हजरत
सुफी मखमल पीर यांच्या ‘कामील ए इमान’ पुस्तकाचे प्रकाशन
मुंबई, दि. 4 : सर्वांच्या साथीनेच विकास झाला तर देशाची प्रगती होईल. त्यामुळे सबका साथ सबका विकास ही संकल्पना घेऊन आम्ही समाजातील सर्व जाती धर्मातील लोकांना एकसाथ घेऊन राज्याचा विकास करत आहोत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मखमली पीर सुफी संमेलनामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. दी फाईन आर्ट सांस्कृतिक केंद्र येथे झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या हस्ते हजरत सुफी मखमल पीर यांच्या ‘कामील ए इमान’ हिंदी आवृत्तीच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी हजरत सुफी मखमल पीर, खासदार अमर साबळे, आमदार आशिष शेलार, प्रसाद लाड, अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख, पोलीस महानिरीक्षक कैसर खालिद, साहिल अग्रवाल, अनिल ठाकूर यांच्यासह संमेलनात सुफी संत व मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व सुफी पिरांचं स्वागत करून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायामध्ये निस्वार्थ मनाने देवाची आणि वडीलधाऱ्या माणसांची सेवा केली जाते, त्याच प्रमाणे सुफी परंपरेमध्ये माणसांना जोडायचे काम केले जाते. या परंपरेत प्रेम आणि माणुसकीचे दर्शन घडते.
देशातील सर्व समाजातील गरिबी,शिक्षणाचा अभाव दूर करून त्यांना चांगले आयुष्य जगण्यास मिळावे यासाठी शासनामार्फत सर्वोत्तपरीने प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन देशाच्या विकासात हातभार लावला पाहिजे. आपल्यातील देवाला जिवंत ठेवले की, आपल्या हातून चांगले कार्य घडत असते आणि समाजाला आपण एका चांगल्या मार्गावर घेऊन जाऊ शकतो.
यावेळी अनिल ठाकूर यांनी मध्य दक्षिण मुंबई यांच्या वतीने केरळ पूरग्रस्तांसाठी 3 लाख 51 हजाराचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्द केला.
0000
No comments:
Post a Comment