Monday, 1 April 2019

उष्णतेच्या लाटेपासून बचावासाठी नागरिकांनी करावयाच्या उपाययोजना

         
        नागपूरदि. 1:  भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदाच्या उन्हाळ्यात राज्यात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव अधिक राहणार आहे. मागील वर्षापेक्षा यावर्षी उन्हाळ्याची सुरुवात लवकर झाली आहे. उष्णतेच्या लाटेपासून बचाव होण्याकरिता तसेच नागरिकांमध्ये सर्तकता निर्माण व्हावी यासाठी उष्णतेच्या लाटेची माहिती देण्याकरीता रेडीओ, टीव्ही. सोशल मीडिया व स्थानिक वृत्तपत्रांचा वापर, जिल्हा नियंत्रण कक्ष, महानगर पालिका नियंत्रण कक्ष, विभागीय स्तरावरील नियंत्रण कक्ष व स्थानिक संस्था आणि आरोग्य विभागांनी एकत्रित कार्य करावे. तसेच सर्व संबंधित विभाग, स्थानिक पुढारी व सामाजिक संस्था यांनी या कार्यात सामील व्हावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी, जिल्हाआपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर यांनी केले आहे.
            काय करावे – तहान लागलेली नसली तरी सुद्धा जास्तीत जास्त पाणी पिण्यात यावे, हलकी, पातळ व सच्छिद्र सूती कपडे वापरावेत, बाहेर जातांना गॉगल्स, छत्री, टोपी, बुट व चपलाचा वापर करण्यात यावा, प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत घ्यावी, उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करण्यात यावा. तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकण्यात यावा, शरीरातील पाण्याचा प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनविण्यात आलेली लस्सी, तोरणी, लिंबू-पाणी, ताक इत्यांदीचा नियमित वापर करण्यात यावा. अशक्तपणा, सुस्तपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावे व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा. गुरांना छावणीत ठेवण्यात यावे. तसेच त्यांना पुरेसे पिण्याचे पाणी द्यावे. घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा. रात्री खिडक्या उघड्या ठेवण्यात याव्यात, पंखे, ओले कपडे यांचा वापर करण्यात यावा. तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करण्यात यावे. कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, सूर्य प्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सुचित करण्यात यावे, पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा. बाहेर कामकाज करीत असताना मध्ये मध्ये विसावा घेऊन नियमित आराम करण्यात यावा. गरोदर महिला, कामगार व आजारी कामगारांची अधिक काळजी घेण्यात यावी. रस्त्याच्या कडेला उन्हापासून संरक्षणाकरीता शेड उभारावेत, जागोजागी पाणपोईची सुविधा करण्यात यावी.
        काय करु नये -  लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये, दुपारी 12 ते 3.30 या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे, गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे, बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावे, दुपारी 12 ते 3.30 या कालावधीत बाहेर काम करणे टाळावे, उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे. तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावी. उष्णतेच्या लाटेपासून बचावासाठी नागरिकांनी वरील उपाययोजना करण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी यांनी केले आहे.
***** 

No comments:

Post a Comment