Tuesday, 17 June 2025

पीएमआवास (शहरी) योजनेच्या अंमलबजावणीबाबत विभागस्तरीय आढावा

 

नागपूर, दि. १७ : प्रधानमंत्री आवास योजना (पीएमआवास शहरी) १.० व २.० बाबत विभागाची कामगिरी उंचावणे व योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने विभागीय सह-आयुक्त संघमित्रा ढोके यांचे अध्यक्षतेखाली नुकतीच आढावा बैठक झाली. पीएमआवास १.० मधील मंजूर प्रकल्पांची संपूर्ण अंमलबजावणी आणि पीएमआवास २.० अंतर्गत सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

दृकश्राव्य माध्यमाद्वारे आयोजित या बैठकीस मनपा आयुक्त चंद्रपूर, नागपूर यांचे प्रतिनिधी कार्यकारी अभियंता. (न.पा.प्र.) रामराज ठाकूर, सर्व जिल्ह्यांचे जिल्हा सह आयुक्त व सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे मुख्याधिकारी तसेच शहरस्तरीय तांत्रिक तज्ञ (सीएलटिसी) उपस्थित होते.

  विभागातील महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायतीमध्ये राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) १.० व २.०, पीएम गतिशक्ती नॅशनल प्लॅन फॉरमल्टी-मॉडल कनेक्टीविटी या महत्वाकांक्षी योजना, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना, अमृत योजनेसह विविध योजनांचा आढावा घेण्यात आला.

पीएमआवास योजना (शहरी) १.० चे बीएलसी घटकांतर्गत एकूण २९८१५ घरकुले पूर्ण झालेली असून १५,६९९ घरकुले प्रगतीपथावर आहेत. तसेच प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० चे बीएलसी घटकांतर्गत एकूण १८,९२५ अर्ज प्राप्त झालेले पुढील मंजुरीचे कार्यवाहीकरिता प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. पीएम आवास योजना (शहरी) १.० मधील मंजूर प्रकल्पांची १०० टक्के अंमलबजावणी, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० अंतर्गत जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ मिळणेकरिता सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) सादर करण्याबाबत यावेळी सूचना  देण्यात आल्या.

नागपूर विभागातील संपूर्ण महानगर पालिका, नगरपालिका, नगरपंचायती व नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांचे मुख्यधिकारी, शहरस्तरीय तांत्रिक तज्ञ (सीएलटिसी) यांच्याकडून सविस्तर आढावा घेण्यात आला. ज्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे उद्दिष्ट कमी आहे त्यांना तातडीने उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या अनुषंगाने नियोजन करून उद्दिष्ट पूर्ण करण्याबाबत श्रीमती ढोके यांनी मार्गदर्शन करून तात्काळ १०० टक्के उद्दिष्टपूर्ती करण्याबाबत निर्देश दिले.

 प्रास्ताविक कार्यकारी अभियंता, (न.पा.प्र.) रामराज ठाकूर यांनी केले तर देवाजी सडमेक, (न.पा.प्र.) नागपूर यांनी उपस्थितांचे आभार मानले .

*******


नागपूरमध्ये उभारणार हेलिकॉप्टर निर्मिती कारखाना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतीत

 


मॅक्स एरोस्पेस आणि उद्योग विभागात सामंजस्य करार

सुमारे 8000 कोटींची गुंतवणूक होणार, 2000 रोजगार निर्मिती 

मुंबई/नागपूर, दि. 13 - नागपुरात सुमारे 8 हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा हेलिकॉप्टर उत्पादन निर्मिती कारखाना उभारण्यात येणार आहे. यासंदर्भात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेस अँड एव्हिएशन प्रा. लि. आणि महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागात नागपूरमध्ये हेलिकॉप्टर उत्पादन कारखाना उभारण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. नागपूरमधील संरक्षण उत्पादन क्षेत्राला यामुळे गती मिळणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृहात आयोजित कार्यक्रमात उद्योग विभागाचे सचिव पी अन्बलगन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू आदी उपस्थित होते. श्री. अन्बलगन आणि मॅक्स एरोस्पेसचे अध्यक्ष भरत मलकानी यांच्यात हा सामंजस्य करार झाला. या करारानुसार मॅक्स एरोस्पेस नागपूर येथे हेलिकॉप्टर निर्मिती कारखाना उभारणार असून त्याचे प्रत्यक्ष काम 2026 पासून सुरू होणार आहे. या प्रकल्पामध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सुमारे दोन हजार रोजगार निर्मिती होणार असून या प्रकल्पात आठ वर्षांमध्ये सुमारे 8 हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. 

हा करार भारताच्या ‘मेक इन इंडिया आणि ‘आत्मनिर्भर भारत मोहिमेला चालना देणारा टप्पा ठरणार आहे. हेलिकॉप्टरचे कस्टमायझेशन आणि पूर्ण उत्पादन यासाठी समर्पित असलेला हा महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रकल्प असेल. या उपक्रमामुळे महाराष्ट्र हे एरोस्पेस उत्पादनाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येणार आहे.

