Saturday, 3 November 2018

यशस्वी बिझनेस मॉडेलच्या दृष्टीने नव संकल्पना साकार करा - नितीन गडकरी







* स्टार्ट अप यात्रेच्या ग्रॅण्ड फिनालेला उत्स्फूर्त प्रतिसाद
* राज्यस्तरीय स्टार्ट अपचा हिरो ठरला अभिनंदन पाटील
* ग्रॅण्ड फिनालेत 309 नव कल्पनांना पुरस्कार

नागपूर, दि 3 : नव कल्पना साकारतांना बिझनेस मॉडेल यशस्वी होईल तसेच आर्थिक आणि व्यावसायिक दृष्ट्या परिपूर्ण असेल या दृष्टीने संशोधन करून युवकांनी आपल्या कल्पनांच्या पंखांना बळ द्यावे. शासनातर्फे अशा बिझनेस मॉडलला संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी स्टार्ट अप यात्रेच्या ग्रॅण्ड फिनालेच्या समारोप प्रसंगी दिली.
महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी, स्टार्ट अप इंडिया आणि इंडस्ट्रीयल पॉलिसी विभागातर्फे स्टार्ट अप इंडिया यात्रेचा ग्रॅण्ड फिनाले विश्वेश्वरैया राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थानच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
स्टार्ट अप यात्रेच्या ग्रॅण्ड फिनालेमध्ये राज्यातील युवकांनी 309 संकल्पना सादर केल्या होत्या या संकल्पापैकी स्टार्ट अप हिरो, टॉप महिला उद्योजिका व विविध विभागातील 19 युवकांच्या नव कल्पनांना रोख पारितोषिक देऊन केंद्रीय भूपृष्ठ वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते गौरविण्यात आले तसेच त्यांच्या नव कल्पनांचे मॉडेलचे यावेळी प्रदर्शन सुद्धा आयोजित करण्यात आले होते.
स्टार्ट अपच्या ग्रॅण्ड फिनालेमध्ये पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कौशल्य विकास विभागाचे सचिव असीम गुप्ता, विश्वेश्वरैया राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थानचे अध्यक्ष विश्राम जामदार, विश्वेश्वरैया राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थानचे निदेशक प्रमोद पडोळे आदी मान्यवर उपस्थित होते.
संशोधित उत्पादनाला अर्थाजन व बाजारपेठेची क्षमता असेल तर उत्पादनाच्या निर्मितीला महत्त्व प्राप्त होत असते. नवीन कल्पना, ज्ञान, उद्योजक वृत्ती, विज्ञान आणि निरोगी बाजारपेठ या घटकाच्या संयुक्तीकरणाने उत्पादित वस्तूचे मुल्य ठरत असते. त्यामुळे संशोधन हे केवळ संशोधनापुरते मर्यादित न ठेवता त्यापासून अर्थाजन कसे करता येईल, यावर भर दिला पाहिजे. ॲमिनो एसीडचा शेतात वापर करुन 25 कोटी पर्यंत उत्पादनक्षमता वाढविण्याचा प्रयोग असो वा पेट्रोल डिझेल सारख्या महागड्या पेट्रोलियम पदार्थावर पर्याय म्हणून बायो सीएनजी चा वापर असो, प्रत्येक उत्पादनाचे संशोधन करताना त्यापासून उत्पन्न मिळेल की नाही याचा विचार व्हावा. त्यामुळे आज खऱ्या अर्थाने मी केलेले संशोधनात्मक प्रयोग यशस्वी होण्याबरोबर रोजगार निर्मितीला पूरक ठरले आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
येत्या काळात बांबू हा तेल निर्मितीचा उत्तम पर्याय बनू शकतो. त्याद्वारे तयार होणाऱ्या मिथेनॉलचा बसेस मध्ये इंधन म्हणून वापर करता येऊ शकणार आहे. अशा नवीन कल्पना विश्वेश्वरैया राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थानच्या माध्यमातून समोर याव्यात. जेणेकरून येथे संशोधन करणारा प्रत्येक विद्यार्थी केवळ नवनवीन कल्पनांना मूर्त रुप देणारच नाही तर तो लघु उद्योजक म्हणून इतरांना देखील रोजगार उपलब्ध करुन देऊ शकतो. स्टार्ट अपच्या माध्यमातून ही संधी मिळाली आहे. त्याचा प्रत्येक तरुण संशोधकाने लाभ घेत यशस्वी उद्योजक बनण्याचे आवाहन श्री. गडकरी यांनी केले.
 दूरदृष्टी आणि अंमलबजावणी ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ख्याती आहे. स्टार्ट अप म्हणजे असे उद्योजक, ज्यांची उपस्थिती बाजारपेठेला नवी गती देऊ शकतात. सुरुवातीला स्टार्ट अपच्या संशोधकांच्या उत्पादनाला बाजारपेठ तसेच ग्राहक मिळण्यास कठीण परिश्रम घ्यावे लागतील. काही वेळेला निराशाही हात लागेल परंतू खचून न जाता आलेल्या परिस्थितीचा, अडचणींचा सामना केल्यास यशस्वी उद्योजक म्हणून तुम्ही ख्याती प्राप्त कराल. कठीण परिश्रम करण्याची तयारी ठेवा यश नक्कीच मिळेल, असा विश्वास कौशल्य विकास विभागाचे सचिव असीम गुप्ता यांनी व्यक्त केला.
