नागपूर दि. 27 :- तोतलाडोह, खिंडसी तलावात मासेमारी करु देण्यासह आदिवासी बांधवांच्या प्रलंबित असलेल्या समस्या त्वरीत निकाली काढण्याचे आदेश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाला दिल्या. पालकमंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आज वन विभागाच्या सभागृहात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, जिल्हा पोलिस अधीक्षक (ग्रामीण) शैलेश बलकवडे, आदिवासी संघटनेचे अध्यक्ष वासुदेव टेकाम आदी उपस्थित होते.
आदिवासी समाजातील जनतेच्या काही समस्या तसेच प्रश्न आहेत. वन हक्क कायद्यानुसार आदिवासी बांधवांना जंगलातील तेंदूपत्ता, डिंक, मोहफुल तोडून स्वत:चा उदरनिर्वाह करता यावा, याकरिता वन विभागाला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सूचना केल्या. देवलापार तालुका करण्याची अनेक दिवसांची मागणी शासनाकडे आहे. या संदर्भात मुख्य सचिवांकडे बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
तोतडा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या 300 पुनर्वसित कुटुंबाना नागरी सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या सूचना केल्या. तसेच वन संरक्षणातील बंदी महादेव उईकेच्या मृत्यूची चौकशी करुन अहवाल येत्या 15 दिवसात सादर करण्याचे आदेश त्यांनी पोलिस अधीक्षक बलकवडे यांना यावेळी दिले.
पारशिवनी तालुक्यात ढवळापूर येथे महावितरणचे एक वीज उपकेंद्र मंजूर झाले आहे. खाजगी जमीन यासाठी घेण्यात आली असून त्वरित कामे सुरु करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
गेल्या 75 वर्षांपासून मासेमारी करत असलेल्या 17 स्थानिक संस्थांना मासेमारी करण्याकरिता राखीव करण्यात यावे, तोतलाडोह येथील अवैध सुरु असलेली मासेमारी थांबवून नवेगाव खैरी येथे लोणार पेंचकरिता व्यवस्था करावी तसेच रामटेक तालुक्यातील खिंडसी येथील 17 स्थानिक मासेमारी संस्थांना रोजगार उपलब्ध करुन देण्याकरिता पाठपुरावा करण्याचे आदेश मत्स्यव्यवसाय विभागाला पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
त्याचप्रमाणे राज्य कामगार विमा योजना रुग्णालयातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडील प्रलंबित कामे त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिले.
यावेळी वन, विद्युत आणि सार्वजनिक बांधकाम तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
******
No comments:
Post a Comment