या प्रकल्पात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तंत्रज्ञानाचा समावेश असून, रोटरी-विंग प्लॅटफॉर्म्सचे कस्टमायझेशन, इंटिग्रेशन आणि फ्लाइट टेस्टिंग यासाठी हे उत्कृष्टता केंद्र (सेन्टर ऑफ एक्सलन्स) म्हणून कार्य करणार आहे. नागपूर विमानतळाजवळ हे केंद्र असल्यामुळे विद्यमान पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिक सपोर्टचा लाभ घेता येणार आहे. यामुळे भारताच्या वाढत्या एरोस्पेस पुरवठा साखळीतही योगदान मिळणार आहे.

यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, मॅक्स एरोस्पेसने हेलिकॉप्टर उत्पादनासाठी महाराष्ट्र विशेषतः नागपूरची निवड केल्याचा आनंद आहे. मॅक्स एरोस्पेसच्या व्यवसायाच्या प्रवासात राज्य शासनही सहभागी आहे. संरक्षण उत्पादन क्षेत्रासाठी नागपूरमध्ये चांगल्या सुविधा निर्माण केल्या आहेत. मॅक्स एरोस्पेसला त्यांच्या उत्पादन कारखान्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल. कंपनीने आपले उत्पादनाचे काम ठरलेल्या वेळेत सुरू करावे. 

श्री. मलकानी यांनी नागपूरमध्ये संरक्षण उत्पादन क्षेत्रासाठी परिपूर्ण परिसंस्था असून उत्पादन निर्मितीसाठी आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा राज्य शासनाने उपलब्ध करून दिल्या असल्याचे सांगितले. मी मूळचा महाराष्ट्राचा असल्याने महाराष्ट्रातच उत्पादन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हेलिकॉप्टर उत्पादन निर्मिती क्षेत्रात महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

                                                                                                                                 

सामंजस्य कराराचा तपशील:

प्रकल्पाचे नाव : हेलिकॉप्टर उत्पादन कारखाना

ठिकाण : नागपूर

गुंतवणूक : ₹8000 कोटी (8 वर्षांत)

रोजगार संधी : 2000

प्रस्तावित प्रारंभ वर्ष : 2026

 

ही भागीदारी महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाच्या दिशेने एक महत्त्वाची पावले ठरणार असून, भारताला संरक्षण क्षेत्रात स्वयंपूर्ण करण्यास हातभार लावणारी ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. 

यावेळी मॅक्स एरोस्पेचे अध्यक्ष भरत मलकानी, व्यवसाय विकासच्या प्रमुख मेघना मलकानी, मुख्य आर्थिक अधिकारी किरीट मेहता, अध्यक्ष जयेश मेहता, सल्लागार नीरज बेहेरे, सल्लागार  देवदत्त वानरे आदी उपस्थित होते.

00000

 


Friday, 13 June 2025

विभागीय लोकशाही दिनात एकही अर्ज प्रलंबित नाही

 

 

नागपूर, दि 9 :  विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली आज आयुक्तालयात विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यात एकही प्रकरण प्राप्त झाले नाही व यापुर्वीच्या लोकशाही दिनातील कोणतेही प्रकरण प्रलंबित नाही. 

विभागीय आयुक्तालयात आयोजित लोकशाही दिनात अपर आयुक्त (सामान्य प्रशासन) तेजुसिंग पवार, शहर व ग्रामीण पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी, नागपूर सुधार प्रन्यास, महानगरपालिका, आदिवासी विकास विभाग, वस्तू व सेवा कर, कामगार विभाग, जिल्हा परिषद, अपर राज्यकर आयुक्त, मुख्य वनरसंक्षक आदि विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

00000


वैद्यकीय मदतीच्या अर्जांवर नियमानुसार तत्काळ कार्यवाही व्हावी

 

 जनसंवाद हा उपक्रम सर्वसामान्यांच्या प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी;

बदल्यांचे अर्ज प्रशासकीय मार्गानेच सोडवा

                                                                                                  -  पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

जनसंवाद कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद 

नागपूर, दि. 8: वैद्यकीय मदतीसाठी शासनाकडे आलेले अर्ज संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ मार्गी लावावेत. नियमानुसार या अर्जावर तत्काळ कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाला दिले. तसेच जनसंवाद कार्यक्रमात बदल्यांची निवेदने स्वीकारण्यात येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

सदर येथील जिल्हा नियोजन भवन येथे आज पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या संवाद कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हाभरातून आलेल्या नागरिकांना 256 टोकन वितरित करण्यात आली. आस्थेवाईकपणे पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी निवेदनांचा स्वीकार करीत संबंधितांना कार्यवाहीचे निर्देश दिले. यात प्रामुख्याने वैद्यकीय मदतीचे अर्ज तत्काळ मार्गी लावावेत. जनसंवाद हा उपक्रम सर्वसामान्यांच्या प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी आहे. त्यामुळे बदल्यांचे अर्ज प्रशासकीय मार्गानेच सोडवावेत, असे मंत्री श्री. बावनकुळे यावेळी म्हणाले. 

प्रामुख्याने सांडपाणी, वीज, पाणी, रस्ते कामांची निवेदने पाहायला मिळाली. यात नगरपंचायत, नगरपरिषद, ग्राम स्तरावरील कामांचा प्रामुख्याने समावेश असल्याचे दिसून आले. महिलांपासून वयोवृध्द नागरिकांपर्यंत, तरूणांपासून दिव्यांग व्यक्तींनी पालकमंत्र्यांची  भेट घेऊन त्यांना आपली निवेदने दिली. निवेदन देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचे उन्हापासून संरक्षण व्हावे यादृष्टीने मंडप, नाश्ता , चहा व कुलर्सची व्यवस्था करण्यात आली होती. नागरिकांनी स्वयंशिस्तीचा प्रत्यय देत टोकन पद्धतीनुसार निवेदने दिली. 

नागरिकांची शासनाकडे प्रलंबित व नियमानुसार करता येणारी कामे दिरंगाई न करता तातडीने पूर्ण करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी शासकीय विभागांना दिले. सर्व निवेदने, समस्या व इतर प्रकरणांविषयी संबंधित विभागाने प्राधान्याने कार्यवाही करावी, असेही श्री. बावनकुळे यांनी यावेळी निर्देश दिले.

 

******


नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कामांना वेळेत पूर्ण करा - पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश

 


'एनएमआरडीए'च्या कामांचा घेतला आढावा

 

नागपूर, दि.7 : ज्यांना निवारा नाही त्यांना साध्या दोन खोलीच्या घराची अपेक्षा असते. गावठान व गावठाणांच्या बाहेर घरकुलांसाठी समान न्यायांची भुमिका शासनाची आहे. घरकुलासाठी शासन आग्रही असून तेवढीच कार्यतत्परता संबंधित यंत्रणांनी दाखवून कोणत्याही प्रकारची अडकाठीची भुमिका यात ठेवता कामा नये, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

 

            नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरनाची बैठक आज प्राधिकरनाच्या सभागृहात श्री . बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार संदीप जोशी, नागपूर महानगर विकास प्राधिकरणाचे आयुक्त संजय मीना, सहायक आयुक्त सचिन ढोले यांच्यासह एनएमआरडीएचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान, घरकूल बांधकाम (प्रधानमंत्री आवास योजना), अमृत योजनेअंतर्गत पाणी व सिवेजलाईन, गुंठेवारी नागपुर महानगर पालिका क्षेत्र प्रकरणे, हुडकेश्वर नरसाळा येथील मुलभूत विकास कामे, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील नाले खोलीकरण या विषयावर आढावा बैठकीत त्यांनी संबंधित विभाग प्रमुखांना कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

 

प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी या योजनेबाबत पात्र लाभार्थ्यांना, ग्रामीण भागातील सरपंचांना परिपूर्ण माहिती दिली पाहिजे. यादृष्टीने नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील सर्व सरपंचाची कार्यशाळा लवकर आयोजित करण्यात यावी. यात या योजनेची माहिती देत जनजागृती करुन नोंदणी करताना येणाऱ्या अडचणीचे निराकरण करण्यात यावे, असे मंत्री श्री. बावनकुळे यावेळी म्हणाले. खरबी व तरोडी येथील पट्टेधारकांना पट्टेवाटप, गुंठेवारीची काम गतीने करणे तसेच पायाभूत सुविधांना गती देण्याचे निर्देश पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिले.

 

नागरिकांपर्यंत पोहोचा, संवाद साधा – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

नगरपंचायत व नगरपरिषद मुख्याधिका-यांनी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. यासाठी कार्यालयीन दिवशी दररोज दुपारी 3 ते 5 या वेळेत आपल्या कार्यक्षेत्रात फिरून सर्वसामान्यांच्या अडीअडचणी समजून घेत त्या मार्गी लावाव्यात  तसेच आठवड्यातून एक दिवस कार्यक्षेत्रातील नागरिकांशी जनसंवाद साधून त्यांच्या अडीअडचणी समजून घेण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे केले.

                                                                                                                                 

जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आज नगरपालिका व नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्या समवेत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी खा. श्यामकुमार बर्वे, आ. कृष्णा खोपडे, आ. परिणय फुके, आ. चरणसिंग ठाकूर, आ. संजय मेश्राम, माजी आ. सुधाकरराव कोहळे, माजी आ. सुधीर पारवे, प्रभारी जिल्हाधिकारी प्रवीण महिरे यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

प्रत्येक नगरपरिषद व नगरपालिका क्षेत्रात शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, स्वच्छता, वीज या बाबींवर प्राधान्याने लक्ष केंद्रीत करून त्या मार्गी लावण्यात याव्यात, अग्निशमन यंत्रणा सुस्थिती आहे का याची तपासणी, सांडपाणी, पूरपरिस्थितीचे नियोजन, प्रधानमंत्री आवास योजना 2.0 (घरकुल) नोंदणीची युद्धस्थळावर अंमलबजावणी, नगरपालिका क्षेत्रात सीसीटीव्ही लावणे आदींची कार्यवाही करण्याचे निर्देश व आठवडाभरात नगरपालिका व नगरपरिषद क्षेत्राचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

