Tuesday, 30 September 2025

नागपूर पदवीधर मतदार संघासाठी उद्यापासून मतदार नोंदणी - विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी

 


Ø  6 नोव्हेंबरपर्यंत दावे स्वीकारण्यात येणार

Ø  30 डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार

         नागपूर, दि. 29 : विभागातील पदवीधर मतदार संघासाठी 1 नोव्हेंबर 2025 या अर्हता दिनांकावर आधारित नव्याने मतदार याद्या तयार करण्याकरिता कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.  30 सप्टेंबर 2025 रोजी मतदार नोंदणीची जाहीर सूचना प्रसिद्ध होणार असून 6 नोव्हेंबर 2025 पर्यंत याबाबत दावे स्वीकारण्यात येणार आहे तर अंतिम मतदार यादी 30 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या विशेष मतदार नोंदणी मोहिमेत नागपूर विभागातील सर्व पदवीधरांनी सहभाग घेवून नोंदणी करावी, असे आवाहन नागपूर विभागाच्या मतदार नोंदणी अधिकारी तथा विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज पत्रकार परिषदेत केले आहे. 

             विधानपरिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीच्या नागपूर विभागातील पदवीधर मतदार संघाचे सदस्य अभिजित वंजारी हे 6 डिसेंबर 2026 रोजी निवृत्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर पदवी निकाल लागल्यापासून 1 नोव्हेंबर 2025 पर्यंत 3 वर्ष पूर्ण झालेल्या पदवीधरांसह सद्या मतदार यादीत नाव समाविष्ट असलेल्या सर्व पदवीधरांसाठी नव्याने मतदार नोंदणी करण्यात येत आहे. यासाठी विभागातील 256 मतदान केंद्रांवर निवडणूक पदनिर्देशीत अधिकाऱ्यांकडे ही नोंदणी करता येणार आहे. नुकतेच राज्य मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार ऑनलाईन पद्धतीने मतदार नोंदणीची व्यवस्थाही उपलब्ध होणार असून याची माहिती येत्या काळात देण्यात येईल, असे श्रीमती बिदरी यांनी सांगितले.

                                                   असा आहे मतदार नोंदणी कार्यक्रम

            निवडणूक नोंदणी कार्यक्रमानुसार वर्तमानपत्राद्वारे 15 ऑक्टोंबर रोजी जाहीर सूचनेतील प्रथम पुर्नप्रसिद्धी तर 25 ऑक्टोंबर ला द्वितीय पुर्नप्रसिद्धी करण्यात येणार आहे. 6 नोव्हेंबर ही नमुना 18 द्वारे अर्जदारांचे दावे स्वीकारण्याची अंतिम मुदत राहील. 25 नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध होणार आहे तर 10 डिसेंबर पर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहे. 25 डिसेंबर रोजी दावे व हरकती निकालात काढून पुरवणी यादी तयार करण्यात येईल आणि 30 डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या मतदार मोहिमेनंतरही ज्यांची नोंदणी शिल्लक आहे, अशा पदवीधरांना उमेदवारांच्या अंतिम नामनिर्देशनच्या 10 दिवस आधीपर्यंत नोंदणी करता येणार असून त्याची स्वतंत्र पुरवणी यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे, श्रीमती बिदरी यांनी स्पष्ट केले.

                                                   एकत्रित अर्ज स्वीकारले जाणार नाही

पदवीधर मतदार नोंदणी कार्यक्रमांतर्गत एकत्रित स्वरूपात अर्ज स्वीकारले जाणार नाहीत त्यासाठी पदवीधरांना पदनिर्देशीत अधिकाऱ्यांकडे स्वत: नोंदणी करणे आवश्यक आहे. स्वत: अर्ज दाखल करण्यास असमर्थ असणाऱ्या व्यक्तीला पोस्टाद्वारे अर्ज करता येणार आहे मात्र पोस्टाद्वारे पाठविण्यात आलेले एकत्रित अर्ज स्वीकारले जाणार नाही. तसेच राजकीय पक्ष त्यांचे मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी किंवा रहीवास कल्याण संघटनांकडून एकत्रित स्वरूपात प्राप्त अर्ज स्वीकाराले जाणार नाही मात्र, एकाच घराचा पत्ता असलेल्या कुटुंबातील व्यक्तींना एकत्रित अर्ज देता येणार असल्याचे श्रीमती बिदरी यांनी सांगितले.                                                                                                                                                                            येथे मिळणार अर्ज

            पदवीधर मतदार नोंदणीसाठी विहित नमुना 18 चा अद्ययावत अर्ज भरणे गरजेचे असून अर्ज मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/Graduates-and-Teachers-Constituencies-२०२५.aspx या संकेतस्थळावर तसेच पदनिर्देशीत अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये उपलब्ध होणार आहे. 

अर्ज नोंदणीसाठी अर्हता

             नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांतील सर्व साधारण रहीवासी असलेली व 1 नोव्हेंबर 2025 पूर्वी किमान तीन वर्ष भारतातील विद्यापीठाची पदवीधर किंवा त्याच्याशी समतुल्य अर्हता धारण करीत असलेली प्रत्येक व्यक्ती मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यास पात्र आहे. तीन वर्षाचा कालावधी हा ज्या दिनांकास अर्हता पदवी परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे अशा विद्यापीठ किंवा अन्य संबंधित प्राधिकरणाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या दिनांकापासून ग्राह्य धरण्यात येणार आहे. पदवी अर्हतेसंबंधतील सविस्तर माहिती आयोगाच्या परिशिष्ट 25 मध्ये नमुद आहे. 

नागपूर पदवीधर मतदार संघाविषयी

            नागपूर पदवीधर मतदार संघात यापूर्वी 2020 मध्ये झालेल्या निवडणूकीत 256 मूळ मतदान केंद्र आणि 66 सहायकारी केंद्र असे एकूण 322 मतदान केंद्र होते. तर विभागात एकूण 1 लाख 25 हजार 439 पुरूष आणि 80 हजार 976 महिला तर 39 इतर असे एकूण 2 लाख 6 हजार 454 मतदार संख्या होती. 

        नागपूर पदवीधर मतदार संघात नागपूर,वर्धा,भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांचा समावेश होतो. मतदार नोंदणीसाठी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी या मतदार नोंदणी अधिकारी असतील तर सहाही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी हे सहायक मतदार नोंदणी अधिकारी असतील.विभागात एकूण 43 सहायक मतदार नोंदणी अधिकारी असून नागपूरमध्ये 13, वर्धा 5, भंडारा 4, गोंदिया 5, चंद्रपूर 9 आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये 7 सहायक मतदार नोंदणी अधिकारी असणार आहेत. तसेच विभागात एकूण 256 पदनिर्देशीत अधिकारी असणार आहेत. यात  नागपूरमध्ये 139, वर्धा 29, भंडारा 18, गोंदिया 17, चंद्रपूर 36 आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये 17 पदनिर्देशीत अधिकारी असल्याचे श्रीमती बिदरी यांनी सांगितले.

