Wednesday, 25 April 2018

जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजना यशस्वी करून जलसंधारण करणार - अश्विन मुदगल


* माध्यम संवाद कार्यक्रमात पर्यावरण प्रेमी रायझींग स्टार सुरभी जयस्वालचा सत्कार

नागपूर, दि. 25 : जिल्ह्याचा विस्तार मोठा असला तरी राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जिल्ह्यातील जलसाठ्यांचे संवर्धन करून ही योजना यशस्वीरित्या राबविण्यात राज्यात नागपूर जिल्हा प्रथम क्रमांकावर असेल, असा विश्वास नवनियुक्त जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी व्यक्त केला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभाकक्षात जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने माध्यम संवादकार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी, परिविक्षाधिन अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर उपस्थित होते.
जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत वर्ष 2017-18 करिता 220 गावांची निवड करण्यात आली असून यामध्ये 3 हजार 300 कामांचा समावेश करण्यात आला आहे. त्याकरिता 95 कोटी रुपयाचा अर्थसंकल्प तयार करण्यात आला. शासनाच्या वतीने आतापर्यत 85 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. ज2018 पर्यत चालणाऱ्या जलयुक्त शिवार योजनेंतर्गत कृषी व संलग्नित विभागाची शिल्लक 410 कामे 30 जूनपर्यत पूर्ण करणार असल्याचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल म्हणाले.
ग्रामीण भागात केवळ मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देणे हाच उद्देश नाही तर या सुविधा जास्तीत-जास्त वर्षे ग्रामस्थांना उपलब्ध व्हाव्यात, हा यामागचा उद्देश आहे. त्यामुळेच जलसंधारणाच्या योजनेत जनसहभाग ही संकल्पना मांडणाऱ्या पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कपस्पर्धेत उतरलेल्या 17 ते 18 गावांना यश संपादन करून फाऊंडेशनचा पहिला पुरस्कार जिल्ह्याला कसा मिळेल, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.
पेंच प्रकल्पातर्गंत जिल्ह्यातील 70 हजार ते 1 लाखापर्यंत शेतकरी काम करीत आहेत. पेंच प्रकल्पालगतच्या भागात मध्य प्रदेश शासनाच्या वतीने बांधण्यात आलेल्या धरणामुळे या भागात पाण्याची समस्या उद् भवण्याची शक्यता पाहता मागेल त्याला शेततळे, धडक विहिरी, जलयुक्त शिवार योजनाच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करण्याची साधने उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

जिल्ह्यात दि. 15 जून ते 15 जुलै या कालावधीत खरीप हंगामाची पेरणी सुरु होते. या काळात शेतकऱ्यांना बियाणे, खत, कीटकनाशके उपलब्ध व्हावीत, यासाठी कृषी केंद्रावर मुबलक प्रमाणात बियाणे, खत, कीटकनाशकांचा साठा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शिवाय बोगस बियाणे, खते, कीटकनाशके बाजारात विकली जाऊ नये यासाठी विशेष पथके तयार करून कृषी केंद्राची तपासणी मोहम देखील सुरु करण्यात आली आहे.
खरीप हंगामात शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध व्हावे, याकरिता जिल्हा बँकेच्या मदतीने 1018 कोटीचा कृती आराखडा तयार करून शासनास पाठविण्यात आला आहे. त्याद्वारे शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून शेतीसाठी कर्ज मिळविता येणार आहे.

1 हजार गावांच्या जमिनीचे होणार परक्षण
जिल्ह्यात वर्ष 2017-18 पासून शेतकऱ्यांच्या जमिनीचे परक्षण कार्यक्रम राबविण्यास सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमांतर्गत पहिल्या वर्षी 899 गावातील शेतकऱ्यांच्या जमिनीचे परीक्षण करण्यात आले. वर्ष 2018-19 मध्ये जमीन परीक्षण कार्यक्रमामध्ये 1 हजार गावांचा समावेश करण्यात येणार आहे. ज्याद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा कस, प्रत आणि पिकांसंबंधीची माहिती देऊन कमी खर्चात चांगले पीक कसे घेता येईल याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

बोंड अळी प्रादुर्भावावर कडूनिंब एक उत्तम उपाय
कपाशीवर झालेल्या बोंड अळीच्या प्रादुर्भावावर बोलतांना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल म्हणाले की, नुकतीच या संदर्भात केंद्रीय कृषीमंत्री तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत गुजरातमध्ये बोंड अळीचा प्रादुर्भाव नष्ट करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली. त्यामध्ये कडूनिंबाचे तेल किंवा कडूनिंबाची पाने ही या अळ्यांचा प्रादूर्भाव नष्ट करू शकतो. त्यामुळे डिसेंबरव्यतिरिक्त पिकविल्या जाणाऱ्या कापसाच्या पिकाकडे लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी केले.
जिल्हा प्रशासनाने बोंड अळीचा प्रादूर्भाव तसेच बाजारात विकल्या जाणाऱ्या बोगस बियाणांसंदर्भात कारवाई करीत 248 कंपन्यांना काळ्या यादीत टाकले आहे. लवकरच या कंपन्यांची नावे जाहीर करून त्याबददल जनजागृती करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.

सुरभी जयस्वालचा सत्कार
ग्रीन विजन फाऊंडेशनच्या टीम प्रमुख सुरभी जयस्वाल यांनी पर्यावरण संवर्धानाची अनेक कामे केली आहेत. विशेष करून गणेशोत्सवाच्या काळात तलावांचे संवर्धन उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अर्थ डे नेटवर्कच्या वतीने रायझिंग स्टारचा मान देऊन सुरभी जयस्वाल हिला गौरविण्यात आले. तिच्या या कार्याचा उल्लेख करीत जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आयोजित माध्यम संवादकार्यक्रमात जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या वतीने सुरभी जयस्वाल तसेच कौस्तूभ चॅटर्जीचा गौरव करण्यात आला.
*****



No comments:

Post a Comment