 

00000

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 


Ø  तीन दिवसीय विदर्भ पाणी परिषदेस प्रारंभ

Ø  बळीराजा योजना अंतर्गत 20 हजार गावांचे बदलले चित्र

Ø  तापी पुनर्भरण व वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प देईल शेतीला शाश्वत पाणी

 

नागपूर, दि.07 :  महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मोठ्या धरणासमवेत नदीजोड प्रकल्प, जलसंधारण, जलपूनर्भरण, पाण्याचा पूनर्रवापर व इतर लहान मोठ्या प्रकल्पाची जोड देणे आवश्यक आहे. यादृष्टीने आपण पश्चिमी वाहिनीतील नद्यांचे  समुद्रात वाहून जाणाऱ्या पाण्यापैकी 54 टी.एम.सी. पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्याचा निश्चय केला आहे. याचबरोबर नळगंगा-वैनगंगा नदीजोड प्रकल्पाद्वारे विदर्भातील अर्वषणग्रस्त भागात पाणी आणत आहोत. तापी खोऱ्यातील जे पाणी गुजरात मार्गे समुद्रात वाहून जाते त्यातील 35 टी.एम.सी. पाणी तापी खोऱ्यातच राहील, असे नियोजन केले आहे. या प्रकल्पातून भविष्यातील महाराष्ट्र हा दुष्काळाचा आव्हानावर यशस्वी मात करुन उभा राहिलेला महाराष्ट्र म्हणून ओळखला जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि जनकल्याणकारी समिती नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने वनामती सभागृह येथे तीन दिवसीय विदर्भ पाणी परिषदेच्या उद्घाटन समारंभात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी आमदार डॉ. परिणय फुके, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील, लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.अतुल वैद्य, वनामतीच्या संचालक डॉ. वसुमना पंत, विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे संचालक राजेश सोनटक्के, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे उपसंचालक डॉ. चंद्रकांत भोयर, राष्ट्रीय मृदा विज्ञान ब्युरो नागपूरचे संचालक डॉ. नितीन पाटील, प्र-कुलगुरू डॉ. सुभाष कोंडावार, कृषी सहसंचालक डॉ. उमेश घाटगे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे आदि मान्यवर उपस्थित होते. 


बळीराजा योजना अंतर्गत 20 हजार गावांचे बदलले चित्र

विदर्भ आणि मराठवाड्यातील सिंचनाचा अनुशेष हा अनेक वर्षांपासून राहिलेला आहे. पाणी नाही म्हणून सिंचन योजना नाही. सिंचना योजना नाही म्हणून शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी नाही. यादुष्ट चकरामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या म्हणजे विदर्भ असे चित्र तयार झाले होते. ते दूर करण्यासाठी आपण पाण्याचा नियोजनावर अधिक भर दिला. 2014 मध्ये मी मुख्यमंत्री झाल्यावर बळीराजा योजना आणली. यात 90 योजना साकारल्या. जलयुक्त शिवार योजना राबवित जलसंवर्धन कार्यक्रमावर आपण भर दिला. शासनाच्या विविध योजना एकत्रित करीत जिल्हाधिकाऱ्यांना या योजनेचे प्रमुख केले. या योजनेच्या माध्यमातून राज्यात लोकसहभागातून व्यापक चळवळ निर्माण झाली. लोकांनी गावांगावांमधून सुमारे 700 कोटी रुपये एवढा निधी जलसंधारणासाठी लोकसहभागातून उभा केला. या क्रांतीकारी निर्णयातून सुमारे 20 हजार गावांमध्ये पाण्याचे चित्र बदलल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

                                                                                                                                  

जमिनीचे क्षारीकरण रोकण्यासाठी पाण्याचा जपून वापर महत्त्वाचा

राज्यात ज्या ठिकाणी पाणी नाही तेथील वेगळे प्रश्न आहेत. ज्याठिकाणी शाश्वत पाणी आहे त्याठिकाणी वेगळे प्रश्न तयार झाले आहे. पाण्याच्या मोकाट वापरामुळे सुपिक जमिनी या क्षारयुक्त झाल्याने‍ शेतीसाठी कायमच्या अयोग्य होण्याच्या मार्गावर आहे. राज्यात तापी खोऱ्यामध्ये खारपानपट्टयातून वेगळे आव्हान आहे. यावर प्रभावी मात करण्यासाठी मोकाट पाण्याचा वापर बंद करुन ठिबक सिंचनसारखे उच्च कृषी तंत्रज्ञान वापरणे, मोकाट कॅनल ऐवजी पाईपलाईनने शेतात पाणी पोहोचविणे याशिवाय गत्यंतर नसल्याचे त्यांनी सांगितले.