0000

 

 

           

 


प्रशासनाबद्दल सर्व सामान्य जनतेमध्ये विश्वास निर्माण करा - विजयलक्ष्मी बिदरी

 


नव्याने निवड झालेल्या अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण सत्राचा शुभारंभ

         नागपूर, दि. 29 : नव्याने निवड झालेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जलद व भ्रष्टाचार मुक्त सेवा देतांनाच  कर्तव्यनिष्ठेने व सामाजिक भावनेने काम करून  सर्वसामान्य जनतेचा विश्वास संपादन करा, असा सल्ला विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिला.

            वनामती येथे राज्य सेवा परिक्षेच्या माध्यमातून निवड झालेल्या 85 अधिकाऱ्यांच्या दोन वर्षीय एकत्रित 11 व्या परिविक्षाधिन प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या हस्ते झाला. त्यावेळी  मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या.

            यावेळी वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेच्या संचालक आशा पठाण, प्रशिक्षण सत्राच्या संचालिका श्रीमती सुवर्णा पांडे, सामान्य प्रशासन विभागाचे सुनिल निकम, श्रीमती अपुर्वा रोडे, श्रीमती भारसाकळे, वनामतीचे निबंधक निर्भय जैन आदी उपस्थित होते. 

            भारतीय प्रशासकीय सेवेच्या धरतीवर राज्यातील अधिकार्यांना  प्रशिक्षण देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.  नव्याने रुजू होणाऱ्या अधिकाऱ्यांना दोन वर्षीय प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे.  प्रशिक्षण कालावधीत एम ए (विकास प्रशासन) ही पदवी सुद्धा देण्यात येणार आहे.

प्रशिक्षिणार्थी अधिकाऱ्यांनी  आपली स्वच्छ प्रतिमा निर्माण करतानांच भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देण्याला प्राधान्य असावे, तसेच दैनंदिन कामात गतिमानता वाढवायला प्राधान्य द्यावे अशी सूचना  श्रीमती बिदरी यांनी केली.

            प्रशासकीय सेवेमध्ये दाखल होतांना  सर्वसामान्य जनतेमध्ये विश्वास निर्माण करतांनाच उत्कृष्ट अधिकारी म्हणून नावलौकीक मिळवा. राज्याच्या सर्वांगिण विकासाची जबाबदारी आपलीच आहे, ही भावना ठेवून सेवेला सूरवात करा. असा सल्ला विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी यावेळी दिला.

            प्रत्येक काम कर्तव्यनिष्ठेने व प्रामाणिकपणे करतांनाच आपल्या दैनंदिन कामामध्ये पारदर्शकता ठेवतांना प्रशासनाबद्दल गैरसमज निर्माण होणार नाही. याची खबरदारी घेण्याचा सल्ला देतांना वनामीच्या संचालक श्रीमती अशा पठाण  यांनी यावेळी दिला.

            प्रारंभी एकत्रित परिविक्षाधिन प्रशिक्षण कार्यक्रमाच्या संचालक श्रीमती सुवर्णा पांडे यांनी 11 व्या बॅचसाठी 85 अधिकाऱ्यांची निवड झाली असून पायाभूत प्रशिक्षण चार सत्रात पूर्ण करावयाचे आहे. प्रशिक्षण कालावधीनंतर 1 हजार 600 मार्काची परिक्षा घेण्यात येणार आहे. सेवाकालावधीतील हे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरणार असल्यामूळे प्रत्येक सत्रामध्ये प्रशिक्षणार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवावा, अशी सूचना यावेळी केली.

            यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे सुनिल निकम यांनी राज्य प्रशासकीय सेवेमध्ये दाखल होणारे अधिकाऱ्यांसाठी वनामती येथे राज्यस्तरीय प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षण कालावधीत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना सेवाजेष्ठता यादीतही समावेश राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रारंभी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी निवड झालेल्या अधिकाऱ्यांना कर्तव्य पालनाची शपथ दिली. कार्यक्रमाचे संचलन मिलिंद तारे यांनी तर आभार प्रदर्शन वनातीचे निबंधक निर्भय जैन यांनी केले.

0000


Monday, 29 September 2025

संघगीतांमध्ये प्रेरणेच्या भावनेसह भविष्याला दिशा देण्याचे सामर्थ्य -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

 

                            सरसंघचालक प. पू. डॉ मोहनजी भागवत यांच्या हस्ते 

                            शंकर महादेवन यांनी गायलेल्या संघगीतांचे लोकार्पण 

नागपूर,दि. 28 : आज वातावरण बदलासह पर्यावरण व निसर्गाच्या अनेक प्रश्नांवर अवघे जग चिंतन करते आहे. यातून मार्गक्रमण करीत असताना संघ गीतापैकी एक असलेले, निर्माणों  के पावन युगमे, हम चरित्र निर्माण न भूले। स्वार्थ साधना की आंधी में, वसुधा का कल्याण न भूले। हे प्रेरणा गीत भविष्यातही दिशा देणारे आहे, मार्गदर्शन करणारे असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने आयोजित संघगीत- लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष अनिल सोले, सन्माननीय लोकप्रतिनिधी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

आज कॉपी राईटच्या जमान्यात आपण आहोत. संघाच्या आजवरच्या वाटचालीत शुद्ध देशप्रेमाची भावना असल्याने ही प्रेरणा गीते ज्यांनी लिहिली त्यांनी आपल्या नावापेक्षा देशहिताला, देशप्रेमाल वाहते केले. या गीतातून ही संघभावना आपल्या पुढे प्रवाहित झाली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

संघगीत सर्वांपर्यंत पोहोचावे यासाठी केंद्रीय मंत्री नितीनजी यांनी या संकल्पनेला जन्म दिला. तो अत्यंत आवश्यक होता. ज्यांच्या नावात शंकर आहे आणि महादेव पण आहेत अशा गायकाने आता ही गीते गायली आहेत. महादेव आपल्या जटांमध्ये गंगाला धारण करतात आणि हे शंकर आपल्या गळ्यात स्वरगंगेला धारण करतात या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंकर महादेवन यांचा गौरव केला. 

         संघ गीतांच्या मागे जीवनाची तपस्या -  सरसंघचालक प. पू. डॉ मोहनजी भागवत 

संघ गीतांच्या मागे जीवनाची तपस्या आहे. केवळ शब्द आणि संगीताची हे सादरीकरण नाही. ह्यांनी ही गीते लिहिली त्यांनी जीवनाची तपस्या यात अर्पण केली असल्याचे भावोद्गार सरसंघचालक प. पू. डॉ मोहनजी भागवत यांनी काढले. शंकर महादेवन यांनी दर्जेदार गायन केले आहे. संघगीतांमधील भाव समजून त्यांनी गीते गायली आहेत या शब्दात त्यांनी महादेवन यांचा गौरव केला. 

