मुंबई, दि. २८ : शिक्षणाची वारी उपक्रमाच्या माध्यमातून माणुसकीची चळवळ उभी करण्याची गरज आहे. आजच्या काळात साक्षर होण्याऐवजी सुशिक्षित होण्याची गरज अधिक असल्याचे मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितले.
            या उद्घाटन सोहळ्यात मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, शिक्षण संचालक सुनील मगर, शिक्षण विभागाच्या विशेष कार्यधिकारी प्राची साठे, शिक्षण उपसंचालक शोभा खंदारे, मुंबई शिक्षण विभागाचे उपसंचालक राजेंद्र अहिरे, मुंबई प्रादेशिक विद्या प्राधिकरणाच्या उपसंचालक संघमित्रा त्रिभुवन आदि मान्यवर उपस्थित होते.
प्रत्येक विद्यार्थ्याने गुणवत्तापूर्ण शिक्षण घेऊन आणखी बुध्दिवान व्हावे तसेच विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यामध्ये सुसंवाद होण्यासाठी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतील शिक्षणाच्या वारीचा शुभारंभ आज मुंबईतील एमएमआरडीए मैदान  येथे झाला.
             शिक्षण संचालक श्री. मगर यावेळी म्हणाले, स्पर्धात्मक काळाबरोबर आपण अपडेट राहायला हवे नाही तर आपण आऊटडेटेड होऊ. शिक्षकांनी जर प्रत्येक विद्यार्थाला त्यांच्या कलेने शिकवले तर त्या विद्यार्थ्यांला मिळणारे शिक्षण आणखी गुणवत्तापूर्ण होऊ शकते.
शिक्षणाच्या वारीचे महत्व
विद्यार्थ्यांच्या विकासात शिक्षक-पालक दोघांचीही भूमिका महत्त्वाची आहे. शाळा व्यवस्थापन समिती ही मुख्यत्वेकरून पालकांचे प्रतिनिधित्व करते. शाळा व्यवस्थापन समिती हा घटक सक्षम झाल्यास शाळा विकासात लोकसमुदायाचा सहभाग अधिक वाढेल. त्यातून शिक्षक-पालक सुसंवाद निर्माण होईल आणि  १०० % विद्यार्थी प्रगत करण्यासाठी त्याचा उपयोग होईल. या उद्देशाने गुणवत्ता विकासासाठी शालेय व्यवस्थापन समित्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी यावर्षीची ‘शिक्षणाची वारी’ मुंबई येथे दि.२८ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत मुंबई येथील एम.एम.आर.डी.ए मैदान येथे आयोजित करण्यात आली आहे.
‘शिक्षणाची वारी’चे यंदाचे चौथे वर्ष आहे. आतापर्यंत आयोजित केलेल्या शिक्षणाच्या वारीमध्ये सुमारे लाखभर शिक्षक, पालक व शिक्षणप्रेमी नागरिकांनी विविध नाविन्यपूर्ण प्रयोगांचा लाभ घेतला आहे. यापूर्वी पुणे, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, नाशिक आणि रत्नागिरी येथील यशस्वी आयोजनानंतर यावेळी मुंबई, कोल्हापूर, वर्धा,नांदेड आणि जळगाव येथे वारीचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईच्या वारीत रायगड, पालघर, ठाणे, मुंबई उपनगर आणि मुंबई शहर या जिल्ह्यातील शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व शिक्षक भेट देणार आहेत.
शाळा विकास आराखडा व शाळा व्यवस्थापन समिती संरचना, पालकांची शाळांना अध्यापनात / कौशल्य विकासात मदत, किशोरवयीन आरोग्य शिक्षण, शालेय पटसंख्येत भरीव वाढ होण्यासाठी राबविण्यात आलेले उपक्रम, लोकसहभाग, शालेय पोषण आहार, स्थलांतरित व शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी समितीचा सहभाग, स्वच्छ भारत-स्वच्छ विद्यालय, दिव्यांग मुलांसाठीचे शिक्षण, गणित व भाषा वाचन विकास, कृतियुक्त विज्ञान, तंत्रज्ञानाचा अध्यापनात प्रभावी वापर, कला,कार्यानुभव व  क्रीडा विषयक उपक्रमांचे प्रयोग शिक्षणाची वारीमध्ये मांडण्यात आले आहेत.
या शैक्षणिक प्रयोगांची सर्वांना माहिती व्हावी. शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना या प्रयोगांचा अंगिकार करता यावा. अनुभव घेता यावा हा या वारीच्या आयोजनामागील प्रमुख उद्दिष्ट आहे. या टप्प्यातील दुसरी वारी कोल्हापूर (१० ते १२ डिसेंबर, २०१८), तिसरी वारी वर्धा ( ३ ते ६ जानेवारी, २०१९), चौथी वारी नांदेड येथे (२९ ते ३१ जानेवारी, २०१९) आणि पाचवी वारी जळगाव येथे (१५ ते १७ फेब्रुवारी, २०१९) होणार आहे.
००००
 




 
No comments:
Post a Comment