 

तापी पुनर्भरण व वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प देईल शेतीला शाश्वत पाणी

तापी खोऱ्यातील पुनर्भरणासाठी आपण नुकताच मध्यप्रदेश समवेत करार केला. या प्रकल्पातून बुलढाणा, अकोला, वाशिम या भागातील जो खारपाण पट्टा आहे त्यावर आपल्याला मात करता येईल. या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात शेतीला पाणी उपलब्ध होणार आहे. वैनगंगा- नळगंगा नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे 500 किमीची नदीचे जाळे विदर्भात साकारणार आहे. अनेक वर्षापासून अपूर्ण असलेल्या गोसीखूर्द प्रकल्पाचे 90 टक्के काम आपण पूर्ण केले आहे.  पाण्याची उपलब्धता यातून आपण करु शकलो, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

 

पोखरा योजनेतून विदर्भातील गावांमध्ये पाण्याचे ऑडीट

नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प (पोखरा योजना) आपण विदर्भातील गावांमध्ये राबविण्याचा निर्णय घेतला आहे. जल साक्षरतेच्यादृष्टीने, लोकसहभागाला चालना देण्यासाठी, शेतकऱ्यांपर्यंत उच्चकृषी तंत्रज्ञान पोहचविण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण आहे. या योजनेतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा जागर सुरु होईल. निसर्गाच्याकृपेने आपल्याला पाणी उपलब्ध होत असल्याने त्याचे मोल नाही. वातावरण बदलामुळे जलसंवर्धन, जलपुनर्भरण, पाण्याचा पुनर्वापर या त्रिसुत्रीच्या माध्यमातून आपल्याला जलसमस्येवर मात करता येईल. पाणी अमूल्य असल्याने त्याचा योग्य प्रमाणात वापर करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. औद्योगिकीकरणामुळे नद्यांचे होणारे प्रदूषण हे नागरीकरणामुळे होणाऱ्या प्रदूषणापेक्षा कमी आहे. नद्यांचे प्रदूषण जर थांबवायचे असेल तर प्रत्येक शहरामधून नद्यात जाणारे पाणी हे प्रक्रीया करुनच सोडले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

परिषदेतून समस्यासमवेत उपायही सूचवा

तीन दिवस चालणारी ही परिषद अनेक प्रश्नांचा उहापोह करेल. यात अनेक तज्ज्ञ आपले विचार मांडतील. विविध प्रश्नांच्या मांडणी बरोबर ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी या परिषदेतून उपायांचे दस्ताऐवजही मिळतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. लोक सहभागावर आधारीत असलेल्या उपाययोजना पाणी प्रश्नाच्यादृष्टीने अधिक शाश्वत ठरतील, असे सांगून त्यांनी परिषदेला शुभेच्छा दिल्या.

 

पाण्याच्या योग्य वापराबाबत समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी या परिषदेच्या माध्यमातून सहभागी विद्यार्थी, नागरीक जलदूत म्हणून आपली भुमिका बजावतील असे प्रभारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. कार्यक्रमाचे संचलन डॉ. अमृता इंदूरकर यांनी केले तर आभार कुलसचिव डॉ राजू हिवसे यांनी मानले. यावेळी  एसएफएसचे राहुल गौड, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. समय बनसोड, अधिसभा सदस्य तथा परिषदेच्या संयोजक श्रीमती शुभांगी नक्षीणे उंबरकर, डॉ. विजय इलोरकर, डॉ. राज मदनकर, जनकल्याणकारी समितीचे अध्यक्ष सुमंत पुणतांबेकर, दिपक देशपांडे, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. सोपानदेव पिसे यांची उपस्थिती होती.


00000


आदर्श जीवनशैलीतून मधुमेह टाळता येणे शक्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 


 हॅलो डायबिटीज आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन 

 

नागपूर, दि. 7:  पारंपारिक जीवनशैलीतून विकसित झालेल्या आहारविषयक सवयींमध्ये शहरीकरणामुळे अनुचित बदल झाले आहेत. त्याचा दुष्परिणाम म्हणून कमी वयात विविध आजार बळावत आहेत. आदर्श जीवनशैलीचा स्वीकार करून मधुमेहापासून दूर राहता येणे शक्य असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

डायबिटीज केअर अँड रिसर्च सेंटर व डायबिटीज केअर फाउंडेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने 'हॅलो डायबिटीज' या बाराव्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन हॉटेल सेंटर पॉइंट येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले.

परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुनील गुप्ता, डॉ. रती मकर, पद्मश्री डॉ. शशांक जोशी, पद्मश्री डॉ. कमलाकर त्रिपाठी, डॉ. ए.के. दास, डॉ. बन्शी साबू, डॉ. विंकी  रुघवानी, डॉ.कविता गुप्ता, चिकित्सक, तज्ज्ञ व वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासक यावेळी उपस्थित होते.

भारतात मोठ्या प्रमाणात पसरत जाणारा मधुमेह आणि ओबेसिटी ही गंभीर व चिंतेची बाब असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, भारत ही मधुमेहाची राजधानी होऊ नये यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या अशा जनजागृतीपर परिषदांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या आजारांना दूर ठेवण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी फिट इंडिया मुव्हमेंट या सारखे विविध उपक्रम हाती घेतले असून यातून आरोग्य विषयक जनजागृतीला प्राधान्य दिले जात आहे.