               जीवनाला घडविण्याचे सामर्थ्य संघगीतात-  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

 आयुष्यात खूप काही शिकण्याची संधी गीतातून मिळते. जीवनाला घडविण्याचे सामर्थ्य संघगीतात आहे. संगीत आणि गीतात खूप ताकद असते. ते आपल्या मनाला प्रवाहित करून हृदयापर्यंत पोहोचतात. त्यातून संस्कार मिळतात असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. येत्या खासदार सांस्कृतिक महोत्सवात या गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. 

शंकर महादेवन यांच्या आवाजाने ही गीते प्रभावी झाली आहेत. सामाजिक दायित्व, राष्ट्रभक्ती यातून दिसून येते. येत्या काळात डिजिटल माध्यमातून ही गीते अधिकाधिक लोकांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न असेल, असे त्यांनी म्हणाले. 

कार्यक्रमाच्या प्रारंभी अल्बममधील काही गीतांचे सादरीकरण शंकर महादेवन यांनी केले.  सूत्रसंचालन शरद केळकर यांनी केले. शंकर महादेवन, कुणाल जोशी, श्री. शृंगारपुरे  यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अनिल सोले यांनी आभार मानले.

 

0000


'अमृतयोग' विशेषांक हा व्रतस्थ कार्याचा उज्ज्वल ऐतिहासिक ठेवा - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

 

नागपूर, दि.२७ : श्री नरकेसरी प्रकाशन संस्था  आणि दै. तरुण भारत वृत्तपत्राने राष्ट्र पुनर्निर्माण आणि राष्ट्रवादी विचारांची सदैव कास धरून माध्यम व्यवहार केला. ‘अमृत योग’ हा विशेषांक या व्रतस्थ कार्याचा उज्ज्वल ऐतिहासिक ठेवा असल्याचे प्रतिपादन, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले.

        वनामती सभागृहात आयोजित श्री नरकेसरी प्रकाशन लि. या संस्थेच्या अमृत महोत्सवी सांगता कार्यक्रमात केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांच्या हस्ते 'अमृतयोग' या विशेषांकाचे प्रकाशन झाले. त्यावेळी ते बोलत होते. श्री नरकेसरी प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. विलास डांगरे,कार्याध्यक्ष अनिल दांडेकर ,व्यवस्थापकीय संचालक धनंजय बापट दै. तरुण भारतचे संपादक शैलेश पांडे व संस्थेचे पदाधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.

     केंद्रीय मंत्री श्री. गडकरी म्हणाले, श्री नरकेसरी प्रकाशन संस्था आणि दै. तरुण भारत हा संघर्ष व बलिदानाचा प्रवास आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तिसरे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्या पुढाकारातून नरकेसरी अभ्यंकर यांनी साप्ताहिक स्वरूपात सुरू केलेल्या साप्ताहिक तरुण भारत ते पुढे 1949 मध्ये दैनिक म्हणून थोर साहित्यिक ग.त्र्यं. माडखोलकर यांनी संस्थापक संपादक या नात्याने दिलेला भक्कम वैचारिक वारसा मोलाचा ठरला. पुढे हिच संपादकांची व त्यांच्या वैचारिकतेची परंपरा चालू राहिली. संघर्षाचा काळ आला तरीही वैचारिक अधिष्ठानाला कुठेही मुरड न घालता या संस्थांनी केलेले कार्य चिरकाल टिकणारे व भविष्यातील पिढींना मार्गदर्शक आहेत असे गौरवोद्गार, श्री गडकरी यांनी यावेळी काढले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

           व्यवस्थापकीय संचालक धनंजय बापट यांनी प्रास्ताविक केले तर  संपादक शैलेश पांडे यांनी अमृतयोग विशेषांका मागील भूमिका स्पष्ट केली व उपस्थितांचे आभार मानले.

             श्री नरकेसरी प्रकाशन संस्थेचा अमृत महोत्सव आणि या संस्थेतर्फे संचालित दै.तरुण भारतचा शताब्दी महोत्सव यानिमित्ताने तयार करण्यात आलेल्या 'अमृतयोग' विशेषांकात या प्रकाशन संस्थेच्या स्थापनेपासूनचा इतिहास,दै. तरुण भारतचा या संस्थेसोबतचा सहप्रवास यासह गेल्या शतकात मराठी वृत्रपत्रसृष्टीत घडलेल्या स्थित्यंतराचा वेध घेण्यात आला आहे.

0000


पानंद रस्ते दुरुस्तीला प्राधान्य- राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल



ॲड. जयस्वाल यांच्या हस्ते रामटेक उपविभागात ५९१लाभार्थ्यांना पट्टे वाटप

रामटेक/नागपूर, दि. २७ : पाणंद रस्ते हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. शेतात पाणंद रस्त्याच्या माध्यमातून ये-जा होत असते. हे रस्ते दुरुस्त करण्यास शासनाचे प्राधान्य असल्याचे वित्त  व नियोजन राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल आज येथे म्हणाले. 

        रामटेक येथील गंगा भवन  येथे " सर्वांसाठी घरे" उपक्रमांतर्गत पट्टे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ते बोलत होते. राज्यमंत्री ॲड. जयस्वाल यांच्या हस्ते रामटेक उपविभागात 591 लाभार्थ्यांना पट्टे वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, उपविभागीय अधिकारी प्रियेष महाजन, रामटेकचे तहसीलदार रमेश कोळपे यांच्यासह लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

     जनसामान्यांना हक्काचे घर मिळावे, प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ प्रत्येकाला मिळावा यासाठी सरकार सातत्याने कार्यरत आहे. या योजनेद्वारे हजारो कुटुंबांचे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या पाणंद रस्त्यांच्या दुरुस्तीला प्राधान्य राहणार असल्याचे ॲड आशिष जयस्वाल यावेळी म्हणाले. 

     शासनाच्या विविध योजनांमुळे आता नागरिकांना घर बसल्या ऑनलाइन सेवा मिळत आहेत. पूर्वी सरकारी कार्यालयांचे फेरे मारावे लागत असत परंतु आता पारदर्शक आणि जलदगतीने निर्णय होत असून जनतेच्या अडचणी कमी होत असल्याचे त्यांनी सांगितले. 

       जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. जिल्ह्याला पाणंद रस्ता उपक्रमांतर्गत राज्यात अव्वल क्रमांकावर न्यायचे आहे. जिल्ह्यातील अनेक पाणंद रस्ते मोकळे झालेले आहेत. अजून काही कामे बाकी आहेत. ती कामे येत्या काळात पूर्णत्वास न्यायची आहेत. पट्टे वाटपातही नागपूर जिल्हा अग्रेसर आहे. येत्या काही दिवसात पट्टे वाटपाचे उर्वरित काम पूर्ण करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले. 

     या कार्यक्रमात नगर परिषद कन्हान अंतर्गत 153,नगर पंचायत पारशिवनी अंतर्गत 71, नगर पंचायत कांद्री अंतर्गत 29, पंचायत समिती पारशिवनी अंतर्गत ग्रामीण भागातील 49 असे पारशिवनी तालुक्या अंतर्गत एकूण 302 तसेच मौदा तालुक्यातील रामटेक विधानसभा मतदार संघांतर्गत 102 मालकीहक्क पट्टे गरजू लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले.   

