पंढरपूर दि. 14 – आपले जलस्तोत्र, अस्तित्वात असलेली वने संरक्षित करणे, नवीन वनांची निर्मिती ज्यावेळी आपण करु शकू त्यावेळी राज्यावरील सर्व संकटे दूर होतील आणि पांडुरंगाचा आशिर्वाद आपल्याला मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ व पर्यावरण विभागाच्यावतीने आयोजित ‘ पर्यावरणाची वारी – पंढरीच्या दारी ’ या आळंदी ते पंढरपूर पायी वारीचा समारोप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, पालकमंत्री विजय देशमुख, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, खासदार संजय पाटील, आमदार प्रशांत परिचारक, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव सतिश गवई, विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यावेळी उपस्थित होते.
ज्याला पर्यावरणाचं संवर्धन करता येतं तो पांडुरंगाचा कधीही भक्त होतो, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, यावर्षी निर्मल वारी करण्याचा शासनाने निर्णय घेतला. त्याअंतर्गत वारीच्या मार्गावरही मोठ्या प्रमाणात शौचालये ठेवली. पर्यावरणाची वारी आणि स्वच्छतेची वारी अशा वारींच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणासोबतच स्वच्छतेचा जागरही करण्याचा प्रयत्न केला. पर्यावरणाच्या माध्यमातून वृक्षयुक्त महाराष्ट्र, वनयुक्त महाराष्ट्र तसेच जलयुक्त महाराष्ट्र करण्यासाठी शासन महत्वाची पावले उचलत आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
आपली सर्वांची आई चंद्रभागा पुन्हा स्वच्छ, निर्मल, निखळ वाहणारी करण्यासाठी ‘ नमामी चंद्रभागा ‘ हा प्रकल्प शासनाने हाती घेतला असून त्यातून आपले जलस्त्रोत स्वच्छ करण्याचा संदेश सर्वत्र पोहोचेल, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमात भारुड, पोवाडा, वारकरी आख्यान सादर केलेल्या विविध लोककलावंत आणि वारकरी पंथाच्या व्यक्तींच्या कला सादर करण्यात आल्या. त्याअनुषंगाने मुख्यमंत्री म्हणाले की, एक लोककलाकार हाच लोकप्रबोधन करु शकतो, त्याच्या या कलेमुळे स्वच्छता, पर्यावरण आदी बाबींसाठी मोठा उपयोग होतो.
या कार्यक्रमात प्रारंभी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सपत्नीक टाळ गळ्यात घेऊन ‘ज्ञानोबा- तुकाराम ‘असा जयघोष केला. तसेच अमृता फडणवीस यांनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेतले. त्यानंतर त्या एका महिलेसोबत फुगडी खेळल्या. यावेळी ‘ माझे माहेर पंढरी ’ आणि ‘ नाते विठ्ठलाचे’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांनी आख्यान, चंदाबाई तिवाडी यांनी भारुड, शाहीर देवानंद माळी यांनी तसेच छोटा शाहीर पृथ्वीराज यांनी पोवाडा सादर करुन सर्वांची मने जिंकली.
0000
शेतमालाची बाजारपेठ शेतकऱ्यांच्या हाती हवी
मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादन : कृषी पंढरी प्रदर्शनाचे उद्घाटन
मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादन : कृषी पंढरी प्रदर्शनाचे उद्घाटन
पंढरपूर, दि. 14 : शेतमालाची बाजारपेठ शेतक-यांच्या हातात असायला हवी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज कृषी पंढरी प्रदर्शनाचे उद्घाटन झाले . यावेळी ते बोलत होते. उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर होते. यावेळी सहकार मंत्री सुभाष देशमुख, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, पालकमंत्री तथा राज्यमंत्री विजयकुमार देशमुख, पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे आदी उपस्थित होते.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संत सावता माळी कृषी नगरीच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या, या प्रदर्शनात चारशेहून अधिक कंपनी सहभागी झाल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “पंढरपूर येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने कृषी पंढरी सारखे प्रदर्शन आयोजित करुन आमदार प्रशांत परिचारक यांनी अतिशय चांगला उपक्रम राबवला आहे. या पंढरीतून कृषी विषयक तंत्रज्ञान राज्यभरातील शेतक-यांच्या शिवारापर्यंत पोहोचेल ”.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियमनातून काही कृषी उत्पादने नियमनमुक्त करण्यात आली आहेत. शेतक-यांच्या हितासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे. कारण शेतमाल पिकवणा-या शेतक-याला आपल्या उत्पादीत मालाचा भाव ठरवता येत नाही. नियमनमुक्तीमुळे शेतकरी आपल्या मालाचा भाव ठरवू शकेल आणि त्याला त्याच्या कष्टाचे फळ मिळेल ’.
बाजारपेठ शेतक-यांच्या हितासाठी कार्यरत असायला हवी. पण काही कारणांमुळे ही बाजारपेठ शेतक-यांच्या फायद्याची नसल्याचे स्पष्ट होते. वास्तविक राज्य शासनास बाजारपेठ ही शेतक-यांच्या हिताची व्हावी, असे वाटते त्यामुळेच काही कृषी उत्पादने नियमनमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कृषी क्षेत्रात गुंतवणूक होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी राज्य शासनाने गेल्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी 25 हजार कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. राज्यातील जास्तीत जास्त जमीन ठिबक सिंचनाखाली आणण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. त्याअंतर्गत येत्या वर्षभरात चार लाख हेक्टर जमीन ठिबक सिंचनाखाली आणण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी मंत्री पांडुरंग फुंडकर, पालकमंत्री विजय देशमुख, पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचीही भाषणे झाली.
प्रास्ताविक आमदार परिचारक यांनी केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी प्रदर्शनातील विविध स्टॉलना भेट देवून पाहणी केली.
0000


No comments:
Post a Comment