*शासकीय ग्रंथालयात ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा
नागपूर, दि. 27 : भारतासारख्या बहुभाषिक देशात एकापेक्षा अधिक भाषा सहज बोलल्या जातात. यामुळे आपल्या भाषेविषयी कुठलाही न्यूनगंड न बाळगता दैनंदिन जीवनात मराठी भाषेचा जास्तीत - जास्त वापर करावा, असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक राधाकृष्ण मुळी यांनी केले.
विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातील शासकीय ग्रंथालयात आज मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, जिल्हा माहिती अधिकारी केशव करंदीकर, ग्रंथपाल श्रीमती वि. मु. डांगे, निवृत्त ग्रंथपाल प्रभाकर साठे तसेच शासकीय ग्रंथालयातील अधिकारी,कर्मचारी वाचक उपस्थित होते.
व्यावहारिक यशाशी इंग्रजीचे नाते जोडले गेले आहे, त्याचा परिणाम जाणवत असला तरी आपण आपल्याच भाषेला कमी लेखून न्यूनगंड बाळगण्याचे कारण नाही, असे सांगून श्री. मुळी म्हणाले की माणूस मात्रृभाषा सहज आत्मसात करतो आणि त्याच्या विचाराची तीच भाषा असते हे लक्षात घेता शालेय शिक्षण मराठी माध्यमातून घेतले जाणे गरजेचे आहे. वाचनाने भाषा आणि अभिव्यक्ती सोपी होते, हे लक्षात घ्यावे.
जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर म्हणाले, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे, यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मराठी भाषाप्रेमी गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न करीत आहे.
जिल्हा माहिती अधिकारी केशव करंदीकर म्हणाले, भाषा हे अभिव्यक्ती साठी प्रभावी माध्यम आहे. कुठलीही भाषा ही श्रेष्ठ -कनिष्ठ नसते. प्रत्येक प्रदेशात भाषेमध्ये बदल दिसून येतो. मातृभाषेला समृद्ध करण्यासाठी सर्वसामान्यांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
प्रास्ताविक करताना ग्रंथपाल श्रीमती वि. मु. डांगे म्हणाल्या प्रत्येक बारा कोसावर मराठी भाषेमध्ये बदल झालेला दिसतो. आपल्या मातृभाषेचा सन्मान होणे आवश्यक आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सतत कार्यरत राहिले पाहिजे. यासाठी सर्वानी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी केंद्र सरकारचा जीवनरक्षा पुरस्कार प्राप्त निवृत्त ग्रंथपाल प्रभाकर साठे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी मनोगत व्यक्त केले. आभार गजानन कुरवाडे यांनी मानले.
*****
No comments:
Post a Comment