     रामटेक तालुक्या अंतर्गत ग्रामपंचायत सालईमेटा, मनसर, नवरगांव, पिंडकापार(सोनपूर), पटगोवारी येथील 117 शासकीय जागेवरील रहिवासी प्रयोजनार्थ मालकीहक्क पट्टे तसेच मौजा कट्टा, कांद्री, लोहडोंगरी येथील एकूण 70 वनहक्क पट्टे गरजू लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले.

                                                   0000

Friday, 26 September 2025

कृतीदलाच्या माध्यमातून निर्यात स्पर्धात्मकता वाढीसाठी राज्यशासनाचे प्रयत्न

 

 

नागपूर विभागातील निर्यातदार व उद्योग घटकांसोबत कृतीदलाची चर्चा

नागपूर,दि. 26 :  विभागातील उद्योगांमधून उत्तमोत्तम उत्पादन परदेशात निर्यात करण्यासाठी उद्योगांच्या आवश्यकतेनुसार राज्य शासनाकडून सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे कृती दलाचे प्रमुख सेवानिवृत्त सनदी अधिकारी अपूर्व चंद्रा यांनी आज सांगितले. तसेच उद्योजकांकडून प्राप्त सूचना राज्य शासनापर्यंत पोचवून या सर्व विषयांचे समाधान धोरणात्मक निर्णयाद्वारे होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. 

          अमेरिकेने भारतावर लावलेल्या टेरीफच्या पार्श्वभूमीवर नागपूर विभागातील उद्योग घटकांची निर्यात स्पर्धात्मकता वाढविण्याच्या उद्देशाने राज्य कृतिदल, निर्यातदार व उद्योग संघटनांची  अपूर्व चंद्रा यांच्या अध्यक्षतेखाली  विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविशांत पंडा, गोंदियाचे जिल्हाधिकारी प्रजित नायर,उद्योग सहसंचालक एस.एस. मुद्दमवार यांच्यासह विविध जिल्ह्यातील उद्योग संघटनांचे प्रमुख,विभागातील सर्व जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उपस्थित होते. तसेच मुंबई येथून महाराष्ट्र इन्स्टिट्युट फॉर ट्रान्सफॉर्मेशनचे (मित्रा) मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी व उद्योग विभागाचे अधिकारी आणि नागपूर, वर्धा, भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. 

राज्याच्या उद्योग विभागाकडून निर्यात प्रोत्साहनासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘एक जिल्हा एक उत्पादन आणि ‘मित्रा’ यांच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या कृतीदलाने राज्यातील अन्य पाच प्रशासकीय विभागातील उद्योजकांसोबत चर्चा करून सूचना प्राप्त केल्या आहेत. या कडीत कृतीदलाने नागपूर विभागातील उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींशी चर्चा केली. 

नागपूर विभागात कृषी आधारीत उद्योग, वस्त्रोद्योग, संरक्षण, कोळसा आदी क्षेत्रातील उद्योगांना आवश्यक सोयी-सुविधा पुरविणे व निर्यातीसाठी आवश्यक पुरक वातावरण उपलब्ध करून देण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली.  उद्योगांना किफायती दरात वीज मिळावी, शेती आधारित उत्पादनांना क्वॉलिटी कंट्रोल ऑर्डरच्या नियमांमधून सवलत द्यावी, दक्षिण व उत्तर भारतात कृषी आधारित उत्पादनांच्या वाहतुकीसाठी अनुदान मिळावे, बुटीबोरी औद्योगिक परिसरातील उद्योगांना महसूल विभागाच्या नियमातून सवलत मिळावी, उद्योग क्षेत्रातील नवनवीन संकल्पना व शासकीय योजना यांची माहिती होण्यासाठी राज्य शासन व उद्योजक यांच्या नियमित परिषदा/बैठका आयोजित व्हाव्या, संरक्षण क्षेत्रात कुशल मन्युष्यबळासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स उभारावे व या क्षेत्रात राबविण्यात येणारी केंद्र शासनाची मिनी क्लस्टर योजना पुन्हा सुरू व्हावी आदी सूचना उद्योग क्षेत्रातील संघटनांकडून यावेळी करण्यात आल्या.                                                                                                                                           

अमेरिकेला केल्या जाणाऱ्या भारताच्या एकूण निर्यातीपैकी 20 टक्के निर्यात महाराष्ट्रातून केली जाते. अमेरिकेला पर्यायी बाजारपेठ म्हणून इंग्लंड, युएई, जपान, एपीटीए समुहातील देश, युरोपीयन संघामधील देशांमध्ये राज्यातून निर्यात करण्याच्या दिशेने केंद्र व राज्य शासन प्रयत्नरत आहे. यासंदर्भात उद्योगांना आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व अडचणी दूर करण्यासाठी शासन कृतीदलाच्या माध्यमातून सूचना प्राप्त करून घेत आहे. यामाध्यमातून उद्योगासाठी लघू व मध्यम कालमर्यादेचे मदत धोरण आखण्यात येणार असल्याचे अपूर्व चंद्रा यांनी सांगितले. परदेशात माल निर्यात करण्यासाठी टेस्टिंग, पॅकेजींग आणि ब्रॅन्डिग आदींबाबत उद्योगांनी आग्रही राहून कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींशी चर्चा करून मदत करण्याची शासनाची भूमिका असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विभागीय आयुक्त श्रीमती बिदरी यांनी बैठकीचा समन्वय केला तर सहसंचालक मुद्दमवार यांनी नागपूर विभागातील उद्योग निर्यातीबाबत सादरीकरण केले.

0000

धम्मचक्र प्रवर्तन दिनाची संपूर्ण तयारी 30 सप्टेंबरपूर्वी पूर्ण करा - विजयलक्ष्मी बिदरी

 


Ø  धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या व्यवस्थेचा आढावा

Ø  सुरक्षेसाठी 56 सीसीटीव्ही कॅमेरांची निगरानी

Ø  व्यवस्थेची संपूर्ण माहिती डॅशबोर्डवर

Ø  एक हजार शौचालय, 120 नळाद्वारे पाणीपुरवठा

 

नागपूर, दि. 25 : 69 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त देशाच्या विविध भागातून लाखो भाविक दिक्षाभूमीला भेट देणार असल्यामूळे जिल्हा प्रशासनातर्फे आवश्यक सर्व सुविधा येत्या 30 सप्टेंबर पूर्वी पूर्ण करतांनाच नागरिकांची गैरसोय होणार नाही तसेच सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात 69 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त प्रशासनाच्या विविध यंत्रणांकडून करण्यात येत असलेल्या व्यवस्थेचा आढावा विभागीय आयुक्त श्रीमती बिदरी यांनी घेतला त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या. 

यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव डॉ. राजेंद्र गवई, विश्वस्त विलास गजघाटे, सदस्य सुधीर फुलझेले, डॉ. प्रदिप आगलावे यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मीणा, महानगपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, सामान्य प्रशासन अपर आयुक्त तेजुसिंग पवार तसेच पोलीस, महसूल, परिवहन, आरोग्य, अन्न व प्रशासन आदी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 दीक्षाभूमी येथे 69 व्या धम्मचक्र दिनानिमित्त लाखो भावीक भेट देत असल्यामूळे सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करतांना जिल्हा प्रशासनातर्फे येणाऱ्या भावीकांची गैरसोय होणार नाही. तसेच या परिसरामध्ये पिण्याच्या पाण्यासह, स्वच्छता व आरोग्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना करण्यासंदर्भात महानगरपालिकेसह विविध विभागांकडे जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. संपूर्ण देशातून मागिल वर्षीप्रमाणे 10 ते 12 लाखांपेक्षा जास्त नागरिक उपस्थित राहतील यादृष्टीने व्यवस्था करतांना विविध यंत्रणांनी समन्वयाने संपूर्ण जबाबदारी पार पाडावी, अशी सूचना श्रीमती बिदरी यांनी यावेळी केली.

 दिक्षाभूमी परिसरात प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या विभागनिहाय सुविधांचा आढावा घेतांना श्रीमती बिदरी म्हणाल्या की, दिनांक 02 ऑक्टोंबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा असून संपूर्ण भारतातून दिनांक 30 सप्टेंबर पासून लाखो भाविक उपस्थित राहणार आहेत. ही व्यवस्था 3 ऑक्टोंबर पर्यंत करावयाची असल्यामूळे या परिसरात होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस विभागतार्फे स्वतंत्र नियंत्रण कक्ष सुरू करावे. या नियंत्रण कक्षात इतर विभागांच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करून जलद व सुलभ व्यवस्था कशी सांभाळता येईल यासाठी समन्वय आवश्यक आहे. येणाऱ्या भाविकांसाठी पिण्याच्या पाणी, शौचालय व स्वच्छतेसंदर्भात महानगपालिकेतर्फे व्यवस्था करण्यात आली आहे. दिक्षाभूमी परिसरात यासाठी 120 नळ उभारण्यात आले असून भोजनदान करणाऱ्या संस्थांसाठी अतिरिक्त 7 टँकर सज्ज ठेवण्यात आले आहे. दिक्षाभूमी परिसरात माता कचेरी, औद्योगिक प्रशिक्षण संस्था आदी परिसरात 992 शौचालय उभारण्यात येणार आहे. त्यासोबतच मोबाईल शौचालयाची सुविधा राहणार आहेत. पावसाच्या दृष्टीने परिसरातील शाळांमध्ये राहण्यासाठी अतिरिक्त सुविधा निर्माण करण्यात येत असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.

 दिक्षाभूमी परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत असून मोबाईल टॉवर सुद्धा उभारण्यात आला आहे. संभाव्य गर्दीच्या नियंत्रणासाठी व सुरक्षेच्यादृष्टीने स्टॉलवर खाद्य पदार्थ तयार करण्यासाठी सिलेंडर, इतर ज्वलनशील साहित्य ठेवता येणार नाही, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी दिली. दिक्षाभूमी येथील स्तूपाकडे प्रवेश तसेच दर्शनानंतर बाहेर जाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.  व्यवस्थेसंदर्भातील संपूर्ण माहिती सोशल मिडिया व डॅशबोर्डवर उपलब्ध राहणार आहे. रेल्वे स्टेशन व बसस्टॅण्ड तसेच ड्रॅगन पॅलेसला भेट देण्यासाठी परिवहन विभागातर्फे 110 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. नागपूर शहरातील भाविकांसाठी 11 मार्गांवर दिनांक 30 सप्टेंबर पासून आपली बस सुरू करण्यात येणार आहे. भाविकांनी या व्यवस्थेचा वापर करावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.

                                                      अन्नदान करण्यापूर्वी तपासणी आवश्यक

         दिक्षाभूमीवरील भाविकांसाठी विविध संस्था व संघटनांकडून अन्नदानाची व्यवस्था करण्यात येते. अन्नदान करतांना गर्दी होणार नाही. तसेच गैरसोय टाळण्याच्या दृष्टीने जागा निश्चित करून देण्यात येणार आहे. त्यासोबतच अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे स्वतंत्र पथकामार्फत अन्नदान करण्यापूर्वी तपासणी करूनच वितरण करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले आहे.

             जिल्हा प्रशासन व महानगपालिकेतर्फे दिक्षाभूमीवर येणाऱ्या भाविकांसाठी करण्यात आलेली व्यवस्था तसेच वाहतूक व्यवस्था, ड्रॅगन पॅलेसला भेट देणाऱ्या भाविकांसाठी करण्यात आलेली व्यवस्था, परिवहन व्यवस्था आदी माहिती शहराच्या विविध भागात प्रदर्शित करण्यात येणार आहे. आरोग्य विभागातर्फे रेल्वे स्टेशन, बसस्थानक तसेच परिसरातील महत्वाच्या ठिकाणी वैद्यकीय व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली आहे. पोलीस विभागातर्फे दिक्षाभूमी परिसरात एक हजारपेक्षा जास्त अधिकारी व कर्मचारी सुरक्षेच्यादृष्टीने नियुक्त करण्यात आले आहे. अग्निशमन यंत्रणा, वाहनतळ तसेच हरवलेल्या व्यक्तीसंदर्भातील माहिती देण्यासाठी पोलीस नियंत्रण कक्ष व महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्षाद्वारे सुविधा राहणार आहे. यावर्षी मागील वर्षापेक्षा जास्त भाविक उपस्थित राहतील, यादृष्टीने व्यवस्था सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.

             दिक्षाभूमी स्मारक समितीच्या वतीने दिक्षाभूमी परिसरात 350 पेक्षा जास्त पुस्तक विक्रीसाठी स्टॉलची व्यवस्था करण्यात आली आहे. मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही प्रशासनाने आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी स्मारक समितीचे सचिव डॉ. राजेंद्र गवई यांनी केली.  प्रारंभी सामान्य प्रशासन विभागाचे अपर आयुक्त तेजुसिंग पवार यांनी प्रास्ताविक केले.

0000

 

 

Monday, 22 September 2025

‘विकसित महाराष्ट्र 2047-युवा व क्रीडा संवादा’ची नागपुरातून सुरुवात क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी साधला थेट मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्याशी संवाद

नागपूर दि.२०:- गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी येथील राष्ट्रीय धनुर्धर जय ठेंबले यास आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी आवश्यक साधन सुविधा मिळण्याची मागणी थेट राज्याचे क्रीडा व युवककल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्याकडे केली. त्याची दखल घेत जिल्हा क्रीडा संकुलाच्या माध्यमातून या सुविधा जय यांच्यासह खेळाडूंना देण्यात याव्या, अशा सूचना व यानंतर क्रीडा प्रशिक्षक, संघटक, खेळाडुंचे पालक, पंच, दिव्यांग खेळाडू आदी सर्वांच्या सूचना व मतं ऐकून घेत त्याचा अंतर्भाव राज्याच्या क्रीडा धोरणात करण्यात येईल, असा विश्वास स्वत: मंत्री देत असल्याचे चित्र आज विभागीय क्रीडा संकुलात बघायला मिळाले. औचित्य होते राज्यातील पहिल्या 'विकसित महाराष्ट्र २०४७- युवा व क्रीडा संवादाचे.'

