* चेहडी येथे जलपूजनाचा कार्यक्रम
* लोकसहभागाची आवश्यकता
नागपूर दि.16 : जमिनीतून जेवढे पाणी काढता, त्यापेक्षा जास्त जमिनीत जिरवले गेले पाहिजे. यासाठी जलयुक्त शिवार हा उपक्रम शासनाने आणला असून पाण्याचे दुर्भिक्ष्य संपावायचे असेल तर जलयुक्त शिवारशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
मौदा तालुक्यात चेहडी या गावात आज जलपूजनाच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात पालकमंत्री उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते. याप्रसंगी जि.प. अध्यक्षा निशा सावरकर, उपजिल्हाधिकारी मनिषा जायभाये, उपविभागीय अधिकारी श्रीमती पाठारे व अन्य उपस्थित होते.
या कार्यक्रमात पालकमंत्र्यांनी जलपूजन केले. ते पुढे म्हणाले मिळेल तेथे पाणी अडवा. काटोल-नरखेडचे उदाहरण देत त्यांनी सांगितले की, जमिनीतून पाणी काढले पण जमिनीत पाणी मुरवले गेले नाही म्हणून हे दोन तालुके दुष्काळाच्या चक्रात सापडले. जलयुक्त शिवार हा उपक्रम जिल्हयात चांगल्यापैकी यशस्वी झाला आहे. पण या उपक्रमात लोकसहभागाची आवश्यकता आहे. लोकसहभागामुळे लोकांमध्ये पाण्याबद्दल जनजागृती निर्माण होणार आहे. येत्या 3 वर्षात आपण जुन्या बंधाऱ्यांवर 75 कोटी रुपये खर्च करणार आहोत. दरवर्षी 25 कोटी रुपये जुन्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी आपण देणार आहोत, याकडेही पालकमंत्र्यांनी लक्ष वेधले.
मनरेगातून अनेक कामे करणे शक्य आहे. या योजनेतून लोकांनी आपली कामे करावी. शासनाच्या योजनांचा फायदा घ्या. या योजना समजून घ्या, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले. आपल्या आपल्या भाषणात पालकमंत्र्यांनी ऊर्जा विभागात घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. तसेच अवैध दारु गावातून बंद झाली पाहिजे. यासाठी शासनाला गावातील नागरिकांनी मदत करावी, असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी जिल्हा परिषद, पंचायत समितीचे पदाधिकारी व गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
00000000
No comments:
Post a Comment