मुंबई दि. १६ : कोणतेही काम आपला पहिला क्रमांक येईल या निश्चयाने करायचे आणि त्या दिशेने पुढे जायचे म्हणजे यश आपणहून मिळतेच असे सांगतांना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सीएम फलोशिप कार्यक्रमांतर्गत काम करत असलेल्या उमेदवारांशी दिलखुलास संवाद साधला तसेच इतरांना पथदर्शी ठरावं इतकं चांगलं काम करून दाखवा, असे आवाहन देखील केले.
ज्या उद्दिष्टाप्रती आपण इथवर आलो ती उद्दिष्ट्ये साध्य झाली की नाही हे पाहणे, कामाचे आऊटकम तपासणे खूप महत्वाचे असल्याचे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले, केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांमधून मोठ्याप्रमाणात निधी उपलब्ध होतो. तो योजनांवर खर्च ही होतो. पण त्याच्या साध्याकडे आपण लक्ष देत नाही. त्याच्या परिणामकारकतेकडे, पर्यायी विकास संसाधनाकडे लक्ष देत नाही. सिंचनासाठी मोठ्याप्रमाणात निधी दिला. सिंचन क्षेत्र वाढले पण आपण पिक पद्धतीत गरजेनुसार बदल केले का, रासायनिक खतांचा वापर करून विषयुक्त शेती करण्यापेक्षा आपण सेंद्रीय शेतीकडे वळालो का, मातीचा पोत आपण सुधारू शकलो का, सुक्ष्म किंवा ठिबक सिंचनाखालचं क्षेत्र आपण वाढवू शकलो का, यासारख्या पर्यायी क्षेत्राचाही संशोधनात्मक अभ्यास आणि विश्लेषण झाले पाहिजे.
कोणतंही काम करतांना ते मन लावून, आपलं स्वत:चं काम आहे असं मानून केले तर योजना आणि काम यशस्वी होण्याचे प्रमाण वाढते असे सांगून ते म्हणाले की, केंद्र आणि राज्य शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना आहेत. या योजनांची माहिती संबंधितांपर्यंत पोहोचवणारी यंत्रणा प्रभावी असण्याची गरज आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने सुरु केलेली “माहिती दूत” ही संकल्पना त्यादृष्टीने खूप महत्वाची असल्याचेही ते म्हणाले.
मुद्रा बँक योजनेतून राज्यातील युवक-युवतींना अधिक लाभ मिळावा यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केल्याचे तसेच जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती आणि तेथील गरजा विचारात घेऊन यासंबंधीचा आराखडा निश्चित केला जात असल्याची माहिती त्यांनी दिली. इको टुरिझममध्ये विपूलप्रमाणात रोजगार संधी दडल्या असल्याचे सांगून ते म्हणाले की, शासनाने इको टुरिझम बोर्डाची स्थापना केली आहे. काही स्थळ यामधून विकसित होत आहेत. व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात पर्यटनाला मर्यादा आहेत. परंतू बफरझोनमध्ये इको टुरिझमला प्रोत्साहन देण्याचे शासनाने ठरवले आहे.
शासनाने डायरेक्ट बँक ट्रान्सफर चा निर्णय घेतल्यापासून देशपातळीवर जवळपास 46 हजार कोटी रुपये वाचले असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांकडे खूप निधी आहे. त्यांच्या कितीतरी योजनांच्या अंमलबजावणीतून आपण राज्यासाठी निधी आणू शकू, त्यासाठी नियोजनबद्ध मार्ग विकसित होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रातील माणसं केंद्र सरकारच्या विविध नोंकऱ्यांमध्ये देशभर गेली तर त्याचा महाराष्ट्रालाच अधिक लाभ होणार आहे म्हणून नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात आपण भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्राचे बळकटीकरण करण्याचा तसेच प्रत्येक जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमांतर्गत समाविष्ट उमेदवारांबरोबर काल अर्थमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी मनमोकळा संवाद साधला. त्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी तितक्याच स्पष्टपणे आणि दिलखुलासपणे उत्तरे दिली. या संवाद कार्यक्रमास नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, मुख्यमंत्री कार्यालयातील विशेष कार्य अधिकारी प्रिया खान आणि निधी कामदार यांच्यासह मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमांतर्गत समाविष्ट उमेदवार उपस्थित होते.
नुकताच सादर झालेला अर्थसंकल्प साईन लॅग्वेजमध्ये भाषांतरीत करून सांगण्याचं काम हेलन केलर इन्स्टिट्युट ऑफ ब्लाईंड ॲण्ड डेफ ब्लाईंड या संस्थेने केले. राज्यात पहिल्यांदाच हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला गेला. यानिमित्ताने संस्थेच्या संचालक अनुराधा बागची आणि त्यांच्या सहकारी दीप्ती राणे, सोनाली बारसिंग यांचा अर्थमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच त्यांनी साईन लँग्वेजमध्ये सादर केलेल्या अर्थसंकल्पीय भाषणाच्या सीडीचे श्री.मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
0 0 0
No comments:
Post a Comment