Monday, 2 November 2020

 भ्रष्टाचारास प्रतिबंध घालण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज

-         जिल्हाधिकारी


·        ‘दक्षता जनजागृती सप्ताहा’निमित्त ई परिसंवाद संपन्न

·        लाचखोरांविरुद्ध कारवाई हा निर्धार

·        माहिती देण्याचे नागरिकांना आवाहन


नागपूर, दि. 02:  सामान्य जनतेची कामे निर्धारित वेळेत विनाव्यत्यय होणे, हे प्रशासनातील प्रत्येक अधिकारी –कर्मचा-याचे कर्तव्य आहे. ते पार पाडताना होणा-या भ्रष्टाचारास प्रतिबंध घालण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले.

 दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त आयोजित इ - परिसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, सहायक पोलीस आयुक्त व्यंकटेश देशपांडे यांच्यासह जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकारी इ -परिसंवादाला उपस्थित होते. दरवर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनापासून दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी कोरोना महामारीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयात ई-परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.

 शासकीय काम विनाविलंब करणे हे शासकीय कर्मचाऱ्याचे कर्तव्य असून, त्या कामासाठी लाच मागितली जात असल्यास नागरिकांनी त्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंध विभागाला वेळेत द्यावी. त्यामुळे अशा लाचखोराविरुद्ध कठोर कारवाई करता येईल, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. ठाकरे यांनी केले.  कार्यालय प्रमुख या नात्याने सर्वांनी कर्मचारी वर्गावर लक्ष ठेवणे आवश्यक असून, शासन दरबारी सामान्य जनतेची दैनंदिन कामे असतात. ती विनाविलंब आणि विना अडथळा व्हावीत, त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास वा मनस्ताप होता कामा नये. त्यांची कामे करताना शासकीय कर्मचा-यांनी कोणत्याही स्वरुपात भ्रष्टाचार करता कामा नये. जनतेची कामे पूर्ण करताना त्यांच्याकडून लाच न घेता ही कामे सुलभरीत्या आणि सहज पूर्ण करावीत, असे  आवाहनही जिल्हाधिकारी श्री. ठाकरे यांनी केले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून परीक्षेत्रीय स्तरावर भ्रष्टाचार निर्मूलनासाठी जनजागृती मोहिम राबविण्यात येत आहे.त्यासाठी जिल्हास्तरावर कार्यालय प्रमुखाने ‘भ्रष्टाचार प्रतिबंधक संदर्भात भूमिका व योगदान’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता.

 

  ******

No comments:

Post a Comment