* 4 लाख 99 हजार 715 बाधित शेतकऱ्यांचा समावेश
नागपूर, दि. 5 : खरीप हंगामातील कापूस पिकांवर बोंडअळी व धान पिकावरील तुडतुडा किडीच्या प्रादूर्भावामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना मदत जाहीर केली होती. त्यानुसार नागपूर विभागातील 4 लाख 99 हजार 715 बाधित शेतकऱ्याना 434 कोटी 11 लक्ष 85 हजार रुपयांचे मदतीचे वाटप पूर्ण झाले आहे.
खरीप हंगाम 2017 मध्ये कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादूर्भाव आढळून आल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनावर त्याचा विपरित परिणाम झाला होता. तसेच पूर्व विदर्भातील धान उत्पादक क्षेत्रात तुडतुळा किडीच्या प्रादूर्भावामुळे सुद्धा शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदत जाहीर केली होती. त्यानुसार शासनाकडून तीन हप्त्यात मदत प्राप्त झाली होती. ती महसूल विभागातर्फे शेतकऱ्यांना जिल्हानिहाय वाटप करण्यात येवून प्रत्यक्ष वितरित करण्यात आली. तसेच तिसऱ्या टप्प्यातील मदतीचे वाटप सुद्धा सुरु आहे.
कापूस पिकावरील बोंडअळी व धान पिकावर झालेल्या तुडतुडा किडीच्या नुकसानीसंदर्भात झालेल्या नुकसानीच्या सर्वेक्षणानुसार जिल्हानिहाय शासनाकडे 537 कोटी 66 लाख 20 हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार संपूर्ण निधी प्राप्त झाला आहे आणि त्यानुसार मदतीचे वाटप अंतिम टप्प्यात असून आतापर्यंत 80 टक्केपेक्षा जास्त शेतकऱ्यांना मदतीचे वाटप पूर्ण झाले आहे.
शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीपोटी मदतीसाठी नागपूर जिल्ह्यातील 85 हजार 260 शेतकऱ्यांना 46 कोटी 83 लक्ष रुपयांचे वाटप पूर्ण झाले आहे. वर्धा जिल्ह्यातील 1 लाख 44 हजार 149 शेतकऱ्यांना 102 कोटी 52 लाख रुपयांचे वाटप पूर्ण झाले आहे. गोंदिया जिल्ह्यातील 1 लाख 424 शेतकऱ्यांना 37 कोटी 27 लक्ष 76 हजार, चंद्रपूर जिल्ह्यातील 86 हजार 365 शेतकऱ्यांना 149 कोटी 97 लक्ष 78 हजार, भंडारा जिल्ह्यातील 63 हजार 547 शेतकरी सभासदांना 65 कोटी 43 लक्ष 95 हजार तर गडचिरोली जिल्ह्यातील 19 हजार 970 शेतकरी सभासंदाना 32 कोटी 7 लक्ष रुपयांचे वाटप पूर्ण झाले आहे.
******
No comments:
Post a Comment