Wednesday, 5 September 2018

नगरपंचायतींमधील मुलभूत सुविधांसाठी योजनांचा आराखडा तयार करावा - रणजीत पाटील


मुंबई, दि. 5 : वणी, बाभूळगाव, शेगाव, अकोट व देऊळगाव या नगरपरिषदांमधील मुलभूत सुविधांचा आढावा घेऊन प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश नगर विकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आज येथे दिले. तसेच विकास कामांचे आराखडे तयार करण्यात यावा. या कामांसाठी व पायाभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
विविध नगरपरिषदांमधील समस्यांसंदर्भात आढावा घेण्यासाठी डॉ. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज बैठक झाली. त्यावेळी आमदार डॉ. संजय कुटे,आमदार राजु रेड्डी- बोतकुलवार, आमदार अशोक उईके, नगर विकास विभागाचे सहसचिव पांडूरंग जाधव, मुख्याधिकारी अतुल पंत, नगरसेवक शरद अग्रवाल आदीसह संबंधित जिल्हाधिकारी, नगरपंचायतींचे नगराध्यक्ष व सदस्य उपस्थित होते.
राज्यमंत्री डॉ. पाटील म्हणाले, बुलढाणामधील देऊळगाव राजा नगरपरिषदेचे व्यापारी गाळे 30 वर्षाच्या दीर्घ मुदतीसाठी लिलावाद्वारे हस्तांतरित करण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. ज्या ठिकाणी मनुष्यबळ कमी आहे, तेथे कर्मचारी भरती संदर्भात योग्य ते निर्णय घेण्यात येईल.
वणी नगरपरिषदेतील विकास कामांना गती देण्यात यावेत. नगरपरिषदेची हद्दवाढ झाल्यामुळे नव्याने कर आकारणीसंदर्भात नियोजन करण्याचे निर्देशही यावेळी त्यांनी दिले.
वणी शहरातील खुल्या जागांचा वापर प्रशासकीय इमारती, बागा यांच्यासाठी करण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करावेत. हद्दवाढ भागातील  रस्ते बांधकामासाठी अनुदान दिले जाते, त्यासंदर्भातील तातडीने कार्यवाही करावी. बाभूळगाव नगरपंचायतीमधील गावांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचनाही श्री. पाटील यांनी दिल्या.
या सर्व नगरपंचायतींमध्ये प्रामुख्याने पिण्याचे पाणी, सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन, रस्ते या क्रमानुसार विकास कामांवर निधी खर्च करण्यासाठी योग्य नियोजन करावे. मुलभूत सुविधा उपलब्धतेनंतर बगीचे, तरण तलाव, सांस्कृतिक भवन आदी सुविधांवर निधी खर्च करावा, असे श्री. पाटील यांनी सांगितले.
०००

No comments:

Post a Comment