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्यावतीने राज्याच्या क्रीडा क्षेत्र विकासासाठी महत्त्वपूर्ण सूचना प्राप्त करून घेण्याकरिता सर्व विभागीय मुख्यालयात 'विकसित महाराष्ट्र २०४७-युवा व क्रीडा संवाद' उपक्रम राबविण्यात येत आहे. नागपूर विभागाचा हा संवाद विभागीय क्रीडा संकुल मानकापूर येथे आयोजित करण्यात आला.      

 नागपूर विभागाच्या सहा जिल्ह्यातील खेळाडू, प्रशिक्षक, संघटक,पंच आणि क्रीडा क्षेत्रात कार्य करणाऱ्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी या संवादात हिरीरीने सहभाग घेऊन राज्याच्या क्रीडा धोरणासाठी आपल्या सूचना व मते थेट क्रीडा मंत्र्यांसमोर मांडल्या. विना मध्यंतर सलग चार तास चाललेल्या या संवादात शासन आणि लाभार्थी यांच्यातच थेट संवाद झाला. सुरुवातीला मंत्री ॲड. कोकाटे यांनी या उपक्रमामागील भूमिका स्पष्ट करतांना क्रीडा व युवककल्याण क्षेत्रात कार्यरत सर्व घटकांच्या अमूल्य सूचना ऐकून घेत त्यातून राज्यासाठी एक सर्वसमावेशक धोरण ठरविण्यात येणार असल्याचे सांगितले. 

 या संवादाची सुरुवातच गडचिरोली जिल्ह्यातील स्क्वॅश खेळाचे संघटक सरोजित मंडल यांनी खेळाडूंसाठी प्रवास व निवासी भत्त्यापोटी शासनाकडून वार्षिक निधी उपलब्ध होण्याबाबत केलेल्या सूचनेने झाली. याच जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी महिलांनी सुरु केलेल्या ‘आधार विश्व फाऊंडेशन’च्या प्रमुख गिता हिंगे यांनी तरुणांसाठी शासनाकडून समुपदेशनाची व्यवस्था उपलब्ध होण्याची मांडलेली सूचना, राज्यशासनाचा शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त चंद्रपूर येथील ज्येष्ठ खेळाडू राजेश नायडू यांनी शिवछत्रपती पुरस्कार सुरु करण्याची केलेली सूचना, नागपूर येथील क्रीडा संघटक पियुष आंबुलकर यांनी विविध शासन निर्णयांचा संदर्भ देत विविध स्पर्धा आयोजनासाठी वाढीव निधी आणि प्रशिक्षक व क्रीडापटूंसाठी वाढीव मानधनाची केलेली सूचना तसेच आंतरराष्ट्रीय दिव्यांग क्रिकेटपटू गुरुदास राऊत यांनी दिव्यांग खेळाडुंसाठी विभागीय क्रीडा संकुलात दिव्यांग क्रीडा संकूल असावे आणि या खेळाडुंनाही शासकीय नोकऱ्या व पुरस्कारांमध्ये प्राधान्य देण्याची केलेली सूचना आणि यासर्वांना  मंत्री ॲड. कोकाटे यांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद व आश्वासनाने या संवादाचे लक्ष वेधून गेले. बहूतेक वेळी सूचनांना प्रतिसाद देतांना त्यांनी चार ते पाच विषयांमध्ये विभागाकडून लवकरच शासननिर्णय निर्गमित करण्यात येणार असल्याची माहिती दिली. क्रीडा विभागातील अधिकारी कर्मचाऱ्याच्या रिक्त जागांबाबत बिंदूनामावलीची प्रक्रिया पूर्ण होताच जवळपास एक हजार पद भरण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. राज्यातील क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी उद्योग क्षेत्राकडून सीएसआरमधून निधी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. 

 प्रत्येक जिल्ह्यातील तीन ते चार प्रतिनिधींनी या संवादात सहभाग घेवून आपल्या सूचना व मत नोंदवली. नागपूर विभागापासून सुरु झालेला हा युवा व क्रीडा संवाद कार्यक्रम राज्यातील अन्य विभागांमध्ये आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे सहसंचालक सुधीर मोरे यांनी प्रास्ताविकात सांगितले. 

राज्य शासनाच्या पहिल्या क्रीडा धोरणापासून ते राज्यातील क्रीडा प्रबोधिनी, क्रीडा संकूल, क्रीडा पुरस्कार, मिशन लक्षवेध आदींबाबत त्यांनी माहिती दिली.

यावेळी प्रभारी क्रीडा उपसंचालक पल्लवी धात्रक यांच्यासह विभागातील जिल्हा क्रीडा अधिकारी, आंतरराष्ट्रीय बुद्धीबळपटू दिव्या देशमुख आणि विविध क्रीडा प्रकारातील निवडक आंतरराष्ट्रीय  क्रीडापटू उपस्थित होते. 

                                                 0000

Tuesday, 16 September 2025

मक्यावरील नवीन लष्करी अळीच्या व्यवस्थापनासाठी कृषी विभागाचा सल्ला

 


नागपूर,दि. 16 : मक्का पिकावर ढगाळ वातावरणाचा परिणाम होत असून त्यामुळे नवीन लष्करी अळीचा प्रादूर्भाव होत आहे.  त्यापासून पिकाचे नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागाने लष्करी अळीच्या व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे. विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाटगे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे या संदर्भात अधिक माहिती दिली आहे.

लष्करी अळया पाने खाऊन पिकाचे नुकसान करतात. अंडयातून बाहेर आलेल्या अळया पानाचा हिरवा पापूद्रा खातात त्यामुळे पानाला पांढरे चट्टे पडतात. अळया मक्याच्या पोंग्यामध्ये राहून पानाला छिद्रे करतात. त्यामुळे पोंग्यातून बाहेर आलेल्या पानावर एका रेषेत एकसमान छिद्रे दिसतात. जूनी पाने मोठया प्रमाणात पर्णहीन होवून पानाच्या फक्त मध्यशिरा व झाडाचे मुख्य खोड शिल्लक राहते. झाड फाटल्यासारखे दिसते पोंगा धरण्याची सुरुवातीची अवस्था प्रादुर्भावास कमी बळी पडते पण मध्यम पोंगे अवस्था त्यापेक्षा जास्त तर उशीरा पोंगे अवस्था अळीला सर्वात जास्त बळी पडते. अळी काही वेळा कणसाच्या बाजुने आवरणाला छिद्र करुन दाणे खाते.

