नागपूर दि. 03 : घरातील
प्रत्येक व्यक्तींनी वरीष्ठ नागरिेकांसोबत संवाद साधल्यास त्यांच्या समस्या जाणून
घेणे शक्य होईल व त्या सोडविण्यास मदत होईल. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये एकाकीपणाची
भावना निर्माण होणार नाही, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव तथा
वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश कुणाल जाधव यांनी केले.
जिल्हा विधी
सेवा प्राधिकरण व किनखेडे प्लॉट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने वरिष्ठ नागरिक
दिवसानिमित्त कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर भरतनगर येथील भास्कर सभागृहात नुकतेच
पार पडले. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सदस्य ॲङ राजेद्र
राठी, ॲङ सुरेखा बोरकुटे उपस्थित होते.
वरिष्ठ
नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी शासनाकडून पोलिस स्टेशनमध्ये वरिष्ठ नागरीक सेल
तयार करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या हिताच्या अनेक कायदेविषयक तरतुदी असून,
वरिष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या शासकीय योजनांची
त्यांना माहिती व्हावी, याकरीता जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाव्दारे
वेळोवेळी जनजागृती करण्यात येत आहे. तसेच वरिष्ठ नागरिकांच्या कायदेविषयक समस्या
सोडविण्याकरीता सरकारी खर्चाने सहाय्यता व सल्ला, विधी स्वयंसेवक व अन्य
कायदेविषयक मदत विधी सेवा प्राधिकरणाव्दारे करण्यात येत आहे. वरिष्ठ नागरिकांच्या
समस्येसंदर्भातील तक्रारीची प्राधान्याने दखल घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत
त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यात येत असल्याचे न्यायाधीश कुणाल जाधव यांनी
सांगितले.
वरिष्ठ नागरिकांचे
त्यांच्या घरातील व्यक्तींनी योग्य प्रकारे पालनपोषण केल्यास त्यांना चांगले
आयुष्य जगता येईल व समाजामध्ये वृध्दाश्रमाची आवश्यकता राहणार नाही. असे सांगून ॲङ
राजेंद्र राठी पुढे म्हणाले, वरिष्ठ
नागरिकांना त्यांचा उदरनिर्वाह करण्याकरीता त्यांच्या मुलांनी आर्थिक मदत करावी.
अपत्य नसणाऱ्या वरिष्ठ नागरिकांकरीता उदरनिर्वाहासाठी आर्थिक साहाय्य पुरविणाऱ्या
शासनाच्या योजना असून योजनेचा लाभ घेण्याकरीता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये योग्य
कागदपत्रांच्या पूर्ततेसह अर्ज सादर करता येतो.
यावेळी जिल्हा
विधी सेवा प्राधिकरणाव्दारे उपस्थितांच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे
प्रास्ताविक सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षक अविनाश राजूरकर यांनी तर संचालन ॲड.
सुरेखा बोरकुटे यांनी केले. यावेळी वरिष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*****
No comments:
Post a Comment