Wednesday, 26 December 2018

कापूस पिकावरील शेंदरी बोंडअळी नियंत्रणासाठी फरदड न घेण्याचे शेतकऱ्यांना आवाहन


नागपूर, दि. 26 : शेतकऱ्यांनी कापूस पिकावरील शेंदरी बोंडअळीचे वेळीच नियंत्रण केल्यास आगामी काळात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होणार नाही. शेंदरी बोंडअळी नियंत्रणासंदर्भात कृषी विभागाचे  शेतकऱ्यांनी कापूस पिकाची फरदड-खोडवा घेवू नये, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक आर. जे. भोसले यांनी केले आहे.
कापूस हे महाराष्ट्रातील प्रमुख नगदी पीक असून भारतातील कापूस पिकाखालील क्षेत्राचा विचार करावयाचा झाल्यास त्यात महाराष्ट्राचा  अग्रक्रम लागतो. राज्यात सरासरी 41.91 लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड केली जाते. खरीप 2018 मध्ये 42.53 लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड करण्यात आली असून त्यामध्ये बहुतांशी बीटी वाणांचा समावेश आहे.
   शेंदरी बोडअळीच्या नियंत्रणाच्या दृष्टीने एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक असून कापूस उत्पादनाशी निगडित सर्व यंत्रणा उदा. शेतकरी, कृषी विद्यापीठ, कृषी विभाग, कापूस पीक संशोधन संस्था, बियाणे उत्पादक कंपन्या, कीटकनाशक कंपन्या, कापूस खरेदी केंद्रे(मार्केट यार्ड,), गोडाऊन,जिनिंग/ प्रेसिंग मिल्स आदी  संस्थांनी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.
शेंदरी बोंडअळी व्यवस्थापनामध्ये शेतकऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याने विभागीय कृषी सहसंचालक आर. जे. भोसले यांनी  पुढीलप्रमाणे शेतकऱ्यांना मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.
कापूस पिकाची फरदड/ खोडवा घेऊ नका : कापूस पिकाची फरदड घेतल्यास किंवा कापूस पिकाचा हंगाम वाढविल्यास शेंदरी बोंडअळीसाठी नियमित खाद्य उपलब्ध होऊन किडीचे जीवनचक्र सतत पुढे चालू राहते. फरदडीपासून थोडेफार उत्पादन मिळत असले तरी या कीडीचा पुढील हंगामातील प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी फरदड न घेता पऱ्हाट्या श्रेडर/ रोटाव्हेटर यासारख्या यंत्रांद्वारे जमिनीत गाडाव्यात. त्यामुळे जमिनीची सुपिकता वाढण्यास तसेच शेंदरी बोंडअळीचे जीवनचक्र खंडीत होण्यास मदत होईल.
यावर्षी कृषी यांत्रिकीकरण योजनेतून श्रेडर्सची अनुदानावर उपलबधता करुन देण्यात येत आहे. त्याकरिता नजीकच्या कृषी अधिकाऱ्यांशी शेतकऱ्यांनी संपर्क साधावा. 5 ते 6 महिने कापूस विरहित शेत ठेवल्यास शेंदरी बोंड अळीचे जीवनचक्र संपुष्टात येते. त्यामुळे पुढील हंगामात बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी होतो. कपाशीचा हंगाम संपण्याच्या शेवटी शेतातील कीड, रोगग्रस्त पाने, पाते, फुले, बोंडांमध्ये असलेल्या बोंड अळीच्या विविध अवस्था नष्ट करण्यासाठी शेतात शेळ्या, मेंढ्या तसेच इतर जनावरे चरण्यासाठी सोडावीत.
कपाशीच्या पऱ्हाट्यामध्ये किडीच्या सूप्त अवस्था राहत असल्याने त्याची गंजी करुन बांधावर ठेवू नये. कपाशीच्या पऱ्हाट्या, व्यवस्थित न उघडलेली किडग्रस्त बोंडे व पाला पाचोळा नष्ट करुन शेत स्वच्छ ठेवावे. पऱ्हाट्या शेतातून काढल्यानंतर त्यांची साठवणूक न करता त्या काडी-कोळसा/ इंधन ब्रिकेट्स तयार करणाऱ्या कारखान्यांना द्याव्यात. पीक काढणीनंतर जमिनीची खोल नांगरट हिवाळ्यातच करावी त्यामुळे जमिनीवर आलेल्या किडींचे कोष तसेच इतर अवस्था नष्ट होतील. 
शक्यतो दिवसा नांगरट केल्यास किडीचे शत्रू चिमण्या, कावळे, बगळे याद्वारे नियंत्रण होते.  ही कीड केवळ कापूस पिकावरच उपजीविका करत असल्यामुळे सिंचनाची सोय असलेल्या ठिकाणी कपाशीनंतर चारापिकाची फेरपालट करावी त्यामुळे कापूस पिकाच्या उपलब्धतेअभावी शेंदरी बोंडअळीच्या पुढील पिढ्या मर्यादित राहतील. सध्या वेचणी केलेला कापूस मार्केटयार्ड, जिनिंग- प्रेसिंग मिलमध्ये येत आहे. त्या ठिकाणीही शेंदरी बोंडअळी व्यवस्थापनाची कार्यवाही होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने कापूस खरेदी केंद्रे (मार्केटयार्ड), गोडाऊन, जिनिंग/ प्रेसिंग मिल्स या संस्थांनी सदर परिसरात कापसापासून निर्माण झालेला कचरा, सरकीतील आळ्या व कोष नष्ट करुन त्या ठिकाणी प्रकाश सापळे, कामगंध सापळे (फेरोमन ट्रॅप्स) लावून त्यात अडकलेले पतंग नियमित गोळा करुन नष्ट करण्याचे आवाहन कृषी विभागाने संबंधित संस्थांना केले आहे.
शेतकरी स्तरावर साठवणुकीच्या ठिकाणी त्याचबरोबर सर्व संबंधित यंत्रणांनी संयुक्तपणे मोहीम स्वरुपात तातडीने उपाययोजना केल्यास शेंदरी बोंडअळीचे निर्मुलन करणे शक्य होईल, असेही विभागीय कृषी सहसंचालक आर. जे. भोसले यांनी कळविले आहे.
*****

No comments:

Post a Comment