नवीन लष्करी अळीच्या  व्यवस्थापनासाठी  पीक उगवणीनंतर रोपे ते सुरुवातीची पोंगे अवस्था म्हणजेच 3  ते 4 आठवडयांनी 5 टक्के प्रादुर्भाव ग्रस्त झाडे आढळल्यास फवारणी करावी. मध्यम ते उशिरा पोंगे अवस्था म्हणजेच 5 ते 7 आठवडयांनी 10 टक्के पोंग्यामध्ये प्रादुर्भाव तर उशिरा अवस्थेमध्ये 20 टक्के पोंग्यामधे प्रादुर्भाव आढळल्यास फवारणी करावी. गोंडा ते रेशीम अवस्था म्हणजे 8 आठवडयांनी फवारणीची गरज नाही परंतू 10 टक्के कणसामध्ये प्रादुर्भाव आढळल्यास फवारणी करावी.

      बिजप्रक्रिया केली नसल्यास या किडीच्या व्यवस्थापनाकरिता उगवणीनंतर 12 ते 15 दिवसांनी फवारणीसाठी  क्लोरॅन्ट्रनिलीप्रोल 9.3 टक्के प्रवाही आणि ल्यॅब्डा सायहेलोथ्रिन 4.6 टक्के झेडसी प्रवाही 5 मिली किंवा स्पिनेटोराम 11.7 टक्के एससी प्रवाही 5.12 मिली किंवा क्लोरॅन्ट्रनिलीप्रोल 18.5 टक्के प्रवाही एससी, 4.32 मिली किंवा इमामेक्टीन बेंन्झोएट 5 टक्के एसजी, 8 ग्रॅम किंवा इमामेक्टीन बेंझोएट 5 टक्के आणि ल्युफेनुरॉन 40 टक्के डब्ल्युजी, 1.6 ग्रॅम किंवा थायोडिकार्ब 75 टक्के डब्ल्युपी, 20 ग्रॅम किंवा नोव्हाल्युरॉन 5.25 टक्के आणि इमामेक्टीन बेन्झोएट 0.9 टक्के प्रवाही एससी, 30 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. चाऱ्यासाठी घेतलेल्या मका पिकावर कुठल्याही प्रकारच्या रासायनिक किटकनाशकाची फवारणी करु नये त्याऐवजी जैविक किटकनाशकाचा वापर करावा.

      अंडयाची उबवण क्षमता कमी करण्यासाठी व सुक्ष्म अळयांच्या नियंत्रणाकरिता 5 टक्के प्रादुर्भाव असल्यास 5 टक्के निबोंळी अर्क किंवा ॲझडिरेक्टीन 1500 पीपीएम, 50 मिली प्रति 10 लिटर याप्रमाणे फवारणी करावी. सुरवातीस अळी पानातील हरीत लवक खावून पानावर पांढरे, लांबट पट्टे किंवा ठिपके दिसताच बॅसीलस थूरीजींअसीस व कुर्सटाकी 20 ग्रॅम किंवा 10 लिटर पाणी किंवा 400 ग्रॅम किंवा एकर जैविक किटकनाशकांची फवारणी करावी. पतंग मोठया प्रमाणापर नष्ट करण्यासाठी कामगंध सापळयांचा एकरी 15 याप्रमाणे वापर करावा. सापळे पिकाच्या घेराच्या उंचिबरोबर प्राधान्याने सुरुवातीच्या पोंगे असवस्थेत लावावे. पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत एकरी 20 याप्रमाणे पक्षी थांबे उभारावे तसेच पानावरील अळया असलेल्या प्रादुर्भाव ग्रस्तपाने (पांढरे चट्टे असलेली) अंडी किंवा अळयांसहित नष्ट करावी व प्रादुर्भावग्रस्त पोंग्यामध्ये सुकलेली वाळू टाकावी, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.

000000


Monday, 15 September 2025

कापूस पिकावरील कीड व बोंड अळीच्या व्यवस्थापनासाठी कृषी विभागाचा सल्ला

 

 

नागपूर,दि. 15 : कापूस पिकावर ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणाऱ्या गुलाबी बोंड अळीचा प्रादूर्भाव डोंबकळयाच्या स्वरुपात दिसून येतो त्यापासून पिकाचे नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागाने गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना यासंदर्भात मार्गदर्शन केले आहे. विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाटगे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे.

कापूस पीक हे सध्या 40 ते 50 दिवसाचे झाले असून बऱ्याच ठिकाणी फुलावर आले आहे. त्यावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव डोमकळ्याच्या स्वरूपात दिसून आलेला आहे. या प्रकारच्या किडींच्या व्यवस्थापनासाठी उपाययोजनाचा अवलंब करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

     पीक  उगवणीनंतर 40 ते 45 दिवसांनतर कामगंध सापळ्यांच्या वापराचा सल्ला देण्यात आला आहे. एकरी दोन कामगंध सापळे लावावेत. सतत तीन दिवस या सापळ्यामधे आठ ते दहा पतंग आढळल्यास गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनाचे उपाय योजावेत तसेच मास ट्रॅपिंग करिता हेक्टरी 15 ते 20 कामगंध सापळे लावावेत असेही सांगण्यात आले आहे. पिकातील डोमकळ्या नियमीत शोधून त्या अळी सहीत नष्ट कराव्यात. पीक उगवणीनंतर 55 ते 60 दिवसांनी 12 ते 15 दिवसांच्या अंतराने ट्रायकोग्रामा टॉयडीयाबॅक्ट्री किंवा ट्रायकोग्रामा चिलोनिस परोपजीवी मित्र किटकाची 1.5 लक्ष अंडी प्रति हेक्टरी सहा वेळा सोडावे.

        प्रत्येक आठवडयाला एकरी शेताचे प्रतिनिधित्व करतील अशी 20 झाडे निवडून निवडलेल्या प्रत्येक झडावरील फुले, पात्या व बोंडांची संख्या मोजून त्यात गुलाबी बोंड अळीग्रस्त फुले, पात्या व बोंडे यांची टक्केवारी काढावी.

       गुलाबी बोंड अळीच्या  प्रादुर्भावाची टक्केवारी 5 टक्के पेक्षा जास्त आढळल्यास रासायनिक किटकनाशक इंडोक्साकार्ब 14.50 टक्के एससी 10 मिली किंवा स्पिनेटोराम 11.70 टक्के एससी 9 मिली किंवा प्रोफेनोफॉस 50 टक्के इसी 30 मिली किंवा क्विनॉलफॉस 20 टक्के एएफ 25 मिली किंवा क्लोरपायरीफॉस 20 टक्के इसी 25 मिली यापैकी कोणतेही एक किटकनाशक प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  तसेच प्रादुर्भावाची टक्केवारी  10 टक्के पेक्षा जास्त असल्यास इमामेक्टीन बेन्झोएट 1.5 टक्के आणि प्रोफेनोफॉस 35 टक्के डब्ल्युडीजी 14 ग्रॅम किंवा सायंट्रानिलीप्रोल 8 टक्के आणि डायफेनथ्युरॉन 40 एससी 13 मिली किंवा क्लोरपायरीफॉस 50 टक्के आणि सायपरमेथ्रीन 5 टक्के 20 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 1.1 टक्के आणि डायफेनथ्युरॉन 30 एससी 20 मिली किंवा प्रोफेनोफॉस 50 आणि फेनप्रोपॅथ्रिन 5 टक्के इसी 30 मिली यापैकी कोणत्याही एका मिश्र किटकनाशकाची 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.

