मुंबई, दि. 4 : राज्यातील काही भागात दुष्काळाची परिस्थिती उद्भवली आहे. अशा भागात गाई, बैल यासारख्या पशूधनासाठी चारा व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था राज्य शासनामार्फत करण्यात येते, यांतर्गतच मेंढी व शेळीसाठी देखील पाण्याची व चा-याची व्यवस्था व्हावी यासाठी आपण जातीने लक्ष घालून पाठपुरावा करू, असे आश्वासन पशू, दुग्ध आणि मत्स्य विकास राज्यमंत्री अर्जून खोतकर यांनी दिले. राज्यातील मेंढपाळ करणाऱ्या धनगर समाजातील प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने आज मंत्रालयात राज्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
श्री. खोतकर यांनी धनगर समाजाच्या शिष्टमंडळाची आस्थेने चौकशी केली, त्यांच्या समस्या समजून घेतल्या. धनगर समाजातील मेंढपाळ हा घटक राना वनात भटकंती करुन उदरनिर्वाह करतो. त्यामुळे त्यांच्यावर हल्ला होणे, दरोडे पडणे यासारख्या बाबी घडून येतात. या दरोड्यांची चौकशी व्हावी यासाठीचे निवेदन यावेळी देण्यात आले. मेढ्यांवरील रोगाचे निदान करण्यासाठी पुणे येथे प्रयोगशाळा सुरु करावी, तसेच मेंढ्यावरील औषधांच्या किंमती जास्त असल्याने उपचाराचा खर्च वाढतो त्यापेक्षा जेनेरिक औषधी उपलब्ध करून द्यावी या देखील मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले. या सर्व मागण्यांसाठी लवकरच बैठक घेऊन समाधान काढण्यात येईल, असेही राज्यमंत्र्यांनी सांगितले. या शिष्टमंडळात लहू शेवाळे, अजित खरात, नामदेव बाजोडे, शिवलाल बोंद्रे आणि वर्षाताई खताळ यांचा समावेश होता.
***

No comments:
Post a Comment