मधुमेह या आजारावर अधिक सखोल संशोधन होणे ही काळाची गरज असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, या परिषदेच्या माध्यमातून मधुमेह जडण्याची कारणे, उपाय व आदर्श जीवनशैली या विषयांवर जनजागृती होणे गरजेचे आहे. मनुष्याच्या शारीरिक क्षमता क्षीण करणाऱ्या या आजारावर जनजागृती हाच प्रथम व प्रभावी उपचार आहे. गरोदर स्त्रियांना व त्यातून पुढे नवजात बालकांना होणारा मधुमेह रोखण्याचे आव्हान तज्ज्ञांसमोर आहे. या परिषदेच्या माध्यमातून सकारात्मक निष्कर्ष प्राप्त झाल्यास येणारी पिढी निश्चितच मधुमेहमुक्त राहील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

डायबिटीस हा आजार झालेला असतानाही तो न स्वीकारण्याची मानसिकता असणे ही आपल्या येथील सर्वात मोठी समस्या आहे. यासाठी या आजाराची भीती न बाळगता औषधोपचार करण्यासोबतच जीवनशैलीत सुधार आणण्याबाबत योग्य मार्गदर्शन या परिषदांमधून होणे अपेक्षित असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. या परिषदेतील डायबिटीस आजाराविषयीचे देशभरातील तज्ज्ञ व चिकित्सकांचे विचारमंथन या संदर्भातील उपचारांसाठी दिशादर्शक ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

            मधुमेह रोखण्यासाठी डॉ. सुनील गुप्ता सातत्याने जनजागृती करत असून त्यांनी यासाठी आतापर्यंत असंख्य कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. विविध माध्यमातून ते संशोधन प्रसिद्ध करत आहेत. हे कार्य त्यांनी अविरत सुरु ठेवावे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी त्यांचा गौरव केला.                                    डॉ. सुनील गुप्ता यांनी प्रास्ताविक केले.

या परिषदेत मधुमेहाची कारणे, उपाय व आदर्श जीवनशैली या विषयांवर चर्चा होणार असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित मधुमेह तज्ज्ञ या परिषदेत सहभागी झाले असल्याचे त्यांनी सांगितले. तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेत मधुमेहाशी संबंधित सादरीकरण होणार असून विविध कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे.

0000

महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 



आरबीएलतर्फे विद्यार्थिनींना सायकल व शालेय  साहित्याचे वितरण

 

नागपूर दि. 7 :  महिला सक्षमीकरणात शिक्षण हा अत्यंत मोलाचा घटक असून यासाठी मुलींना प्रोत्साहित करणाऱ्या अनेक योजना राज्य शासनातर्फे राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर आरबीएलच्या उम्मीद उपक्रमाअंतर्गत गरजू विद्यार्थिनींना सायकल व शालेय साहित्याचे वितरण हा उपक्रम प्रशंसनीय असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

आरबीएल बँकेतर्फे उम्मीद या समाजसेवी (सीएसआर) उपक्रमाअंतर्गत आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विद्यार्थिनींना सायकल व शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. तसेच धन्वंतरी आरोग्य शिबिराचे उदघाटनही यावेळी करण्यात आले.

आमदार संदीप जोशी, प्रवीण दटके, आरबीएलचे कोषाध्यक्ष अशोक चांडक व संचालक मंडळाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. मनीष नगर परिसरात आयोजित कार्यक्रमात आज उपस्थितांच्या हस्ते 100 सायकलींचे वाटप करण्यात आले.

मुख्यमंत्री म्हणाले, मुलींच्या शिक्षणातील एक मोठा अडथळा म्हणजे त्यासाठी करावा लागणारा लांब पल्ल्याचा प्रवास हा आहे. आरबीएलतर्फे वितरीत करण्यात येणाऱ्या सायकलींमुळे विद्यार्थिनींना शाळेत जाणे सुलभ होण्यासह उपस्थितीत सातत्य राखण्यासाठी मदत होत आहे. विशेषत: ग्रामीण भागातील विद्यार्थिनींच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी याची अधिक मदत होत आहे.



समाजातील गरजू व वंचित विद्यार्थिनींच्या शैक्षणिक समस्यांची जाणीव ठेवून आरबीएल आपली सामाजिक जबाबदारी पार पाडत आहे. हे अत्यंत स्तुत्य असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, आरबीएलतर्फे दरवर्षी विविध उपक्रम राबविण्यात येतात. धन्वंतरी आरोग्य तपासणी शिबिराच्या माध्यमातून डोळे तपासणी, चष्मे वाटप तसेच इतर तपासण्या नि:शुल्क करण्यात येत आहेत. मुलींचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी याचा निश्चितच उपयोग होईल.

