मुंबई, दि. 5 : ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल तर राज्यातील सहकारी संघांना अडचणीतून बाहेर काढून अधिक सक्षम करणे गरजेचे आहे. सहकारी संस्थांच्या बळकटीकरणासाठी सहकारी संस्थांमध्ये ज्या सुधारणा करणे आवश्यक आहेत. त्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. सहकारी संघाला यापूर्वी शिक्षण आणि प्रशिक्षणासाठी जो निधी मिळत होता तो पुन्हा सुरु करण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.
मारिन लाइन्स येथील बिर्ला मातोश्री सभागृहात राज्य सहकारी संघाच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त राज्य सहकारी संघ आणि मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने हा शतक महोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता.या सोहळ्याचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
मुख्यमंत्री म्हणाले, सहकार संघाला शिक्षण आणि प्रशिक्षणासाठी देण्यात येणारा निधी पुन्हा सुरु करण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्यात येईल .सहकार सक्षमीकरणासाठी ज्या काही सुधारणा करणे आवश्यक आहे त्यासाठी शासन सकारात्मक असून शासनाचा संस्कारीत सहकार निर्मितीवर अधिक भर आहे. शासन सहकार क्षेत्र अधिक भक्कम कसे होईल यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे.असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले, राज्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामीण भागातील विविध कार्यकारी संस्था सक्षम झाल्या पाहिजेत त्यादृष्टीने शासन निर्णायक वाटचाल करत आहे.एखाद्या संस्थेचा 100 वर्षाचा प्रवास पूर्ण होतो तेव्हा तो काळ फार महत्वाचा आणि संस्थेच्या कार्याला तपासण्या बरोबरच पुढच्या 50 वर्षाचे नियोजन करण्याचा असतो.त्यामळे हे शतक महोत्सवी वर्ष अत्यंत महत्वाचा आहे.या सहकारी संघाच्या 100 वर्षाच्या वाटचालीत अनेकांचे योगदान आहे असे सांगून मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी सहकारी संघाचे अभिनंदन केले आणि पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
सहकार्यातून सहकार क्षेत्र सक्षम करणे गरजेचे – सुभाष देशमुख
सहकारी संघांनी अनुदानातून नाही तर योगदानातून सक्षम व्हावे.सहकारी संघाची मोठी साखळी आहे त्या साखळीचा वापर करून सहकार शुद्धीकरणा बरोबरच पारदर्शक कार्यावर अधिक भर द्यावा , सर्वांच्या सहकार्यातून सहकार क्षेत्र सक्षम करावे.राज्यातील सहकारी संस्थांचे बळकटीकरण करण्यासाठी राज्यात अटल पणन अभियान यशस्वीरीत्या राबविण्यात येत असून त्या माध्यमातून बचत गटांना प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी करत आहे. त्याच बरोबर बंद पडलेले साखर कारखाने, सूत गिरण्या सुरु करण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी स्थानिक रोजगार निर्मिती वर अधिक भर दिला पाहिजे.ज्या संस्था सक्षम आहेत त्या संस्थांनी छोट्या संस्थांचे पालकत्व घेऊन त्यांना सहकार्य करावे, असे आवाहन श्री देशमुख यांनी केले.
राज्यमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, राज्यात सहकार चळवळीचे मोठे योगदान असून अडचणीत आलेल्या सहकारी संस्थांना समृद्ध करण्यासाठी शासन विविध योजना राबवत आहे.
यावेळी सहकार मंत्री सुभाष देशमुख, सहकार राज्य मंत्री गुलाबराव पाटील,सहकारी संघाचे अध्यक्ष सुहास तिडके,मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment