशातील प्रत्येक गरीब व्यक्तीचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-2 (2024-25) अंतर्गत राज्याच्या ग्रामीण विकास व पंचायत राज विभागामार्फत पुणे येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मान्यवरांच्या उपस्थितीत आज विशेष समारंभ आयोजित करण्यात आला होता. दूरदृष्य प्रणालीद्वारे राज्यातील सर्व जिल्ह्यांसह नागपूर जिल्ह्यातील लाभार्थी प्रातिनिधीक स्वरुपात सहभागी झाले होते.

येथील जिल्हा परिषदेच्या स्व. आबासाहेब खेडकर सभागृहात दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झालेल्या प्रातिनिधीक स्वरुपात 70 लाभार्थ्यांना घरकुल मंजूरीपत्राचे वितरण करण्यात आले. याचबरोबर जिल्ह्यातील ग्रामीण भागात ग्रामपंचायत पातळीवरही दूरदृष्य प्रणालीद्वारे लाभार्थी सहभागी झाले होते.

पुणे येथील मुख्य समारंभात  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोड व मान्यवर उपस्थित होते.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, ग्रामविकास विभागाचे उपायुक्त कमलकिशोर फुटाणे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका वर्षा गौरकर व उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपूल जाधव व वरिष्ठ  अधिकारी  यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभाग घेतला.

00000

 


Friday, 21 February 2025

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विविध विषयांवर बैठक घेतली

 पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विविध विषयांवर बैठक घेतली




 

       नागपूर, दि. 20 : महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर शहर व ग्रामीण भागात पोलीस स्टेशन उभारण्यासह विविध विषयांवर आज विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेतली.

            आयुक्तालयाच्या सभागृहात आयोजित या बैठकीस प्रभारी विभागीय आयुक्त डॉ. माधुरी खोडे-चवरे, मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी,  पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक व केंद्रस्थ अधिकारी नरेश झुरमुरे, मुख्य वनसंरक्षक ए. श्रीलक्ष्मी आदी यावेळी उपस्थित होते.

            नागपूर शहर व परिसरात वाढती लोकसंख्या लक्षात घेता गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी व परिसरात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीस विभागाच्या नागपूर ग्रामीण, शहर व आयुक्तालय हद्दीत नव्याने पोलीस स्टेशन उभारण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करून शासनास सादर करण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले. यासोबतच महसूल व वने, मृद व जलसंधारण विभागासंदर्भातील विविध विषयांवर श्री. बावनकुळे यांनी यावेळी निर्देश दिले.

०००००


Thursday, 20 February 2025

बाळशास्त्री जांभेकर यांना विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन

 




    नागपूर, दि.
२० : मराठी वृत्तपत्रव्यवसायाचे जनक व पहिल्या आंग्लशिक्षित पिढीतील अग्रगण्य विद्वान बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती आज विभागीय आयुक्त कार्यालयात साजरी करण्यात आली.

          आयुक्तालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सामान्य प्रशासन अपर आयुक्त प्रदीप कुलकर्णी यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

 


0000000


Saturday, 15 February 2025

पदवीच्या ज्ञानाचा वापर समाजहितासाठी करा - सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचे आवाहन

 



     ·         स्वयंशिस्त आणि कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही

                             ·         महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचा तिसरा दीक्षांत समारंभ उत्साहात

 नागपूर, दि. 15 - जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम आणि स्वयंशिस्त असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या पदवीच्या ज्ञानाचा वापर हा समाज हितासाठी करण्याचे आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी आज येथे केले.

वर्धा रोडवरील वारंगा येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचा तिसरा दीक्षांत समारंभ आज आयोजित करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा विधी विद्यापीठाचे कुलपती भूषण गवई  हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे, न्यायमूर्ती अतुल चांदूरकर, न्यायमूर्ती नितीन सांबरे, न्यायमूर्ती अनिल किलोर, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर,  कुलगुरु प्रा. डॉ. विजेंदर कुमार, महाराष्ट्राचे महाधिवक्ता बीरेंद्र सराफ, विधी विद्यापीठाचे कुलसचिव विवेक गव्हाणे  यांच्यासह विधी क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी व त्यांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते.