 

000000


रामटेक चित्रनगरीसाठी 60 एकर जमिनीचे येत्या 15 दिवसात हस्तांतरण - सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड आशिष शेलार


 

रामटेक परिसरातील महत्त्वाच्या संरक्षित स्मारकांसंदर्भात महत्त्वाचे निर्णय

 रामटेक चित्रनगरी व संरक्षित स्मारक संवर्धनातून विकास व वारसा जपण्यात येईल

-          वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल 

नागपूर, दि.15 : चित्रपट निर्मिती आणि विदर्भात रोजगाराची संधी उपलब्ध होण्याच्यादृष्टीने रामटेक येथे उभारण्यात येणाऱ्या चित्रनगरीसाठी येत्या 15 दिवसात 60 एकर जमीन हस्तांतरित करण्याचा तसेच चित्रनगरी निर्मितीसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आल्याची माहिती, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज येथे दिली. रामटेक परिसरातील संरक्षित स्मारकासंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

रामटेक शेजारील नवरगाव येथे प्रस्तावित चित्रनगरीच्या जागेची पाहणी सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. शेलार यांनी आज केली व त्यानंतर रामटेक येथील शासकीय विश्रामगृहात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली.  वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यावेळी उपस्थित होते. 

मंत्री ॲड. शेलार म्हणाले, स्थानिक कलाकारांना योग्य मंच उपलब्ध करून देत विदर्भात चित्रपट निर्मिती आणि या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण होण्याच्यादृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात रामटेक येथे चित्रनगरी उभारण्यात येत आहे. या कामाला गती देण्याच्या दिशेने आज महत्त्वाचे दोन निर्णय झाले असून याअंतर्गत महसूल विभागाच्या मालकीची 60 एकर जागा चित्रनगरीसाठी हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांशी चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. नागपूरचे जिल्हाधिकारी यांना जमीन हस्तांतरणासंदर्भात अर्ज करून नियोजित वेळेत ही कार्यवाही पूर्ण करण्यात येईल असे, त्यांनी सांगितले. रामटेक चित्रनगरी उभारण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्याचा निर्णयही आज घेण्यात आला असून या संदर्भातही लवकरच कार्यवाही करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.        

रामटेक गड मंदिर परिसरात सोयी सुविधा संदर्भात येत्या 10 दिवसात पुरातत्त्व विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र रामटेक येथील प्राचीन गड मंदिर परिसरात ऐतिहासिक मूल्य जपत येथे येणाऱ्या भाविकांसाठी स्वच्छतागृह, दुकाने, गाडे आदींचा समावेश असणाऱ्या अद्ययावत सोयी-सुविधा उभारण्यासंदर्भात सांस्कृतिक कार्य विभागाकडे प्राप्त प्रस्तावास येत्या 10 दिवसात राज्य पुरातत्त्व विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र देण्याचा व त्याचा पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 

जिल्हा वार्षिक नियोजन निधीतील 3 टक्के निधी ऐतिहासिक किंवा सांस्कृतिक मूल्य असणाऱ्या स्मारकांच्या संवर्धन व संरक्षणासाठी वापरण्याचे निर्देश आहेत. हा संपूर्ण निधी त्याच कारणासाठी वापरला जातो किंवा नाही याचा आढावा घेतला जाईल. अर्थसंकल्पात करण्यात आलेली तरतूद व त्यास मिळालेली मंजुरी व प्रत्यक्षातील कामे याचा नियमित आढावा घेऊन कामांना गती देण्याचा निर्णय झाल्याचेही मंत्री ॲड. शेलार, म्हणाले.                                                            रामटेक गड मंदिरातील कामांना गती देण्यासाठी मंत्रालयात हेरिटेज कॉरिडॉर डेस्क

रामटेक गड मंदिरातील व्यापक विकास, सुशोभीकरण, ऐतिहासिक संवर्धन आणि जपणूक अशी विविध 23 विकास कामे 'रामटेक मंदिर हेरिटेज कॉरिडॉर' नावाने करण्यात येणार असून ही कामे राज्य विधिमंडळाच्या आगामी अर्थसंकल्पात  प्रस्तावित व मंजूर करून घेण्यात येतील. यासंदर्भात वित्त विभागाकडून आवश्यक पाठपुरावा व सहकार्य मिळेल. अर्थसंकल्पातील मंजुरीनंतर ही कामे जलद गतीने पूर्ण होण्यासाठी मंत्रालयात 'रामटेक मंदिर हेरिटेज कॉरिडॉर' उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले 

मनसर येथील प्राचीन वारसा स्थळ प्रकल्पास गती देण्यासाठी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयासोबत लवकरच चर्चा

 'प्राचीन वारसा स्थळे मनसर' या नावाने एकूण 156 एकरात प्राचीन मूल्य असणारी  स्मारके अस्तित्वात असून स्मारक संवर्धनाच्या या प्रकल्पाला गती देण्यासाठी लवकरच एक सविस्तर प्रस्ताव तयार करून केंद्रीय सांस्कृतिक मंत्री यांची स्वतः भेट घेणार असल्याचे मंत्री ॲड शेलार यावेळी म्हणाले.

 श्रीराम सांस्कृतिक महोत्सवाला येत्या 15 दिवसात आर्थिक व प्रशासकीय मंजुरी

 रामटेक येथे दरवर्षी 22 जानेवारी रोजी आयोजित करण्यात येणारा श्रीराम सांस्कृतिक महोत्सवाला येत्या पंधरा दिवसात आर्थिक व प्रशासकीय मंजुरी देण्याचा निर्णयही आज घेण्यात आला.

    रामटेक चित्रनगरी व संरक्षित स्मारक संवर्धनातून विकास व वारसा जपू

-          ॲड. आशिष जयस्वाल

 विदर्भातील कलाकारांना एक हक्काचा मंच व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात येत असलेली रामटेक चित्रनगरी आणि रामटेक परिसरातील ऐतिहासिक 34 संरक्षित व 5 भारतीय पुरातत्त्व विभागाच्या स्मारकांच्या संवर्धनासाठी प्रत्यक्ष या भागाला भेट देऊन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी घेतलेले निर्णय या भागातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दिशेने पडलेले महत्त्वाचे पाऊल आहे. या भागाचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा जपण्याच्यादृष्टीने आज घेण्यात आलेले निर्णय अत्यंत महत्त्वाचे असून या भागाचा विकास आणि वारसा जपण्यासाठी सतत प्रयत्न व पाठपुरावा करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

 

00000