मुंबई, दि. 29 : दापोली तालुक्यातील मोजे रेवली येथील धरणाच्या बांधकामास येत्या
ऑक्टोबर महिन्यापासून सुरुवात होणार आहे. प्रकल्पग्रस्तांना भूसंपादनाची रक्कम
मिळाल्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत
सांगितले.
श्री.कदम म्हणाले, रेवली धरणाच्या बांधकामास महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाने मान्यता दिली.
हा प्रकल्प जवळपास 45 कोटी रुपयांचा आहे. या योजनेचे सिंचन क्षेत्र 160 हेक्टर
एवढे असून या प्रकल्पामुळे परिसरातील उन्हाळ्यात जाणवणारी पाणी टंचाई दूर होणार
आहे. हे धरण 2020 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या धरणाचे जलरोधी
खंदकाचे खोदकाम पूर्ण केलेले असून, भराईचे काम
अंशत: शिल्लक आहे. या भागातील प्रकल्पग्रस्तांना भूसंपादनाची रक्कम प्राप्त न
झाल्यामुळे त्यांनी योजनेचे काम रोखून धरले होते. अलीकडेच प्रकल्पग्रस्तांना 1.64
कोटी रुपयाचे वाटप केल्याने त्यांचा विरोध मावळला आहे. या धरणाच्या कामासाठी आणखी
23.72 हेक्टर जमीन संपादनाची आवश्यकता असल्याने तसा प्रस्ताव जिल्हाधिकारी
रत्नागिरी यांना पाठविलेला आहे. या प्रकल्पावर जुलै अखेर 793.29 लाख रुपये खर्च
झालेले आहे.
या बैठकीला जलसंधारण
विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. प्रकाश देशमुख, मौजे
रेवली आणि दापोलीचे ग्रामपंचायत, पंचायत समिती सदस्य उपस्थित
होते.
००००
No comments:
Post a Comment