विश्वेश्वरैया राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थानचे अध्यक्ष विश्राम जामदार म्हणाले, व्हीएनआयटी गेल्या चार वर्षापासून स्टार्ट अपचे आयोजन करीत आहे. व्हीएनआयटीच्या माध्यमातून नवीन उद्योजकांना गेल्या चार वर्षापासून दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणात यावर्षी 240 विद्यार्थी लाभ घेत आहे. अडचणींवर मात करण्याची इच्छा असेल तर आपण यशस्वी उद्योजक बून शकतो. याकडे प्रत्येक इच्छुक नवोद्योजकांनी स्टार्ट अप इंडियाद्वारे मिळणाऱ्या संधीचा लाभ घ्यावा, असा सल्ला त्यांनी दिला.
विश्वेश्वरैया राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थानचे निदेशक प्रमोद पडोळे यांनी सर्वप्रथम व्हीएनआयटीच्या स्टार्ट अप उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन श्रीमती रेणूका देशकर यांनी तर आभार अमित कोठावडे यांनी मानले. यावेळी केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांचा चित्रफितीद्वारे शुभकामना संदेश उपस्थितांना दाखविण्यात आला. 
                                               अभिनंदन पाटील ठरला स्टार्ट अप हिरो
स्टार्ट अप यात्रेने महाराष्ट्रातील 26 जिल्ह्यातून 31 दिवसांचा सकारात्मक प्रवास करीत व्हॅन स्टॉप, बूट कॅम्प आणि ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून 2 हजाराहून अधिक तरुण संशोधकांनी नोंदणी केली. त्यापैकी 309 नव संशोधकांची या स्टार्ट अप यात्रेमध्ये निवड करण्यात आली. त्यातील 19 नव संशोधकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अभिनव संशोधनाने नव कल्पनांची वेगळी छाप सोडणाऱ्या अभिनंदन पाटील याला स्टार्ट अप हिरो ऑफ स्टेटया एक लाख रुपयांचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. याशिवाय कृषी क्षेत्रातील संशोधनाकरिता अनुक्रमे अर्जून देवरणकर, मुकेश बिसने, सुरेंद्र काळबांडे, आरोग्य क्षेत्राकरीता दिपक सावंत, प्रियंका पाटील, हंसराज पारधी, सामाजिक क्षेत्रात डॉ. वैशाली कुलकर्णी, निकेश इंगळे, वैभव माधेकर, स्थिरता क्षेत्रात स्वागता कावळे, मधूर राठी, योगेश भंडारी, तांत्रिक क्षेत्रात आशिष चांदवडकर, अमित माहोरे, मिथीलेश हिंगे यांना प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्काराचे धनादेश प्रदान करण्यात आले. विशेष पुरस्कारामध्ये महिला उद्योजक म्हणून मयुरी सावंत, पूजा भडमिकर, प्रियंका सरवदे यांनाही धनादेश तसेच प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. 100 सहभागी संशोधकांना देखील प्रमाणपत्र देण्यात आले.
महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीच्या अमीत कोठावडे, अमेय हरकरे, साहील लोहदे, मोहित सोनी, उमेश बलवानी, रुची सिंघानीया नील लालका व देवेंद्र नागले यांनी स्टार्ट अप यात्रेच्या आयोजनाची यशस्वी जबाबदारी स्वीकारली. व्हीएनआयटी येथे आयोजित ग्रॅण्‍ड फिनाले मध्ये महाराष्ट्रातील 309 सर्वोत्तम कल्पनांची स्पर्धा घेण्यात आली. त्यामधून राज्यातील स्टार्ट अप हिरोची निवड करण्यात आली आहे. विजेत्यांना प्री-इन्क्युबेशन ऑफर्स देण्यात येत असून यामध्ये त्यांना पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी एक व्यवहार्य उत्पादन विकसित करण्याला प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु यांच्या उपस्थितीत स्टार्ट अप यात्रेची राजभवन येथून सुरुवात झाली. या दरम्यान 16 विद्यापीठ सहभागी झाले. या यात्रेचे मुख्य आकर्षण बूट कॅम्प 40 महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यात आले. प्रत्येक बूट कॅम्प मधून सर्वोत्तम कल्पना निवडण्यात आल्या आहेत.  या उपक्रमाला राज्यातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता.
****

No comments:

Post a Comment