मुंबई दि. 29 : संत
साहित्यासाठी तसेच मानवतावादी कार्यासाठी राज्य शासनाच्या वतीने दिला जाणारा आणि सन
२०१७-१८ साठीचा जाहीर झालेला ज्ञानोबा
तुकाराम पुरस्कार शुक्रवार 31 ऑगस्ट रोजी डॉ.किसन महाराज साखरे यांना प्रदान
करण्यात येणार आहे.
पुणे येथील अण्णा भाऊ
साठे नाट्यगृहात सायंकाळी 6.30 वा हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.
संत साहित्यावर लेखन किंवा संतांना
अभिप्रेत मानवतावादी कार्य करणा-या महनीय व्यक्तीला राज्य शासनाच्या वतीने
प्रतिवर्षी ज्ञानोबा तुकाराम पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. रुपये ५ लक्ष रोख, मानपत्र तसेच मानचिन्ह असे पुरस्कारांचे
स्वरुप असून आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे
यांनी या पुरस्काराची घोषणा केली होती.
हा पुरस्कार यापूर्वी
रा. चिं. ढेरे, डॉ.दादा महाराज मनमाडकर, जगन्नाथ महाराज नाशिककर, रामकृष्ण महाराज लहवितकर, डॉ.
यु. म. पठाण, प्रा. रामदास डांगे, फादर
फ्रान्सीस दिब्रेटो, मारोती महाराज कुऱ्हेकर, डॉ. उषा देशमुख आणि ह.भ.प निवृत्ती महाराज वक्ते यांना प्रदान करण्यात आला
आहे. गतवर्षीचे या पुरस्काराचे मानकरी ह.भ.प.निवृत्ती महाराज वक्ते यांच्या हस्ते
हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. सदरील पुरस्कार समारंभास प्रमुख पाहूणे म्हणून
सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. तावडे, अन्न व नागरी पुरवठा
मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट, सामाजिक न्याय व
विशेष सहाय्य राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा व जलसंधारण
राज्यमंत्री विजय शिवतारे, पुण्याच्या महापौर श्रीमती मुक्ता
टिळक, खासदार, अनिल शिरोळे, आमदार श्रीमती माधुरी मिसाळ व संत साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर या
समारंभास उपस्थित राहणार आहेत.
डॉ. किसन महाराज साखरे
हे संत वाड्.मयावर अध्यापन करत असून गेली ५७
वर्षापासून अनेक मासिकांमधून तसेच वृत्तपत्रांमधून उपनिषदांपासून ते संत
वाड्.मयावर लेखन करीत आहेत. संत ज्ञानदेव अध्यासन समितीचे अध्यक्ष व त्या
समितीव्दारे त्यांनी पुणे विद्यापीठामध्ये श्री ज्ञानदेव अध्यासनाची निर्मिती
केलेली आहे. आकाशवाणीवर त्यांनी किर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचेदेखील कार्य
केलेले आहे. ज्ञानेश्वरीच्या वेदनिष्ठा, सो्हम योग,
योगत्रयी प्रवचनमालांवर त्यांनी १०० हून अधिक ग्रंथांचे संपादन केलेले आहे. महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती
मंडळावर त्यांनी सदस्य म्हणून काम पाहिले आहे.
प्रतिवर्षी १ मे ते ३१ मे या कालावधीत विद्यालयीन व
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नि:शुल्क संस्कार शिबीराचे आयोजन करत असतात. अनेक
संस्थांवर त्यांनी विश्वस्त म्हणून काम पाहिले आहे. ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी ही
त्यांनी मराठी, हिंदी व इंग्रजी माध्यमातून दृकश्राव्य
रुपात ती इंटरनेट (Internet) वर उपलब्ध करुन देण्याचा पहिला
प्रकल्प त्यांनी पूर्ण केलेला आहे. १९९० साली त्यांनी संपूर्ण ज्ञानेश्वरी पावणेतीन क्विंटल ताम्रपटावर कोरुन एक
चिरंजीव प्रकल्प पूर्ण केलेला आहे. संत साहित्यातील योगदानाबद्दल त्यांना टिळक
विद्यापीठाकडून डी. लीट पदवी प्रदान करण्यात आली आहे तर डी. लीटसाठी होणाऱ्या
परिक्षांसाठी त्यांनी परिक्षक म्हणूनही काम पाहिले आहे. विविध सामाजिक, सांस्कृतिक तसेच वारकरी सांप्रदायिक संस्थांनी त्यांच्या कार्याची नोंद
घेत त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे.
पुरस्कार प्रदान
समारंभाची सुरुवात पंडिता मंजूषा पाटील यांच्या अभंगरंग या सांस्कृतिक
कार्यक्रमाने होईल. पंडिता मंजूषा पाटील यांना मोहन पारसनीस, नंदू भांडवलकर, राहित मराठे, अमृत
भांडवलकर साथसंगत करणार आहेत. या पुरस्कार वितरण समारंभास प्रेक्षकांनी मोठया
संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक संजीव
पलांडे यांनी केले आहे.
००००
No comments:
Post a Comment