· नागपूर शहरासाठी 212 दलघमी पिण्याचे पाणी
· औषणिक विद्युत केंद्रासाठी पुनर्वापराचे पाणी
· अपुऱ्या पावसामुळे पाण्याचे बचतीला प्राधान्य
· बिगर सिंचनासाठी 264.61 दलघमी वार्षिक मागणी
· पेंच जलाशयात केवळ 31 टक्के उपयुक्त जलसाठा
· वॉटर ऑडीट करुन पाण्याचे नियोजन करा
नागपूर, दि.30 : नागपूर शहरासह नगरपालिका तसेच उद्योगासाठी पाण्याचे आरक्षण करताना सिंचन प्रकल्पामध्ये उपलब्ध असलेल्या पाणी साठ्यानुसार नियोजन करताना पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्या, तसेच सिंचन प्रकल्पातील पाण्याचा अपवय टाळून आवश्यकतेनुसार पाणी वापराबाबत जनतेमध्ये जागृती निर्माण करा, असे आवाहन पालकमंत्री चंदशेखर बावनकुळे यांनी आज येथे केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली पाणी आरक्षण समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या बैठकीस महापौर श्रीमती नंदाताई जिचकार, आमदार सर्वश्री सुधाकर देशमुख, डॉ. मिलिंद माने, सुधाकर कोहळे, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, महापालिका आयुक्त अश्विन मुदगल, मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. कांदबरी बलकवडे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस.जी. धवळे, पेंच प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता जे.बी. तुरखेडे उपस्थित होते.
जिल्हयात असलेल्या मोठ्या प्रकल्पामध्ये मागील वर्षीच्या तुलनेत 32.56 टक्के म्हणजेच 410.817 दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध असून पेंच प्रकल्पामध्ये केवळ 31 टक्के पाणी उपलब्ध असल्यामुळे नागपूर शहराला पाणी पुरवठा करताना पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन तसेच पाणी वापराबाबत वॉटर ऑडीट करण्याची सूचना करताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, अपुऱ्या पावसामुळे महानगर पालिका, नगर पालिका, तसेच इतर उद्योग आणि आस्थपनांनी पाण्याच्या बचतीकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
पेंच प्रकल्पामध्ये असलेल्या जलसाठयामधून पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यात आल्यामुळे पेंच प्रकल्पाच्या क्षेत्रात रब्बी पिकांना पाणी उपलब्ध करुन देणे शक्य नसल्याची पूर्व कल्पना संबंधीत पाणी वापर संस्था, तसेच शेतकऱ्यापर्यंतही पोहचविणे आवश्यक असल्याचे सांगतांना पालकमंत्री पुढे म्हणाले की, महसूल उपविभागीय अधिकाऱ्यांनी तालुकास्तरावर या संदर्भात संबंधितांना सोबत बैठक घेवून शेतकऱ्यांना माहिती द्यावी, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
नागपूर शहराच्या पिण्याच्या पाण्याचे आरक्षण पूर्ववत सुरु ठेवण्यासोबतच शहराच्या पाच किलोमीटर परिसरातील जनतेलाही पाणी उपलब्ध होईल यादृष्टीने नियोजन करताना पिण्याच्या पाण्याचे वितरण व वाटप यातील पाण्याचा होत असलेला अपव्यय टाळावा, तसेच पाणी बचतीबाबत जनतेमध्ये जागृती निर्माण करावी, तसेच पाणी वापर धोरण निश्चित करुन त्यानुसार पाण्याचे वितरण करावे, पाणी वाया जाणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
भांडेवाडी येथील प्रकल्पामधून पाण्याच्या पुनर्वापाराबाबत सुरु असलेल्या प्रकल्पाचे क्षमता वाढविताना नाग नदीतून सांडपाणी वाहून जाणार नाही त्यावर प्रक्रिया करुन हे पाणी औषणिक प्रकल्पासह शेतीलासुध्दा उपलब्ध करुन देण्याबाबतचा प्रकल्प सुरु करावा. जिल्हा परिषदेने ग्रामीण पाणी पुरवठा योजनेअंतर्गत आवश्यकतेनुसारच पाण्याचा वापर करावा, तसेच पाण्याच्या अपव्यय करणाऱ्या संस्थाविरुध्द कार्यवाही करावी, अशी सूचना केली. पिण्याच्या पाण्याचे शुल्क नियमितपणे भरण्यात यावे या संदभार्त पाटबंधारे व संबंधित विभागांनी नियमितपणे पाणी पट्टीची वसूली होईल याकडे विशेष लक्ष द्यावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी जिल्हयातील सिंचन प्रकल्पामध्ये उपलब्ध असलेले पाणी तसेच महानगर पालिकेसह इतर संस्थासाठी असलेल्या पाण्याच्या आरक्षणाबाबत यावेळी माहिती दिली.
नवेगाव खैरी, तोतलाडोह व खिंडसी आदी प्रकल्पामधून पिण्याच्या पाण्यासाठी वार्षिक मागणीनुसार नागपूर महानगर पालिकेला 190 दलघमी, औषणिक विद्युत केंद्र कोराडी व खापरखेडासाठी 67 दलघमी, कळमेश्वर नगरपालिकेला 0.986 दलघमी, पारशिवनी 0.825 दलघमी, तसेच रामटेक, नगरधन, खिंडसी तसेच उद्योगांनी एकूण 264.61 दलघमी वार्षिक मागणी आहे त्यापैकी ऑक्टोबर ते जुलैपर्यंत 196.47 उपलब्ध साठ्याच्या प्रमाणानुसार पाणीची मागणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी एक पाळी उपलब्ध करुन देण्यात आले असल्याचे कार्यकारी अभियंता जे.बी. तुरखेडे, तसेच इतर प्रकल्पामध्ये उपलब्ध असलेल्या पाण्याच्या आरक्षणाबाबत एस.जी. धवळे यांनी बैठकीत सांगितले.
आमदार सर्वश्री सुधाकर देशमुख, डॉ. मिलिंद माने व सुधाकर कोहळे यांनी नागपूर शहराची वाढती लोकसंख्या तसेच पर्यटन व रुग्णालय, रेल्वे स्टेशन आदींना पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी आवश्यकतेनुसार पाण्याचे आरक्षण करावे, तसेच उन्हाळयात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही या संदर्भात आरक्षण करताना विशेष लक्ष देण्याची आवश्यकता यावेळी त्यांनी व्यक्त केली. महापालिका आयुक्त अश्विन मुदगल यांनी नागपूर शहरासाठी आवश्यकतेनुसार पिण्याचे पाण्याचे उपलब्धतेसोबत पाण्याचे बचतीबाबत विशेष अभियानराबविण्यात येत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
प्रारंभी कार्यकारी अभियंता एस.जी. धवळे यांनी नागपूर जिल्हयातील लाभक्षेत्र पाधिकरणाअंतर्गत उपलब्ध असलेले सिंचन प्रकल्पातील पाणी, त्यावर असलेले आरक्षण आणि प्रत्यक्ष पाण्याची उपलब्धता याबाबत बैठकीत माहिती दिली.
000000000
No comments:
Post a Comment