 


विधी कारकीर्दीत सखोल अभ्यास तसेच कायद्याची समज आवश्यक असते. विधी विद्यापीठातून कायद्याची अक्षर ओळख करून घेण्यासोबतच कायद्यामागची  भूमिका,  इतिहास, कायद्याचा व्यावहारिक उपयोग आणि अंमलबजावणी समजून घेणे आवश्यक असते. तुमच्या कामामुळे लोकांचे जीवनमान तसेच स्वातंत्र्यावर परिणाम होतो. त्यामुळे विधी कारकीर्द हे महत्त्वपूर्ण असे क्षेत्र ठरते. आयुष्यात स्वयंशिस्त आणि कठोर परिश्रम जोपासत आपल्या पदवीच्या ज्ञानाचा वापर हा समाज हितासाठी करण्याचे आवाहन सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी केले.



विधी विद्यापीठातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कारकीर्दीचे विस्तीर्ण असे  क्षेत्र खुले आहे. कायद्याच्या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी आता विविध शाखा उपलब्ध झाल्या आहेत.    ज्ञानार्जनासाठी अनेक संधी आज उपलब्ध झाल्याचे प्रतिपादन विधी विद्यापीठाचे कुलपती सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी दीक्षांत समारंभाप्रसंगी केले .

तत्पूर्वी, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ . विजेंदर कुमार यांनी विद्यापीठाच्या शैक्षणिक कामगिरीचा आणि उपक्रमांचा आढावा उपस्थितांसमोर मांडला. या दीक्षांत समारंभाला विधी क्षेत्रातील मान्यवरांची  तसेच शिक्षक आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती .

      


                                                                                             

 आदिती बैसला सर्वाधिक सात सुवर्णपदके


पदवीप्रदान समारंभात एकूण १५५ पदवी प्रदान करण्यात आल्या. ज्यामध्ये ११२ पदवी, २८ पदव्युत्तर आणि १५ पीएच.डी. पदव्या समाविष्ट होत्या. सर्वाधिक सात सुवर्णपदके विद्यार्थिनी अदिती बैस यांना मिळाली. उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीसाठी विद्यापीठाचे सुवर्णपदक विद्यार्थी विश्वजीत राव आणि विद्यार्थिनी आकांक्षा बोहरा यांना सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

 

******

 

 


रामटेक चित्रनगरीसाठी जागा हस्तांतरणाबाबत त्वरित प्रशासकीय कार्यवाही करा - आशिष शेलार


 

नागपूर, दि. 15 : रामटेक येथील नियोजित चित्रनगरीसाठी महसूल विभागाने सांस्कृतिक विभागास तत्काळ जागा हस्तांतरीत करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने या चित्रनगरीचे निर्माण होत असून या प्रकल्पासाठी सांस्कृतिक विभागाने तत्वत: मान्यता दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

         जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात चित्रनगरीबाबत आढावा घेतांना ते बोलत होते. सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री आशिष जयस्वाल, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यावेळी उपस्थित होते. रामोजी फिल्म सिटीचे संचालक राजीव जालनापूरकर यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे सहभाग घेतला.

         रामटेक येथील खिंडसी तलावाजवळ चित्रनगरी तयार करण्यात येणार आहे. चित्रीकरण व इतर बाबींसाठी ही जागा योग्य असून हे ठिकाण वनक्षेत्राशी जोडले असल्याने पर्यटनास भरपूर वाव आहे. यातून रोजगार निर्मिती होईल. चित्रनगरीसाठी प्रशिक्षीत मनुष्यबळ तयार करण्यासाठी येथे प्रशिक्षण केंद्र तयार करण्यात येईल असे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले.

         चित्रीकरणासाठी लोकांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. चित्रनगरीसाठी याक्षेत्रातील लोकांनी कार्यशाळा घ्याव्यात, असे ते म्हणाले.

