नागपूर, दि. 4 : शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्यासाठी केंद्र शासनाने आज विविध शेतमालांच्या किमान आधारभूत किंमतीत (MSP) वाढ जाहीर केली आहे. केंद्र शासनाचा आजचा हा निर्णय ऐतिहासिक आणि क्रांतिकारी आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या निर्णयाबद्दल त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्र शासनाचे आभार मानले आहेत.
विधान भवन येथे प्रसिद्धी माध्यमांना प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री म्हणाले, शेतकऱ्यांची ही बऱ्याच वर्षांपासूनची मागणी होती. केंद्र शासनाने अर्थसंकल्पात तशी घोषणाही केली होती. त्या आश्वासनाची आज पूर्तता झाली आहे. या निर्णयामुळे केंद्र सरकारवर मोठा आर्थिक बोजा पडणार आहे. पण तरीही केंद्र शासनाने शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता तशी तयारी दर्शविली आहे. केंद्र शासन शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेत आहे. सिंचन, सूक्ष्म सिंचन, फूड पार्कची योजना, युरियासंदर्भातील निर्णय, किसान संपदा योजना अशा अनेक निर्णयांचा शेतकऱ्यांना लाभ होत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून त्यादृष्टीने अनेक निर्णय घेण्यात येत आहेत. स्वातंत्र्योत्तर काळातील शेतकरी हिताचे सर्वाधिक निर्णय घेणारे हे शासन आहे, असे ते म्हणाले.
शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याच्या दृष्टीने आज विविध शेतमालांसाठी जाहीर झालेल्या किमान आधारभूत किंमतीच्या (MSP) निर्णयाबद्दल महाराष्ट्रातील जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या वतीने केंद्र शासनाचे आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे त्यांनी आभार मानले.
००००
No comments:
Post a Comment