मुंबई, दि. 28 : सीएसआर, शासनाचा निधी आणि लोकांचा सहभाग यांच्या एकत्रित सहभागातून सुरुकरण्यात आलेल्या ग्रामीण सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीने राज्यात चांगली गती घेतली आहे. कॉर्पोरेटक्षेत्राने या कामी दाखविलेला उत्साह आणि दिलेला सहयोग निश्चितच कौतुकास्पद आहे. महाराष्ट्र ग्रामीणसामाजिक परिवर्तन फाऊंडेशनच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात हाती घेतलेल्या १ हजार गावांचा सर्वांगिणविकास तर केला जाईलच; पण या माध्यमातून इतर गावांनाही प्रेरणा मिळून राज्यात ग्रामविकासाची चळवळअधिक गतिमान होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
सीएसआर निधी, राज्य शासनाचा निधी आणि लोकांचा सहभाग यांच्यामधून राज्यातील एक हजार गावांचा विकास करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. यासाठी स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र ग्रामीण सामाजिक परिवर्तन फाउंडेशनच्या गव्हर्निंग कौन्सिलची तिसरी बैठक आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा, आनंद महिंद्रा, राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील - निलंगेकर, जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, उद्योजक रॉनी स्क्रूवाला, जरीना स्क्रूवाला, अजय पिरामल,अमित चंद्रा, पार्थ जिंदाल, शिखा शर्मा, संजीव मेहता, हेमेंद्र कोठारी, निखील मेस्वानी, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी, आदर्श गाव हिवरे बाजारचे पोपटराव पवार, विविध विभागांचे सचिव यांच्यासह विविध जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आदी उपस्थित होते.
लोकसहभागातून शाश्वत कामे - मुख्यमंत्री
मुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले, महाराष्ट्र ग्रामीण सामाजिक परिवर्तन योजनेसंदर्भात आपण नुकतीच प्रधानमंत्र्यांना माहिती दिली. त्यांनीही या योजनेचे कौतुक केले आहे. एकाच कामासाठी विविध योजना राबविण्याऐवजी अशा विविध योजनांचे एकत्रिकरण करुन गावांमध्ये विकास कामे केली जात आहेत. गावाचा शाश्वत विकास होण्यासाठी लोकांची मानसिकता बदलणे आवश्यक असते. लोकांचा सहभाग घेऊन कामे केल्यास ती निश्चितच शाश्वत होतात, असे त्यांनी सांगितले.
दुर्गम भागात आयटी तंत्रज्ञानाचा वापर करून कनेक्टिविटी वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. दुर्गम,डोंगराळ आणि आदिवासी भागामध्ये टेलिमेडिसीनसारख्या सेवा आयटी तंत्रज्ञानामुळे पोहोचविणे शक्य होत आहे. फाऊंडेशनच्या माध्यमातून यापुढील काळातही ग्रामविकासाच्या चळवळीला गती दिली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील ग्रामविकासाची चळवळ आदर्शवत – रतन टाटा
ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यावेळी म्हणाले की, महाराष्ट्र ग्रामीण सामाजिक परिवर्तन योजनेने चांगली गती घेतली असल्याचे जाणून आनंद झाला. गावांचा विकास हा शाश्वत होईल यावर भर देणे गरजेचे आहे.दारिद्य निर्मूलनावर भर देणे आवश्यक असून त्यादृष्टीने योजना राबविण्यात याव्यात. शिवाय ज्या जिल्ह्यांमध्ये वेगळ्या संकल्पना यशस्वी झाल्या त्या इतर ठिकाणीही राबविण्यात याव्यात. शासन, कॉर्पोरेट आणि लोकांच्या सहभागातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेली ही चळवळ निश्चितच आदर्शवत आहे, असे त्यांनी सांगितले.
कॉर्पोरेट क्षेत्र ग्रामविकासासाठी योगदान देईल - आनंद महिंद्रा
उद्योजक आनंद महिंद्रा म्हणाले, महाराष्ट्र ग्रामीण सामाजिक परिवर्तन योजनेने घेतलेली गती निश्चितच समाधानकारक आहे. महाराष्ट्रात यातून गावांमध्ये ग्रामस्थांचे जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने व्यापक प्रयत्न होत आहे. कॉर्पोरेट क्षेत्र यापुढील काळातही महाराष्ट्रात गावांच्या विकासासाठी योगदान देत राहील, असे त्यांनी सांगितले.
ग्रामविकासाची देशातील युनिक कन्सेप्ट – पंकजा मुंडे
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, सीएसआर, राज्य शासनाचा निधी, लोकांचा सहभाग, स्वयंसेवी संस्थांचा सहभाग अशा एकत्रित प्रयत्नातून गावांचा विकास करण्याची राज्यातीलच नव्हे तर देशातील ही युनिक कन्सेप्ट आहे. या मोहिमेतून हजार गावांचा शाश्वत विकास करण्यावर भर देण्यात येत आहे. ही गावे इतर गावांसाठी आदर्श ठरतील अशा पद्धतीने त्यांचा विकास करून ग्रामविकासाची चळवळ पुढे वाढविण्यात येईल,असे त्यांनी सांगितले.
कौशल्य विकासावर भर देण्यात येईल – मंत्री संभाजी पाटील - निलंगेकर
कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील - निलंगेकर म्हणाले, कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन देण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे. कौशल्य विकास विभाग यादृष्टीने राज्यात कुशल मनुष्यबळ तयार करीत आहे. लोकांना गावातच रोजगार मिळावा, स्थलांतर कमी व्हावे यादृष्टीने ग्रामीण तरुणांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यावर शासनाचा भर आहे. सीएसआरमधूनही यासाठी भरीव मदत मिळत असून शासन आणि कॉर्पोरेट क्षेत्राच्या एकत्रित सहभागातून कौशल्य विकासावर भर देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
आदर्श विकास आराखड्यासाठी गणेशवाडीला ५ लाखाचे बक्षीस
या योजनेतून निवडण्यात आलेल्या गावांचे विकास आराखडे तयार करण्यात आले आहेत. शिवाय या गावांसाठी पूर्णवेळ ग्रामपरिवर्तक नेमण्यात आले आहेत. राज्य शासनाचा निधी आणि सीएसआर निधी या गावांना उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यातून गावांमध्ये विविध योजना राबविण्यात येत आहे. आजच्या बैठकीत काही प्रातिनिधिक जिल्ह्यांमधील गावांनी तयार केलेल्या विकास आराखड्यांचे सादरीकरण करण्यात आले. यापैकी यवतमाळ जिल्ह्यातील गणेशवाडी गावाला आदर्श विकास आराखडा तयार केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ५ लाख रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
००००
No comments:
Post a Comment