         या प्रकल्पामुळे मध्यप्रदेश छत्तिसगड येथील निर्मात्यांना डाक्युमेंटरी, लघुपट तयार करण्यासाठी मोठी सुविधा उपलब्ध होणार असल्याचे सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सांगितले.

         ही चित्रनगरी नागपूर विमानतळ येथून अवघ्या 40 किलोमिटरवर आहे. याभागात रिसार्ट भरपूर आहेत. यासर्व बाबींचा लाभ निर्मात्यांना होईल, असेही त्यांनी सांगितले.

 

00000

 

Friday, 14 February 2025

विभाग स्तरावर कृषी कक्ष स्थापन करणार - कृषीमंत्री माणिकराव कोकाटे

 


   कृषी विद्यापीठ, कृषी विभाग आणि शेतक-यांमध्ये समन्वयाची गरज

             विभागातील प्रगतशील व प्रयोगशील शेतक-यांशी साधला संवाद

नागपूर, दि. 13 : शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाकडून अनेकविध योजना  व उपक्रम राबविण्यात येत आहेत. शासन शेतकऱ्याच्या पाठीशी भक्कमपणे असून शेतकऱ्यांचे विविध प्रश्न, अडचणी व समस्या सोडविणे सुकर व्हावे यासाठी विभाग स्तरावर कृषी मंत्री कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.

कृषिमंत्री श्री. कोकाटे यांनी राज्यातील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी विभागनिहाय प्रयोगशील व प्रगतशील शेतकऱ्यांचा परिसंवाद आयोजित करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत नागपूर विभागातील वनामती येथील सभागृहात शेतकऱ्यांनी अनेकविध सूचना, अपेक्षा, अडचणी कृषीमंत्र्यासमोर मांडल्या. यावेळी कृषी आयुक्त सुरज मांढरे, अपर आदिवासी विकास आयुक्त रवींद्र ठाकरे, पाणी फाउंडेशनचे डॉ . अविनाश पोळ,  विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाटगे, क्षेत्र संचालक (पेंच) प्रभुनाथ शुक्ला, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी मिलींद शेंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांच्यासह विभागातील कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी, प्रयोगशील शेतकरी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.



शेतकरी शेतात नवे-नवे प्रयोग करून शेतीचे उत्पन्न वाढवत असतात. कृषी विद्यापीठ, कृषी विभाग आणि शेतकरी यांच्यात समन्वय आवश्यक आहे. कृषी विद्यापीठाने पीक उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांसाठी कृषी संलग्न विविध प्रात्यक्षिके आयोजित करावीत. तंत्रज्ञानामध्ये पुढे जात शेतीसाठी ए. आय. तंत्रज्ञानाचा वापर वाढला पाहिजे. शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत ए. आय. तंत्रज्ञान पोहोचविण्याचा मानस आहे. आधुनिक तंत्रज्ञानासह शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास शासन कटिबद्ध असून यासाठी विभाग स्तरावर कृषी मंत्री कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याचे कृषिमंत्री श्री. कोकाटे म्हणाले.

शेतक-यांपर्यंत नवनवीन तंत्रज्ञान पोहोचविण्याची गरज आहे. कृषी विद्यापीठात अनेक नवनवीन प्रयोग होत असतात. या प्रयोगाची माहिती ही शेतक-यांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. शेतकरी हा प्रयोगशील असतो. त्यामुळे शेतक-यांचे प्रयोग हे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची गरज असल्याचे मंत्री श्री. कोकाटे यावेळी म्हणाले.

 शेतक-यांचे एकूण 13 गट आज सहभागी झाले होते. प्रत्येक गटात 20 शेतकरी याप्रमाणे विभागणी करण्यात आली होती. या शेतकऱ्यांनी आपल्या समस्या अडचणी व सूचना मांडल्या. गडचिरोलीतील भामरागड ते नागपुरातील सावनेर अशा नागपूर विभागाच्या सर्वच भागातील शेतक-यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाटगे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांनी केले. तर आभार विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी मिलींद शेंडे यांनी मानले.

                                                            *****