Saturday, 3 November 2018

उद्योगस्नेही धोरणामुळे राज्यातील परकीय गुंतवणूकीत वाढ - देवेंद्र फडणवीस






           शिर्डी, दि. 3 : महाराष्ट्राचे उद्योगस्नेही धोरण आणि औद्योगिक विकासासाठी विविध कायद्यात सुधारणा केल्याने राज्याच्या परकीय गुंतवणूकीत वाढ होत असून देशातील एकूण परकीय गुंतवणूकीच्या 49 टक्के गुंतवणूक राज्यात झाली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी केले.
            पारनेर तालुक्यातील सुपा औद्योगिक वसाहतीत मायडीया टेक्नोलॉजी पार्कच्या कोनशिला अनावरण समारंभप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. कार्यक्रमाला उद्योगमंत्री सुभाष देसाई, मायडीया ग्रुपचे संस्थापक शींग झिआन, अध्यक्ष पॉल फंग, मायडिया ग्रुपचे उपाध्यक्ष एरिक वांग, क्षेत्रीय व्यवस्थापकीय संचालक कृष्णन सचदेव, खासदार दिलीप गांधी, आमदार शिवाजीराव कर्डीले, बाळासाहेब मुरकुटे, मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रविणसिंह परदेशी, उद्योग सचिव सतीश गवई, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.एन.अन्‍बलगन  आदी उपस्थित होते.
            श्री. फडणवीस म्हणाले, मायडीया टेक्नोलॉजी पार्कमुळे सुपा आणि पारनेर क्षेत्रातील रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे. या भागात औद्योगिक विकासासाठी आवश्यक कुशल आणि क्षमतेने काम करणारे मनुष्यबळ उपलब्ध आहे. चीनच्या उद्योगांना राज्यात आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यात येईल. त्यामुळे चायनिज क्लस्टर विकसीत करण्यात मदत होईल, असे त्यांनी सांगितले. राज्यात परदेशातील उद्योजकांना उद्योग स्थापनेसाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल, असेही  ते म्हणाले.
            मुख्यमंत्री म्हणाले,  औद्योगिक सुधारणांमुळे महाराष्ट्र परकीय उद्योजकांचे आवडीचे ठिकाण बनले आहे. जागतिक बॅंकेने जाहीर केलेल्या व्यवसाय सुलभता निर्देशांकात भारताने 142 वरून 77  स्थानावर झेप घेतली आहे. हे आजवरचे सर्वोच्च स्थान असून यात महाराष्ट्राचे योगदान अधिक आहे. या धोरणाअंतर्गत उद्योगांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी विशेष  लक्ष देण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात अधिकाधिक परकीय गुंतवणूक राज्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
            सुपा येथे उद्योग स्थापन करत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी मायडियाच्या व्यवस्थापनाला धन्यवाद दिले. जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींनीही  उद्योगवाढीसाठी आणि परिसरातील रोजगारवृद्धीसाठी  उद्योगांना सहकार्य करण्याची भूमिका घ्यावी. त्यामुळे अधिकाधिक उद्योग या परिसरात येण्यास उत्सुक राहतील, असे ते म्हणाले.
            एमआयडीसीच्या माध्यमातून सर्व उद्योगांना सहकार्य करण्याचे आणि त्यांच्या अडचणींचे निराकरण करण्याची राज्य शासनाची भूमिका आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.     उद्योगमंत्री श्री. देसाई यांनी मायडिया उद्योग समूहाने महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास पसंती दिली याबद्दल त्यांचे आभार मानले, या उद्योगाच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर रोजगाराची उपलब्धता होणार आहे. चीन आणि जपानसारख्या देशांनी राज्यात गुंतवणूक करण्यास प्राधान्य दिले आहे. इतर देशही गुंतवणूकीसाठी पुढे येत आहेत, असे ते म्हणाले.
            खा.गांधी यांनीही मोठा उद्योग जिल्ह्यात येत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
            कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार श्री. सचदेव यांनी मानले.
तत्पूर्वी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांचे सुपे औद्योगिक वसाहत येथील हेलिपॅडवर स्वागत करण्यात आले. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक चेरिंग दोरजे, मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने, अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा आदी उपस्थित होते.
दरम्यान, कंपनीस्थळावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी कंपनीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसमवेत  संवाद साधला.                                                                            0 0 0

No comments:

Post a Comment