नुकतेच गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील कवंडे या गावी विद्यार्थिनींना सायकलवाटप करण्यात आले. त्यावेळी विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावरील आनंद बघून समाधान लाभल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. अशा सामाजिक उपक्रमांमुळे अत्याधुनिक सुविधा व साधनांपासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थिनींचे उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण  होण्यास मदत होईल. आरबीएलने भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करावे अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

आरबीएलचे कोषाध्यक्ष अंशुल चांडक यांनी प्रास्ताविक करताना, यावर्षी 1800 सायकलींचे वितरण करण्यात येणार असून मागील वर्षी 4800 सायकली विद्यार्थिनींना देण्यात आल्याचे सांगितले. समाजसेवी (सीएसआर) उपक्रमाअंतर्गत चालवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. परिसरातील नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

00000

प्रशासनाने नागरिकांच्या समस्यांचे तत्परतेने निवारण करावे - पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 


            नागपूर, दि.01 : राज्य शासनाकडून समाजातील सर्व घटकांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. प्रशासनाने योग्य आणि प्रभावी अंमलबजावणीतून त्यांचा पात्र नागरिकांना  लाभ देतांना त्यांच्या यासंदर्भातील समस्याही तत्परतेने सोडवाव्यात, असे आदेश महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे आयोजित जनसंवाद कार्यक्रमात अधिकाऱ्यांना दिले.

येथील नियोजन भवनात आयोजित जनसंवाद कार्यक्रमात एकूण 207 नागरिकांनी आपल्या समस्या व निवेदने सादर केली. प्रशासनातील विविध विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते.

नागरिकांच्या स्थानिक स्तरावरील समस्यांचे तात्काळ निराकरण व्हावे व त्यांचे शासकीय कार्यालयांशी संबंधित प्रश्न तातडीने मार्गी लागावे, यासाठी  पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आज जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

विद्यार्थी, दिव्यांग, महिला, वृद्ध  तसेच समाजाच्या सर्व घटकातील नागरिकांनी आज व्यक्तिगत तसेच सार्वजनिक स्वरुपाच्या समस्या सादर केल्या. समस्याग्रस्तांचे म्हणणे ऐकून घेत त्यांच्या तक्रारींवर तात्काळ  कार्यवाही करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी संबंधित विभागप्रमुखांना दिले. विशेषतः आरोग्यविषयक समस्यांवर आज प्राप्त झालेल्या निवेदनांवर तातडीने कार्यवाही करण्याबाबत त्यांनी सांगितले.

नागरिकांची शासन दरबारी प्रलंबित व नियमानुसार करता येणारी कामे दिरंगाई न करता तातडीने पूर्ण करण्याचे आदेश  पालकमंत्र्यांनी शासकीय विभागांना दिले. आजची सर्व निवेदने, समस्या व इतर प्रकरणांविषयी संबंधित विभागाने केलेल्या कार्यवाहीचा आढावा पुढील वेळी घेण्यात येईल, असेही श्री. बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.

योजनांचा लाभ देण्यात येणारे अडथळे, आरोग्यविषयक सुविधा, अतिक्रमण, अंगणवाडी व परिचारिकांच्या समस्या, वीज वितरण, कृषी, क्रीडा व महसूल संबंधित अनेक विषयांवर नागरिकांनी निवेदने देवून श्री. बावनकुळे यांच्याशी संवाद साधला. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार व मंडळ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

00000


'स्वस्ती निवास’ हे कौटुंबिक संवेदना जपणारे केंद्र म्हणून ओळखल्या जाईल

 


नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटला आवश्यक सर्वतोपरी सहकार्य करू

-         केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 

एनसीआयला देशातील प्रीमियर रिसर्च इन्स्टिट्यूट करणार

                                                        - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

स्वस्ती निवास इमारतीचे भूमिपूजन 

नागपूर, दि. 26 :  कर्करोग आजारावरील उपचार पद्धती ही दीर्घकाळ चालणारी आहे. आजारपणात आपलेपणाची कौटुंबिक किनार पाश्चिमात्य देशातील कुटुंबात पाहायला मिळत नाही. आपल्याकडे कुणी आजारी पडल्यास संपूर्ण कुटुंब आपलेपणाने रुग्णालयात त्याची साथ देतो. परिणामी कुटुंबीयांच्या निवासाचा  प्रश्न निर्माण होतो. आजारपणातील भावनिक गुंतागुंत व संवेदना जपण्याचे केंद्र म्हणून स्वस्ती निवास ओळखले जाईल, असा विश्वास केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला. 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जामठा परिसरातील स्वस्ती निवास या इमारतीचे भूमिपूजन तसेच कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात केंद्रीय मंत्री श्री. शाह बोलत होते. 



यावेळी महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार समीर मेघे, संस्थेचे अध्यक्ष ॲड. सुनील मनोहर, उपाध्यक्ष अजय संचेती, मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश जोगळेकर, कोषाध्यक्ष आनंद औरंगाबादकर, वैद्यकीय संचालक डॉ. आनंद पाठक, पर्नो रिका इंडियाचे जॉन तुबुल आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

अनेक संस्थांची कार्यपद्धती मी जवळून पाहिली आहे. अनेक संस्थांमध्ये प्रत्यक्ष काम केले आहे. तथापी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट येथे ज्या संवेदनशीलतेने कॅन्सर रूग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना धीर देत उपचार केले जातात ती भावनिक आपुलकी इतरत्र कमी आढळते.येत्या काळात देशातील सर्वात चांगल्या संस्थेमध्ये नॅशनल कॅन्सर इंस्टिट्यूटची गणना होईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री श्री. शाह यांनी व्यक्त केला. 


ज्या संस्थेमध्ये सेवाभाव असतो तसेच समाजात कुणीही दुःखी राहू नये ही भावना उराशी जपणारे सहकारी असतात त्या संस्था लोकांना अधिक भावतात.  लोकांचे दुःख आणि वेदनांना कमी करण्यासाठी समाजसेवेचा संकल्प प्रत्यक्षात साकारून दाखविणे सोपे नसते. लाखो नागरिकांच्या दुःखात सहाय्यभूत होण्याचा विचार आजच्या काळात खूप महत्वाचा आहे. हा विचार खूप कमी लोकांमध्ये दिसून येतो या शब्दात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कॅन्सर इन्स्टिट्युटचा गौरव केला.                                                                                                                           

आज ही संस्था अल्पावधीतच वटवृक्ष झाली आहे. स्वस्ती निवासच्या माध्यमातून या इन्स्टिट्युटला पूर्णत्व देण्याचे काम आता होत असून यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचा मोलाचा वाटा असल्याचे  गौरोद्गार केंद्रीय गृहमंत्री श्री. शाह यांनी यावेळी काढले. 

         जगातील मोठ्या प्रमाणावर मुखाचा कर्करोग आढळणारा देश म्हणून भारताकडे पाहिले जाते. सर्वाइकल कॅन्सरच्या माध्यमातून देशात प्रत्येक आठ मिनिटाला एकाचा मृत्यू होतो ही वस्तुस्थिती आहे. काही वर्षांपूर्वी कॅन्सर हा दुर्धर आजार समजला जायचा. मात्र, आता देशभरात अनेक चांगल्या कॅन्सर इन्स्टिट्यूट स्थापना झाल्या आहेत. त्यापैकी नागपुरातील कॅन्सर इन्स्टिट्यूट मध्यप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, महाराष्ट्र राज्यातील रुग्णांसाठी वरदान ठरली आहे. या इन्स्टिट्यूटला केंद्राकडून आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल असे ते म्हणाले. 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशातील आरोग्य क्षेत्रातील सेवा सुविधा अधिक भक्कम करण्यात येत आहेत. यात नवीन एम्सची निर्मिती, एमबीबीएस विद्यार्थी क्षमतेत वाढ, नवीन रुग्णालयांची निर्मिती व अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्यात येत असल्याचे केंद्रीय मंत्री श्री. शाह यांनी सांगितले. 

'एनसीआय'ला देशातील प्रीमियर रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणून साकारू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट ही संस्था देशातील प्रीमियर रिसर्च इन्स्टिट्यूट व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे. येत्या काळात हे ध्येय आम्ही नक्की साकारू.  नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट येथे सर्वोत्तम दर्जाच्या सुविधा रुग्ण आणि कुटुंबियांना उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

कर्करोगावरील उपचारासाठी येणाऱ्या रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना निवासाची चांगली सुविधा निर्माण व्हावी यासाठी स्वस्ती निवास ची निर्मिती करण्यात येत आहे. लवकरात लवकर ही व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. इन्स्टिट्युटमार्फत अनेक उपक्रम राबविले आहेत. जागतिक स्तरावर जे सर्वोत्तम तंत्रज्ञान उपलब्ध आहे ते येथे उपलब्ध करून देण्यात आले आहे.  या संस्थेचा आतापर्यंत यशाचा चढता आलेख राहिला असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक इन्स्टिट्युटचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश जोगळेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वस्ती निवासची माहिती देणारी ध्वनिचित्रफित दाखविण्यात आली. 

नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटची पाहणी

केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी भूमिपूजन समारंभापूर्वी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत पाहणी केली. यावेळी त्यांनी इन्स्टिट्युटमधील सेवा व सुविधांबद्दल कौतुक केले. इन्स्टिट्युटचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश जोगळेकर यांनी केंद्रीय मंत्री श्री. शाह यांना विविध सेवा व सुविधांची विषयांची माहिती दिली. 

‘स्वस्ती निवास विषयी...

डॉ. आबाजी थत्ते सेवा आणि संशोधन संस्था व्यवस्थापनाने कॅन्सर रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियासाठी निवासी सुविधा तयार करण्याची योजना आखली आहे. ही सुविधा ' स्वस्ती निवास ' या नावाने ओळखली जाणार असून यातून कॅन्सर रुग्णांना उपचारादरम्यान राहण्याची सोय उपलब्ध होईल. स्वस्ती निवासाच्या माध्यमातून 400 रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी निवासाची व्यवस्था उपलब्ध होईल. यातून रुग्णाच्या उपचारासाठी दीर्घकाळ राहण्याचा आर्थिक भार कमी होऊन कॅन्सर उपचार अधिक परवडणारे होण्यास मदत होणार आहे.

0000